Followers

Saturday, December 17, 2016

नेवासे



नेवासे

नेवासे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. मुळात हे गाव मुख्य रस्त्यावर म्हणजे high way वर नाहीये त्यामुळे येथे येताना नेवासा फाटा येथून आत वाकडी वाट काढून यावे लागते. नगर आणि औरंगाबाद च्या मध्ये असूनही इतिहास आणि पर्यटन या बाबतीत काहीसे मागे असलेले हे गाव आहे.

प्रवरा नदी हि येथे अमृतवाहिनी समजली जाते. अगस्तीऋषींच्या तपोभूमितून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्तीसंवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरी ला जाऊन मिळते. नेवासे तालुक्यातून या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांतील पाणी यांमुळे या तालुका सुपीक बनला आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत. पाण्यासाठी खर्‍या अर्थाने समृद्ध असलेल्या या गावाला राजकारणामुळे खुंटलेली प्रगती पहावी लागत आहे.

नेवासे आज प्रसिद्ध आहे ते ज्ञानेश्वरांनी येथे ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून. बहुसंख्यांना ज्ञानेश्वर म्हणजे आळंदी इतकेच माहिती असते त्यांच्या ज्ञानात थोडी भर. या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात म्हणजे 1291 साली भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो.
ॐ नमोजी आद्या |
वेद प्रतिपाद्या |
जय जय स्वसंवेद्या |
आत्मरुपा |
देवा तूंचि गणेशु |
सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्ति दासु |
अवधारिजो जी |
असे सांगून जगाचा उद्धार करणार्‍या ज्ञानेश्वरांनी ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे या गावात आहे. त्याला पैस असे म्हणले जाते.


नेवासे येथे मोहिनीराजाचे 75 फुट उंच एक खूप जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर हेमाडपंती कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे. या ठिकाणी पुरातत्व खात्याने उत्खनण केले असून येथे दगडी हत्यारे सापडली आहेत. त्यात हातकुर्‍हाडी सापडल्या आहेत. 1773 साली 5 लाख रुपये खर्च करून गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी या मंदिराचा जिणोद्धार केला आहे. शहाजी भोसले यांच्या वडिलांना वेरूळ ची जहागिरी असताना शहाजी भोसले नेवासे येथे च राहत होते अशी इतिहासात नोंद आहे. त्यांनी मोहिनिराजाच्या मंदिराला अनेक देणग्या दिल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर पेशव्यांनी वार्षिक रु 1500 देणगी देवू केली होती जी इ स 1860 पर्यन्त चालू होती.

नेवासा येथे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या मदतीने ज्ञानेश्वर पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीचे कथन करीत असलेले एक मोठे शिल्प नुकतेच नेवासे येथे मंदिराच्या मागे बसवण्यात आले आहे. त्या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सध्या चालू आहे. मला आशा आहे, त्या निमित्ताने का होईना हे गाव आणि हा सर्व परिसर भारताच्या नकाशावर येईल आणि आपल्या पुढील पिढ्यांना ज्ञानेश्वर महाराजांची आठवण करून देत राहील.



-     - मंदार कुलकर्णी

शनि शिंगणापुर

मी या दिवाळी सुट्टी मधे काही गावे पाहिली. "मी पाहिलेली काही गावे" ही सिरिज लिहीत आहे, त्याची आज सुरुवात करीत आहे.... 


शनि शिंगणापुर

शनि शिंगणापुर हे ठिकाण नगर जिल्यात नेवासा तालुक्यात सोनाई येथे असून ‘शनिदेवाचे स्थान’ म्हणून प्रसिद्ध आहे. नगर जिल्हा तसाही खूप शांत, शेतीसाठी समृद्ध. हे ठिकाण ही त्याला अपवाद नाही. मी येथे सर्व प्रथम गेलो होतो १९८९ साली. शनि देवाचे एक छोटेसे देवस्थान इतपतच माहिती होती. तेथे एक ५ फुट उंचीचा काळा उभा दगड आहे. हाच स्वयंभू शनिदेव. पूर्वी अशी कथा सांगतात, की हा दगड एका मेंढपाळाला जमिनीत दिसला. त्याच्या काठीने त्याने टोचून पाहिला तर त्यातून रक्त येवू लागले. रात्री शनि देवाने त्याच्या स्वप्नात येवून सांगितले आणि त्याची दर शनिवारी तेल वाहून पुजा करण्यास सांगितले. गावकर्यां्नी येथे मोठे मंदिर बांधायचे ठरवले पण शनि देवांनी तसे न करता फक्त पुजा करण्यास सांगितले. त्यामुळे आजही येथे मोठे मंदिर वा छत नाही. आकाश हेच छत आणि तेल हीच पुजा. शनि देवाचा दगड / शिळा ही स्वयंभू असून त्याला बाकी काही संरक्षण नाही. तेव्हा त्या चौथर्यान पर्यन्त आरामात जाता यायचे. शनि देवाच्या शिळेला कोणी स्पर्श करू शकत नाही. हे देवस्थान भारताला माहिती पडले ते “सूर्य पुत्र शनिदेव” या गुलशन कुमार यांच्या चित्रपटामुळे. तेव्हापासून येथे भक्तांचा ओघ सुरू झाला आहे.  

या ठिकाणाचे अजून एक महत्वाची विशेषता की शनि देवाच्या कृपेने येथे चोर्याण मार्याी होत नाहीत अशी श्रद्धा आहे. येथील घरांना बंद दारे नाहीत, बंद खिडक्या नाहीत. फक्त चौकटी आहेत. येथील रहिवासी त्यांच्या वस्तू बिनधास्त घरात सोडून जातात. जगातील हे असे एकमेव गाव असेल. येथील सरकारी रेशनचे दुकान काय बँक सुद्धा तशाच. मागील काही काळात छोटे मोठे चोर्यां चे प्रकार घडले पण ते फारच किरकोळ.
२०१६ साली खर्यां अर्थाने जगासमोर हे गाव आले. २६ जानेवारीला तृप्ति देसाई यांनी महिलांना येथे प्रवेश हवा म्हणून मोठे आंदोलन केले आणि तेव्हा पासून येथील गर्दी अजूनच वाढली.

आता या गावाचे पुर्णपणे व्यावसायिक अशा देवस्थानात रूपांतर झाले आहे. प्रचंड गर्दी आवरण्यासाठी लांबच लांब रांगा लावायची सोय, प्रसादाची सोय, शनि देवाला वाहण्यासाठी तेल मिळायची सोय आणि तेही मोटरने मोठ्या पिपातून पंप करून शनि देवावर वाहिले जाईल अशी सोय. नेहेमी प्रमाणे ‘इथे फोटो काढू नका; असे फलक आहेतच. 

हळूहळू हे देवस्थान गर्दीचे नवे उच्चांक मोडेल अशी स्थिती आहे पण या सगळ्यात हे स्थान पूर्वीची शांतता, प्रसन्नता गमावून बसते आहे की काय असे वाटते आहे. 

- मंदार कुलकर्णी

Sunday, February 21, 2016

बाजीराव मस्तानी (चित्रपट)

बाजीराव मस्तानी (चित्रपट)

18 डिसेंबरला बाजीराव मस्तानी हा चित्रपट रिलीज झाला. त्याच्या आधीपासून त्याच्या बद्दल आलेल्या कहाण्या, पिंगा आणि वाट लावली अशी गाणी ऐकून तर तो पाहायची इच्छा होत नव्हती. शेवटी 2 महिन्यांनी एक रसिक म्हणून (इतिहास विषयाची आवड आणि अभ्यास बाजूला ठेवून) मी तो पाहिला आणि खरे सांगतो, डोके उठले आणि डोके दुखायला लागले.

निनाद बेडेकर सारख्या इतिहास तज्ञाचे नाव पुढे करून संजय लीला भन्साळी इतिहासाची इतकी मोडतोड करतील असे वाटले नव्हते. निनाद बेडेकर जर आज जीवंत असते तर मी तडक त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली असती. मुळात संजय लीला भन्साळीना बाजीराव पेशवे समजलाच नाहीये. एखादी ऐतिहासिक कलाकृती बनवताना जी काळजी घ्यायला पाहिजे ते दिसत नाही. उदा.
1.   पेशवे हे भारतभर पसरलेल्या मराठा साम्राज्य चालवणारे मोठे प्रस्थ होते. शाहू केवळ नामधारी होते. त्यामुळे हा चित्रपट बनवताना एक साम्राज्याचे पंतप्रधान/राजे असेच दाखवणे आवश्यक होते
2.   बाजीरावाने बायकोला काशी/काशीबाई हाक मारणे
3.   केशवपन केलेल्या राधाबाई ने घरात मोकळे डोके दाखवणे
4.   बाजीराव आणि काशीबाई चा so called टब बाथ
5.   बाजीरावाच्या तोंडी असलेले वाट लावली गाणे
6.   काशीबाई आणि मस्तानी यांचे पिंगा गाणे
7.   इतिहासाप्रमाणे मस्तानी तिच्या महालात नजरबंद होती, साखळ दंडाने कधीच बंदिस्त नव्हती.
8.   आणि असंख्य ....

बाजीराव आणि मस्तानीचे लग्न झाले होते आणि ती त्याच्या बरोबर बुंदेल खंडाहून वाजत गाजत आली होती. इथे मात्र भलतेच दाखवले आहे.

एक राज घराण्यातील संघर्ष कसा दाखवावा याचेही भान या चित्रपटाने पुर्णपणे सोडले. एक प्रेमकथा दाखवताना चिमाजी आप्पा, राधाबाई  आणि नानासाहेब पेशवे यांना पार खलनायक केले आहे. राज घराण्यातील संघर्ष इतक्या उथळपणे आणि तद्दन मसाला हिन्दी चित्रपटाप्रमाणे दाखवला आहे....

पूर्वीच्या काळी ही असे चित्रपट आले. उदा. मुगले आझम पण त्याची नखाची ही सर या चित्रपटाला नाही. अनेक जण या चित्रपटाची मुगले आझमशी तुलना करतात. पण सलीम अनारकलीच्या हळुवार प्रेमाची इथे कुठेच जवळीक नाही. एक चुकीची प्रेम कहाणी दाखवताना इतिहासाची यांनी पार “वाट लावली”.

मला इथे एकच प्रश्न विचारावासा वाटतो. हाच चित्रपट जर इंग्लंडची राणी एलिझाबेद/ लेडी डायना, छत्रपती शिवाजी, मुगल सम्राट औरंगजेब किंवा आजच्या काळातील बिल क्लिंटन किंवा बराक ओबामा यांच्यावर ऐतिहासिक कलाकृती म्हणून बनवला असता आणि cinematic liberty ची ढाल घेऊन असे अर्वाच्च प्रकार घुसवले असते तर प्रेक्षकांना चालले असते का? त्यांच्या अंत:पुरातील गोष्टी अशा उथळ पणाने दाखवून चालले असते का?

Cinematic liberty घेताना किती घ्यायची याचे ही काही ताळतंत्र हवे. आज राज घराण्यातील स्त्रिया त्याही राणी पदावरील काशीबाई अशा नाचतील का? बाजीराव स्वत: असे नाचेल का? याचे साधे भान ही असू नये?

काही जण म्हणतात, इतका भव्य चित्रपट बनवला, त्याने 350 कोटी रुपये कमावले, पण त्यात भव्य काहीच दिसले नाही. केवळ संगणकावर बनवलेल्या लढाया आणि बाजीरावाने केलेले बच्चन सारखे काही स्टंट. यात कसली आली आहे भव्यता? ना हा चित्रपट बाजीरावाची यशोगाथा सांगत ना प्रेमकहाणी नीट दर्शवत. मस्तानी बाजीरावाला भेटण्यापूर्वी एक हुशार, लढाऊ राजकन्या होती. तीच नंतर अतिशय अगतिक, हताश, गळीतगात्र आणि नाच करणारी अशी का दाखवली आहे? चित्रपटात बाजीराव बहुतेक काळ आपल्या सिक्सपॅकचे प्रदर्शन करत फिरत असतो किवा काशीबाई किंवा मस्तानी बरोबर प्रेमाचे चाळे. यात राजेपण कुठेच नाही. ज्या बाजीरावाने मराठा साम्राज्य महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन दिल्ली पर्यन्त गवसणी घातली, ज्याच्या मुलाने (रघुनाथ) आजच्या अफगाणिस्थान मधील अटक येथील किल्ला सर करून मराठा साम्राज्य विस्तारले, त्या बाजीरावाला मस्तानी च्या प्रेमातील देवदास बनवला आहे. बाजीरावाचा मृत्यू अतिश्रमाने, ताप आणि उष्मा घाताने झाला आणि चित्रपटात तर भलतेच.

ह्या सिनेमाविषयी मत प्रदर्शन केवळ सिनेरसिक किंवा पेपर मधील परीक्षण करताना जाणवते की, एका मराठी साम्राज्याच्या अत्यंत यशस्वी राजाची यशोगाथा करायची सोडून मस्तानी सारख्या नाचणार्‍या मुलीच्या प्रेमात पडलेल्या वेड्याची गोष्ट अशी तद्दन फिल्मीकहाणी केली आहे. तिथेच हा चित्रपट प्रेक्षकांची शुद्ध फसवणूक करतो. उभ्या उण्यापुर्‍या 20 वर्षाच्या कारकिर्दीत एकही लढाई न हरणारा हा जगातील एकमेव राजा असताना त्याच्या विषयी असा चित्रपट काढणे हे भारतीय चित्रपट सृष्टीचे दुर्दैव आहे....

-     - मंदार कुलकर्णी
21 फेब्रु 2016


Monday, January 4, 2016

राष्ट्रपती भवन

माझ्या आर्मी मधील लेफ्ट. कर्नल या पदावर असलेल्या भावाच्या कृपेने नुकतेच राष्ट्रपती भवन पहायचा योग आला. बहुतेक सर्व पर्यटक इंडिया गेट, राजपथ इत्यादी ठिकाणे पाहतात. राष्ट्रपती भवन पहाण्यासाठी एकतर पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि तीही खूप मर्यादित संख्येने लोकांना मिळते. साधारण 10 ते 30 जणांचा ग्रुप बनवतात आणि प्रत्येक ग्रुप बरोबर एक मार्गदर्शक राष्ट्रपती भवनाचा काही भाग पर्यटकांना दाखवतात. या सफरी विषयी अधिक लिहिण्यापुर्वी ‘राष्ट्रपती भवन’ आणि त्याचा जुजबी इतिहास सांगतो.
राष्ट्रपती भवन म्हणजे आपले आदरणीय राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांचे घर आणि कार्यालय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या व्यक्तीचे घर आणि कार्यालय एकच? तर हे ठिकाण 320 एकर मध्ये उभे केलेले असून त्यात 340 खोल्या आहेत. मुळात याचे पूर्वीचे नाव ‘व्हॉईसरॉय हाऊस’ असे आहे. 1910 साली इंग्रजांनी (ब्रिटिश) भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्ली येथे हलवायचे ठरवले. नवीन शहराचे नियोजन करायचे काम एडविन लुतेन याने केले. जुन्या दिल्लीजवळ साधारण 4000 एकर जागा मोकळी करून तेथे नवीन शहर वसवायचे ठरले. तेच आजचे ‘नवी दिल्ली’. त्यासाठी रायसिना आणि मलचा ही खेडी पुर्णपणे विस्थापित करण्यात आली आणि जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. एडविनच्या डिजाइन चे वैशिठ्यच हे की जे करेल ते सारे भव्यदिव्य. जवळ जवळ 20 वर्षे याचे बांधकाम चालू होते. असंख्य वेळा दिल्ली आणि इंग्लंड अशा वार्‍या त्याने केल्या. 1929 साली अखेर ते पूर्ण झाले.
4 मजले, 340 खोल्या, 19000 वर्ग मिटर क्षेत्रफळ, बांधकामासाठी लागलेल्या 70 कोटी विटा आणि 85000 वर्ग मी चे दगड यावरुन भवनाच्या भव्यतेची कल्पना येईल.
राष्ट्रपती भवनामधील मुघल गार्डन आणि इतर गोष्टी ही तितक्याच प्रेक्षणीय. त्यात काही मुझियम आहेत. राष्ट्रपतीना वेगवेगळ्या देशाच्या भेटीत मिळालेल्या भेटवस्तू आहेत, अगदी काटा चमच्या पासून ते किचन सेट पर्यन्त. भवनाच्या प्रांगणात मोर मनसोक्त फिरत असतात. कडेकोट सुरक्षा आणि थोडेसे दहशतीचे वातावरण यात काही तास निघून जातात.
ही वास्तू पाहताना माझ्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते. आज जरी ते आपल्या राष्ट्रपतीचे निवासस्थान असलं तरी एकेकाळी ते इंग्रजांच्या ‘व्हॉईसरॉयचे घर’ होते. ‘व्हॉईसरॉय ऑफ इंडिया’ असे ते पद होते. नाही म्हटले या पदावरील व्यक्ती इंग्लंडच्या राणीला सलाम करणार आणि तिने दिलेल्या पगारावर जगणार. अशा व्यक्तीचे घर आपल्या देशाच्या सर्वोच्च व्यक्तीने का घ्यावे आणि वापरावे? व्हॉईसरॉय हा शेवटी राणीचा नोकरच ना...
राष्ट्रपती भवनात आम्ही जे कक्ष पाहिले त्यात सर्व इंग्रजांच्या काळातील आठवणी जपल्या होत्या. 19 व्या शतकातील इंग्लंडचे राजे, राण्या, व्हॉईसरॉय आणि अनेक जणांची तैलचित्रे. संगमरवरचे पुतळे, त्याचा मनमरातब हेच सर्व काही. यात ‘भारतीय’ असे काहीच नव्हते. इंग्रजांचे राजे आणि राण्या यांचे कौतुक पाहायचे तर मी इंग्लंडला जाऊन पाहीन. राष्ट्रपती भवन हे त्याचे ठिकाण असू शकत नाही. उगाचच गुलामगिरीत परत गेल्यासारखे वाटले.
दुसरा मुद्दा. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आज लाखो लोक फुटपाथ वर, रस्त्यावर झोपतात तर खरेच महामाहीम राष्ट्रपती यांना 320 एकर जागेतले घर कशाला पाहिजे? गेल्या वर्षी पर्यन्त हेच राष्ट्रपती भवन हे जागेच्या क्षेत्रफळांनुसार ‘जगातील सर्वात मोठे राहण्याचे ठिकाण’ होते !!! लहान घरात राष्ट्रपती यांनी का राहू नये? व्हॉईसरॉयच्या राहण्याच्या सोयीसाठी बनवलेली वास्तू संग्रहालयात रूपांतरित करून, त्यातून स्वदेशी आणि विदेशी पर्यटक आकर्षित करून परकीय गंगाजळी मिळवायला हवी. राष्ट्रपती यांची अशी अनेक घरे आज भारतात आहेत. उदा. ‘राष्ट्रपती नीलायम’, हैदराबाद. कशासाठी? आपल्या घटनेप्रमाणे राष्ट्रपती ही सर्वोच्च व्यक्ती असली तरी त्यांचे सर्व महत्वाचे अधिकार हे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ हे घटनेप्रमाणेच वापरतात. मग आजच्या काळात एवढा बडेजाव खरच हवा का?
एकंदरीत ही वास्तू मनापासून आनंद आणि अभिमान वाटण्यापेक्षा जास्तीचे प्रश्न निर्माण करून गेली.....

- मंदार कुलकर्णी
3 जाने 2016