Followers

Friday, November 14, 2014

दिवा



दिवा 


काल संध्याकाळची गोष्ट. नेहेमी प्रमाणे दमून भागून घराच्या दारात आलो तर घराला कुलूप आणि आसपास सगळीकडे वीज गेलेली. मोबाइलच्या प्रकाशात दार उघडले आणि आत आलो. काळ्या कुट्ट अंधाराचे साम्राज्य घरभर झालेले. आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात. फारसे लाइट जात नसल्याने आठवणीचे नीट आणि जागेवर मेणबत्ती ठेवायची सवयच मोडलेली. अंधारातच हात पाय धुवून पावले अलगद देवघराकडे वळली. काडेपेटी आणि तेल यांची जागा नक्की ज्ञात असल्याने सरळ देवापाशी दिवाच लावावा असे मनोमन ठरवून कार्यसिद्दी केली. एकदम मन 30 वर्षे मला मागे घेऊन गेले. पळस्पे सारख्या खेड्यात राहत असताना वीज जाण्याचे प्रकार नेहेमीचेच. अशा वेळी सायंकाळी खेळून घरी आल्यावर आई देवापुढे दिवा लावायची आणि मी शुभंकरोती, गणेश स्तोत्र, रामरक्षा आणि मारुती स्तोत्र म्हणायचो. आजही काहीसं तसच वाटलं. एकटाच देवापुढे बसून दिव्याच्या मंद प्रकाशात ही चारही स्तोत्रे मी मोठयाने म्हटली. रोज न म्हणताही सगळी स्तोत्रे अजूनही तोंडपाठ आहेत याचा अभिमान आणि आश्चर्य वाटलं. आईची या वेळी प्रकर्षाने आठवण होते आहे. त्यावेळी एक दिवा देवापाशी आणि दुसरा ओट्यावर ठेऊन तेवढ्याच अपुर्‍या प्रकाशात आई स्वयंपाक करायची आणि नंतर गरम गरम जेवायला वाढायची.
तो मंद दिव्याचा प्रकाश, त्याच्या उजेडात ट्यूब मधल्या रोजच्या उजेडापेक्षा जास्त आधार वाटत होता. पूर्वी रामरक्षा म्हटल्यावर जसा आधार वाटायचा अगदी तसा. ते काही क्षण एकटेपणा वाटला पण यावेळी तो हवा हवासा वाटत होता. अजून काही वेळ असाच देवासमोर बसून राहिलो. अगदी शांत.... आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:साठी, देवासाठी आणि देवासमोर आज आपण किती वेळ देतो.... विचार करूया....

-         मंदार कुलकर्णी
नोव्हेंबर २०१४ 

Monday, November 10, 2014

कालाय तस्मै नम:

              आज सहज विचार करत बसलो होतो. बऱ्याच वेळेला असं वाटते की इतिहासाची पाने परत एकदा मागे फिरवून पाहता आली तर? त्याही पेक्षा परत इतिहासात जाता आला तर कसं वाटेल…. सध्याच्या काही घटनांवरून त्याचा प्रत्यय आला.
              Office मध्ये दशकभरापूर्वी मंडळी ज्या साहेबाला report करायची तसंच आता काही जणांसाठी झालं आहे. रवि शास्त्री परत एकदा भारताच्या क्रिकेट टीम चा Manager झाला आहे. जसा १९९७-९८ मध्ये भा ज पा सत्तेवर आला आणि काँग्रेस विरोधी पक्षात बसत होते तसंच काहीसं परत झालं आहे. माधुरी दिक्षीत परत एकदा वेगळ्या मध्यमाद्वारे का असेना प्रेक्षकांसमोर आली आहे. तुम्हाला आठवतं का …. जेव्हा सर्वात आधी मोबाईल भारतात आले तेव्हा बिर्ला ए टी & टी ने सुंदर जाहिरात केली होती. एक जण दुसऱ्याला सांगत असतो…. "मला सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत या क्रमांकावर फोन करा. ११ ते ५ या क्रमांकावर आणि नंतर घरी या क्रमांकावर…" तर बिर्ला ए टी & टी चा म्हणतो, "मला कधीही मोबाईल वर या क्रमांकावर फोन करा…" नुकताच माझ्या एका मित्राने असाच मेसेज पाठवला… "मी टूर वर असून मला अमेरिकेमध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर, यु के मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर आणि नंतर चीन मध्ये या तारखांमध्ये या क्रमांकावर संपर्क साधा… !!!"
               एकेकाळी जेव्हा दूरचित्रवाणी नव्हतं तेव्हा आकाशवाणी हे एकंच माध्यम होतं आज दूरचित्रवाणी असूनही बहुतेक मंडळी FM आकाशवाणीच ऐकतात. पूर्वी अनेकांनी पितळेची भांडी वापरलेली असतील. मधल्या काळात स्टेनलेस स्टील ने पितळेला हद्दपार केलं पण आज लोकं कॉपर बॉटम ची भांडी परत वापरू लागले आहेत. पितळेचे बंब अनेकांची दिवाणखान्याची शोभा वाढवत आहेत.
कालाय तस्मै नम: …. हेच खरं…
- मंदार कुलकर्णी
२३ ऑगस्ट २०१४