
नाणेफेक
भारत यजमान संघ असल्याने महेंद्रसिंग धोणीने कुमार संघकारा, सामनाधिकारी जेफ क्रोव आणि समालोचक रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत नाणे उडवले आणि संघकाराने कौल दिला. नाणे खाली पडल्यावर संघकाराचा कौल चुकल्याचा रवी शास्त्री व धोणी यांचा समज झाला परंतु क्रोवने आपल्याला कौल ऐकूच न आल्याचे सांगितले. संघकाराने आपण कौल दिला कि नाही हे सांगितले नाही. परिणामी क्रोवने परत नाणेफेक करण्यास सांगितले. यावेळी संघकाराने दिलेला कौल बरोबर आला व श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी समालोचन करणार्या मायकेल वॉन आणि शेन वॉर्न यांनी आपल्याला संघकाराचा पहिला कौल ऐकू आल्याचे व संघकारा नाणेफेक हरल्याचे स्पष्ट केले आहे.
श्रीलंकेचा डाव
श्रीलंकेकडून या विश्वचषकात सलामीलाच धावांचे विक्रमी डोंगर उभे करणार्या तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा यांच्या विरुद्ध भारताचे झहीर खान आणि शांताकुमारन श्रीसंतने गोलंदाजी सुरू केली. झहीर खानने आपली पहिली तीन षटके निर्धाव टाकून २००३च्या अंतिम सामन्यात केलेली चूक पुन्हा होणार नाही याची खात्री करुन दिली. झहीर खानने आपल्या चौथ्या षटकात थरंगाला आउटस्विंगर टाकून पहिल्या स्लिपमध्ये वीरेंद्र सेहवागकरवे झेलबाद केले. झहीर विरुद्ध धावा करणे मुश्किल झाल्यामुळे फलंदाजांनी श्रीसंतच्या गोलंदाजीवर धोका पत्करुन फटके मारणे सुरू केले. बाराव्या षटकात श्रीसंतला खेळपट्टीचा निषिद्ध भाग तुडवल्याबद्दल पहिला व शेवटचा इशारा मिळाला. कदाचित त्यामुळे सैरभैर झालेल्या श्रीसंतच्या त्या षटकात एक नो-बॉलसह १५ धावा वसूल झाल्या. त्यानंतर गोलंदाजीस आलेल्या हरभजनसिंगने दिलशानचा बळी मिळवून श्रीलंकेच्या बाजूने झुकत चाललेल्या सामन्याला परत खेचले. संघकारा आणि माहेला जयवर्दने यांनी चिवटपणाने खेळत मोठी भागीदारी सुरू केली पण धोणीने संघकाराला युवराजसिंगच्या गोलंदाजीवर टिपून महत्वाचा ब्रेक-थ्रू मिळवून दिला. डावाच्या अंतिम टप्प्यात धोणीने पुन्हा झहीर खानला गोलंदाजी दिली आणि त्याने चामर कपुगेडेराला बाद केले. याआधीच्याच षटकात थिलन समरवीरा बाद झालेल्या असल्याने एका बाजूने किल्ला लढविणाऱ्या जयवर्दनेने आक्रमण करण्याचा बेत पुढे ढकलला आणि १-२ धावा मिळवण्याकडे लक्ष केंद्रित केले. अखेरच्या पाच षटकांत पॉवर प्ले सुरू झाल्यावर जयवर्दने सह नुवान कुलशेखरा आणि थिसरा परेरा यांनी भारतीय गोलंदाजांना धारेवर धरत ६३ धावा मिळवल्या. पहिली तीन षटके निर्धाव टाकणाऱ्या झहीर खानने अखेरच्या तीन षटकांत धावांची उधळण केली आणि श्रीलंकेचा डाव २७४ धावांवर थांबला.अखेर टीम इंडियाने विश्व विजेतेपद जिंकून क्रिकेटचे जग जिंकले! धोनीच्या धुरंधरांनी भारतीय क्रिकेटच्या पंढरीत अब्जावधी भारतीयांचे स्वप्न साकार केले. कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान आणि आता एकदिवसीय क्रिकेटमधील अजिंक्यचपद. खऱ्या अर्थाने भारत क्रिकेटमधील सुपरपॉवर झाला आहे. हे यश देशभरात अभूतपूर्व जल्लोषात साजरे होत आहे.

या सुवर्ण दिवसाची गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहिली जात होती. २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आला आहे. आता २ एप्रिल २०११ हा दिवस प्लॅटेनियमने लिहिला जाईल. कुलसेकराचा चेंडू धोनीने प्रेक्षकांमध्ये भिरकावला त्या क्षणी अख्खा भारत आनंदोत्सवात न्हाऊन निघाला. खेळाडू बेभान होऊन नाचत होते. खच्चून भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये "जय हो...' आणि "चक दे इंडिया'चा नारा निनादत होता.
आजच्या यशाचा शिल्पकार ठरला कर्णधार धोनी. आघाडीवर राहून सेनापतीने युद्ध जिंकून द्यावे, तशा आवेशात तो लढला. दमला होता, थकला होता; पण त्याने सचिनला दिलेला शब्द खरा करून दाखविला. या अजिंक्यणपदानंतर संपूर्ण संघाने धोनीला नव्हे, तर सचिनला खांद्यावर घेऊन स्टेडियमध्ये विजयी फेरी मारली त्या वेळी सर्व जण धन्य झाले होते. कारण सचिनला विजेतेपदाची भेट द्यायची आहे, हा शब्द संघातील सर्वच खेळाडूंनी खरा करून दाखविला होता.
या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत लढाया जिंकणाऱ्या भारताने अंतिम सामन्याचे हे युद्ध ६ गडी आणि १० चेंडू राखून जिंकले. सेहवाग आणि सचिन बाद झाल्यानंतर किल्ला एका बाजूने लढविणाऱ्या गंभीरने ९७ धावांची भक्कम कामगिरी केली, परंतु या विजेतेपदावर भारताचाच हक्क आहे हे सिद्ध करताना धोनीने ७९ चेंडूत ८ चौकार आणि दोन षटकरांसह नाबाद ९१ धावा फटकवल्या. विजेतेपदावर शिक्कामोर्तब करताना त्याने मारलेला षटकार भारतीय क्रिकेटची मैदानावरची श्रीमंती दाखविणारा होता.
जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो, तेव्हा खरे तर वेगवान आणि तेवढ्याच ठोस सलामीची गरज असते. सेहवाग आणि सचिन असे स्फोटक सलामीवीर असल्यावर खरे तर काळजीचे कारण नव्हते; पण "भरवशाच्या म्हशीला...' ही म्हण उगाचच पडली नाही. इनिंग ब्रेकनंतर प्रेक्षक पुन्हा आपल्या जागेवर यायच्या आत सेहवाग दुसऱ्याच चेंडूवर परतला. त्यामुळे दुसऱ्या बाजूला सचिनला आखलेल्या योजना बासनात गुंडाळून ठेवाव्या लागल्या. तरीसुद्धा त्याने षटकामागे पाच धावांची सुरवात कायम ठेवली होती. पण मुंबई इंडियन्सचा त्याचा सहकारी मलिंगाने त्याला बाद केले. सचिन तंबूत परतत असताना अख्ख्या स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली होती.
तंबूत परतत असताना सचिनने पुढचा फलंदाज कोहलीला, "उभा राहा, कोणत्याही परिस्थितीत विकेट फेकू नको,' असा सल्ला दिला आणि तो कोहलीने अमलात आणला. धावा किती करायच्या आहेत, आव्हान किती वाढत आहे या सर्व गणितांचा विचार न करता त्याने आणि त्याचा दिल्लीकर सहकारी गंभीरने गड पडू दिला नाही.
लढाई सुरू होती... भारतीय बॅकफूटवर होते, पण मनाने खंबीर होते. तेवढ्यात दिल्शानने स्वतःच्याच गोलंदाजीवर कोहलीचा अप्रतिम झेल घेतला. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज लयबद्ध मारा करत होते, अशा वेळी युवराजऐवजी धोनीने स्वतः फलंदाजीस येण्याचा निर्णय घेतला आणि धावफलकावरील आकडे पटापट बदलू लागले आणि बघता बघता १०० चेंडूत १०० धावांची गरज.... ७८ चेंडूत ७९ धावांची गरज... ६० चेंडूत ५४ धावांची गरज अशी समीकरणे बदलू लागली आणि चाहत्यांचा मूडही पालटू लागला.
धोनी-गंभीर ही जोडी फोडण्यासाठी श्रीलंका कर्णधार संगकाराने मलिंगा आणि कुसलेकर असा दुतर्फी मारा सुरू केला. पण धोनीने त्याच्या खास शैलीतील दे घुमा के असे अविश्वदसनीय फटके मारून जान आणली. एकेक पाऊल पुढे टाकले जात होते. तेवढ्यात गंभीरला खराब फटका मारण्याचा मोह झाला; त्यामुळे त्याचे शतक तीन धावांनी तर हुकलेच; पण प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोकेही वाढले. ४५ षटकांनंतर पॉवर प्ले सुरू झाला. दडपण वाढलेले होते, पण धोनी आणि युवराज यांनी या वेळी पॉवर प्लेमध्ये आपली पॉवर दाखविली आणि १० चेंडू शिल्लक ठेवूनच बाजी मारली.
भारताने विश्वचषक जिंकताच वानखेडेच्या क्रिडांगणावरदेखील भारतीय क्रिकेटवीरांचा उत्साह ओसंडू लागला. एकमेकांना मिठय़ा मारून जल्लोषात झोकून देताना अनेकांनी आनंदाश्रूंनाही मुक्तपणे वाहू दिले. सचिन तेंडुलकरला पठाणने आपल्या डोक्यावर घेतले आणि इतर खेळाडूंच्या साथीने जेव्हा प्रेक्षकांचे अभिनंदन स्वीकारीत सचिनने क्रिडांगणाला फेरी घातली तेव्हा अवघ्या क्रिकेटप्रेमींना आनंदाचे भरतेच आले.. आपण विश्ववेजेते आहोत, या जाणिवेने उर भरून आला.. सुशोभिकरणानंतरचा वानखेडेवरचा हा पहिलाच सामना मुंबापुरीचीही शान अबाधित करणारा ठरला..

गंभीरचे शतक थोडक्यात हुकले
पहिल्याच विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करणारा गौतम गंभीरचे एकदिवसीय कारकिर्दीतील १० वे आणि विश्वकरंडक स्पर्धेतील पहिले शतक थोडक्यात हुकले. गंभीरने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये चार अर्धशतके केली आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर बाद झाले असताना खेळण्यास आलेल्या गंभीरने संयमी आणि जबाबदारीने फलंदाजी केली.
गंभीरने ही आपल्या ९७ धावांची खेळी १२२ चेंडूत ९ चौकारांसह साजरी केली. तसेच गंभीरने एकदिवसीय कारकिर्दीत चार हजार धावा पूर्ण केल्या. गंभीरची ९ शतके आणि २३ अर्धशतके झाली आहेत. गंभीरने तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीबरोबर ८३ धावांची भागिदारी केली. कोहली बाद झाल्यानंतरही गंभीरने आपला लक्ष्य ढळू न देता कर्णधार महेंद्रसिंह धोनीबरोबर शतकी भागिदारी केली. गंभीरची ही खेळी भारताला धावांचे अव्हान पाठलाग करताना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
झहीरची सुरेख सुरवात
२००३ च्या विश्वेकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झहीरने सुरवातीच्या षटकात स्वैर मारा केला होता आणि त्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने दणकेबाज सुरवात केली होती. त्या वेळी केलेली चूक या वेळी होणार नाही याची काळजी घेणाऱ्या झहीरने स्वतःची पहिली तीन षटके निर्धाव टाकली आणि अडखळत खेळणाऱ्या थरांगाला चौथ्या षटकात एका सुंदर ऑउटस्विंगवर बादही केले. फार काळ संयमी फलंदाजी करणे दिल्शानच्या स्वभावात बसणारे नव्हते. झहीरविरुद्ध धावा करणे सोपे नसल्यामुळे त्याने अर्थातच श्रीशांतकडे मोर्चा वळविला. बाराव्या षटकापर्यंत संयम बाळगल्यानंतर अचानक पुढच्या षटकात श्रीशांतवर हल्ला चढविला. खेळपट्टीच्या निषिद्ध भागात येत असल्यामुळे श्रीशांतला इशारा मिळाला. त्यामुळे सैरभैर झाल्याने त्याने एक नोबॉलही टाकला. या षटकात १५ धावा वसूल झाल्यामुळे श्रीलंकेच्या डावाला थोडी गती मिळाली. पण हरभजनसिंगला गोलंदाजी देण्याचा बदल निर्णायक ठरला; कारण त्याने पवित्रा बदललेल्या दिल्शानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला.
संगकारा आणि जयवर्धने कोणत्याही परिस्थितीत भारतीयांना सहजासहजी विकेट देणार नाहीत हे उघड होते. परंतु पुन्हा ऐन मोक्याभवर युवराज संघाच्या मदतीला धावून आला आणि त्याने संगकाराची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली.
श्रीलंकेचा डाव अंतिम टप्प्यात असताना धोनीने झहीर खानला गोलंदाजी दिली आणि त्याने कपुगेदाराला बाद केले. सलग दोन षटकांत दोन फलंदाज बाद झाल्यामुळे एका बाजूने किल्ला लढविणाऱ्या जयवर्धनेने आक्रमण करण्याचा बेत पुढे ढकलला आणि फलंदाजांच्या पॉवर प्लेची वाट पाहिली. अखेरच्या पाच षटकांतील पॉवर प्लेमध्ये जयवर्धने-कुलसेकरा-परेरा यांनी ६३ धावांचा धुमधडाका केला. पहिली तीन षटके निर्धाव टाकणाऱ्या झहीर खानने अखेरच्या तीन षटकांत धावांची उधळण केली.
No comments:
Post a Comment