Followers

Thursday, June 25, 2009

दयाघना.... (माझे आवडते गाणे ...)

दयाघना का तुटले चिमणे घरटे
उरलो बंदी असा मी ... दयाधना II धृ II

अरे जन्म बंदिवास
सजा इथे प्रत्येकास
चुकेना कुणास आता बंदी पुन्हा मी .... दयाघना II 1 II

दहा दिशांची कोठडी
मोहमाया झाली वेडी
प्राण माझे ओठी उरलो बंदी पुन्हा मी ... दयाघना II 2 II

बालपण उतू गेले अन तारुण्य नासले
वार्धक्य साचले उरलो बंदी पुन्हा मी .... दयाघना II 3 II

Wednesday, June 17, 2009

रांगोळीकार देशपांडे


आपल्याला या आयुष्यात अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटत असतात. काही खूप आवडतात तर काही परत कधीच भेटू नये असे वाटणार्‍या पण असतात. काही जण मनात घर करून जातात तर काही मनात चीड आणून जातात. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोजच्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा वल्ली काळाच्या उदरात गुडूप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती मला भेटली आणि अगदी मनापासून वाटला की या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे.

या माणसाचे नाव मला आठवत नाही कारण ते फार महत्वाचे नाही. गावातले सगले जण त्यांना "देशपांडे" असेच संभोदितात. या माणसाचा माझा परिचय एका घरातील मुंजी निमित्त आला. "ते फार सुंदर रांगोळी काढतात" हे टाइटल वरुन सुजाण वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मुंजीच्या ग्रहमखाच्या दिवशी आम्ही त्यांना मुद्दामून रांगोळी काढण्यासाठी बोलावले होते आणि त्यांनी एक सुंदर रांगोलीही आमच्या अंगणात काढली होती. साधारात 15 फूट व्यासाची रांगोळी एकहाती न चुकता न थांबता काढणे आणि तितकीच सुंदर रंगवणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. या 2-3 तासाच्या काळात त्यांच्या बद्दलचे अनेक पैलू समजले.

देशपांडे यांचा जन्म सातारा शहरापासून 15 किमी वर असणार्‍या वडूस या खेड्यातला. वाड-वडिलांची भरपूर जमीन होती. फार पूर्वी पेशव्यानी दिलेली जमीन आणि परगणा. पूर्वापार चालत आलेली हा जमीन जुमला आणि तशाच कष्ट करणार्‍या पिढ्या. 1950 च्या दशकापर्यंत सगळा काही व्यवस्थित चालू होत. गावात नाव होते, पत होती. हाताखाली चार गडी माणसे होती. कशाला काही कमी नव्हते. भरपूर जमीन , शेतात विहिरी, मुबलक गुरे ढोर, कामाला माणसे. कशाला काही कमी नव्हते.

आणि एक मोठ्ठ वादळ त्यांच्या आयुष्यात आले. तो काळ होता गांधी वधाचा. गोडसेनी गांधींना दिल्लीमधे मारले आणि त्याचे पडसाद सार्‍या भारतभर उमटले. विशेष करून सातारा, सांगली या जिल्ल्यात. ब्राह्मणांची घरे जाळण्याचे अनेक प्रकार या परिसरात झाले आणि एथेच या देशपांडे यांचे कुटुंब उद्वस्त झाले. घरातील करती सावरती माणसे मारली गेली किंवा कायमची जायबंदी झाली. गावात राहणे नको अशी परिस्थिती निर्माण झाली. गावातील अशी बरीच घरे मोकळी व्ह्ययला लागली. कुठेतरी सुरक्षित ठिकाणी राहू पण येथे नको आहे बहुतेकांचे मत होते. देशपांडे यांच्या वडिलांनी धीर न सोडता तेथेच पाय रोवून उभे राहण्याचा निर्णय घेतला.

परत एकदा घरची घडी नवीन बसवण्यपासून सुरूवात. जळूनगेलेली पिके परत लावण्यापासून मुळारंभ. हे सारे मार्गी लागे पर्यंत थोडासा काळ जातो ना जातो तोवर नवीन कूळ कायदयाप्रमाणे हातातील जमीन कुळांना द्यावी लागली. "कसेल त्याची जमीन....." या अजब नियमाने बहुतेक जणांच्या हक्काच्या जमिनी हातातून निघून गेल्या. ह्या सर्व घटनेचे आमचे देशपांडे हे लहान असतानाचे साक्षीदार होते. कसायाला जमीन नाही. खिशामधे पैसा नाही. त्यामुळे म्हणावे असे चांगले शिक्षण सुद्धा झाले नाही. अशा परिस्थितीत देशपांडे यांनी शहराची वाट ना धरली तरच नवल. गुजराण करायला शिक्षण नाही पण हातात थोडीशी कला होती, रांगोळी काढायची. अगदी लहान पणापासूनची. शाळेत जाण्याआधी आईचा पदर धरून जेव्हा आपण सगळीकडे वावरत असतो तेव्हा त्यांनी आईबरोबर अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या काढायला सुरूवात केली होती. त्याकाळी रांगोळी मधे रंग मिसळले म्हणून आईच्या हातचा मार खाल्ला होता. आता त्याच हातांना दोन वेळची पोटाची खळगी भरण्यासाठी याच रांगोलीचा आधार मिळाला. स्वत:च्या जीवनात निरनिराळे रंग भरायचे सोडून दुसर्‍यांसाठी काढलेल्या रांगोळित रांग भरायची वेळ आली.

सुरुवातीला कोणकोणाच्या घरी जाऊन त्यांच्याच घरी एक वेळेच्या जेवणाची सोय या रांगोळीने करून दिली. मग कोणीतरी सांगितले, अरे जरा संस्कार भारती वगैरे काही येत का? देशपांडे म्हणाले, हे काय असते? सगळे खो खो हसले. देशपांडे ओशाळून गेले पण जिद्द सोडली नाही. इकडून तीकडून माहिती कडून संस्कार भारती रांगोळी पण शिकून घेतली. मुळात हातात कला होती मग संस्कार भारतीची वळणे जमायला कितीसा वेळ लागतो? कष्ट करायची इच्छा असेल आणि मनात जिद्द असेल तर काय अशक्य आहे या जगात? हळू हळू संस्कार भारती मधे पण प्रावीण्या मिळवला आणि आता लोक सांगतील ती रांगोळी देशपांडे काढायला लागले.

थोड्याशा ओळखी वाढायला लागल्या. कोणीतरी सांगितले, अरे शाळांमधे जा. तेथे सणवारी, 15 औगस्ट ला, 26 जानेवारी ला रांगोळ्या काढ, चार पैसे हाताशी येतील. देशपांडेन्नी ही पण गोष्ट मनावर घेतली पण शाळेत प्रवेश कोण देणार? ना ओळख ना पाळख. शाळेतला शिपाई सुद्धा आत प्रवेश देईना. प्रिन्सिपल पर्यंत पोहोचणे तर दूरच राहीले. मोठा प्रश्न पडला. देशपांडे यांनी मग एक शक्कल लढवली. शाळेत भेटायाचा नाद सोडला आणि स्वतः शाळेच्या बाहेर मिरवणूकीच्या आधी मनाने रांगोळी काढू लागले. कधी नगरपालिकेच्या मैदानात तर कधी मंदिराच्या बाहेर. जिथे जागा मिळेल तिथे आपल्या कलेचे प्रदर्शन करू लागले. हळूहळू लोकांच्या ही गोष्ट लक्षात येऊ लागली. शाळेतुन देशपांडे यांना निरोप येऊ लागले. आज हा कार्यक्रम तर उद्या तो कार्यक्रम. चार पैसे गाठिशी जमू लागले.

आता लोक आठवणिनी त्यांना रांगोळी काढायला सगळीकडे बोलवू लागले. कधी नुसती रांगोळी तर कधी रांग भरलेली. कधी नुसतेच हातानी काढलेले निरनिराळे डिज़ाइन तर कधी पूर्ण संस्कार भारती. सातार्‍याच्या महाराजांची कधी गावातून मोठी मिरवणूक असेल तर राजपथ आणि अनेक ठिकाणी 20-20 फूट व्यासाच्या मोट्ठ्या रांगोळ्या. नवीन माणूस तर ही कला पाहून तोंडात बोटच घालून बसेल.
पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैशावर आयुष्यभर कामे केली. कधी "वाजवून" पैसे घेतलेच नाहीत. काहींनी बुडवले पैसे पण त्याचे त्यांना दुख: नाही. त्यामुळे शिल्लक अशी फारशी कधी राहिलीच नाही. बर्‍याच वेळा पैसे न घेता एका वेळचे जेवण हाच सौदा त्यामुळे गाठिशी पुंजी कितीशी राहणार.... एकदा अशाच विषयावर त्यांना छेडाले तेव्हा म्हणाले, माणसाला ह्या जन्माचे ह्या जन्मातच भरून जायचे असते. मला कमी पैसे देऊन त्यांच्या कुठे हवेल्या भरून गेल्या. मला माझ्या पोटपुरता मिळाले म्हणजे बस !!!

आता काळानुरूप त्यांच्यात पण थोडा बदल होत चालला आहे. वयोमानाने हात इतका सफाईदार पणे चालत नाही. ठरलेल्या वेळी अगदी वेळेवर पोहोचायला जमतेच असे नाही. अशा वेळेला जुने जाणते लोक त्यांना कधी प्रेमाने तर कधी खरोखर रागवतात. काय करणार? पु ल च्या हरितात्यांसारखे लहान मुले पण त्यांची आता चेष्टा करतात. देशपांडे कधी याचा राग करीत नाहीत. मुळातच मृदूभाषी आणि कमी बोलणारे. त्यात परिस्थीतीने कोणावर हुकुमात करायची किंवा कोणावर अधिकार गाजवायची सवयच कधी लागू दिली नाही त्याला ते तरी काय करणार? अनेक वेळा अपमान सहन करून केवळ आजच्या दिवसाची किमान एक वेळची सोय हेच फक्त नशिबाने पाहायला शिकवले...

जीवनाच्या संध्याकाळी आयुष्यात त्यांना अजूनही स्थैर्य नाही. अशा माणसांची काळजी मनात घर करून राहते ती या मुळेच नाही का?....