युगांत
कालपासून टीव्ही आणि इंटरनेट वर आणि आज पेपरात अटलजींच्या बद्दल इतके काही चांगले लिहून आले की मी पामर त्यात काय भर घालणार?
अटलजी यांनी ज्या पद्धतींचे संघटनेचे कार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जन संघ आणि भा ज पा असे चौफेर कार्य केले ते खरेच अनुकरणीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अडवाणी पासून प्रमोद महाजन, मोदी यांच्यापर्यंत किती जणांनी काम केले.
पंतप्रधान पद मिळूनही हा मनुष्य काही बाबतीत कमनशिबीच राहिला. संसदेत इतके वर्ष राजकारणात राहूनही प्रत्यक्ष राज्य करायची संधी त्यांना कमीच मिळाली. 23 पक्षांचे कडबोळे असलेले सरकार त्यांना चालवावे लागले. अगदी छोट्या छोट्या पक्षांनी ही लायकी नसताना त्यांच्यावर गुरगुरण्याचा कायम प्रयत्न केला मग तो शिवसेना असुदे किंवा जय ललिता.
213 जागा मिळवूनही NDA सोडून बाकीच्या पक्षांनी मदत न केल्याने बिचाऱ्यांना 13 दिवसात सत्ता बहुमत मिळवता या आल्याने सत्ता सोडावी लागली. त्यांच्या दुर्दैवाची परिसीमा म्हणजे केवळ एक मताने पडलेले त्यांचे सरकार. अखिल जगात लोकशाही नांदणाऱ्या सर्व देशांमध्येही कधीही एका मताने विश्वास दर्शक ठराव ठरल्याचे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. आधी शब्द देऊनही काही पक्षांनी आयत्या वेळी गद्दारी केली आणि अटलजींना 17 नोव्हे 1999 रोजी केवळ 13 महिन्यात राजीनामा द्यावा लागला. 1999 ते 2004 उत्तम काम करूनही पुढच्या निवडणुकीत देशाने त्यांना नाकारले आणि त्यांची कारकिर्दच संपली आणि ते विजनवासात गेले.
2015 साली भा ज पा सरकारने त्यांना भारतरत्न दिले पण तेव्हा विस्मृतीच्या विकाराने ते ग्रस्त होते. काय म्हणावं या नशिबाला... 93 वर्षे आयुष्य लाभलेल्या या भीष्माचार्यांना खऱ्या भीष्माचार्यांसारखेच कमनशिबी ठेवले. राजा असूनही राज्य नाही. सत्ता असूनही सत्तेत नाही. कवी मनाच्या या हळव्या माणसाला त्यांच्या शेवटच्या काळात भावना आणि जाणिवा कळू नयेत या पेक्षा दुर्दैव ते काय?
ज्या मूकपणे पोखरण अणूचाचणीचा निर्णय त्यांनी दिला त्याच मूकपणे त्यांनी जगाचाही निरोप घेतला. ज्या पक्षाच्या स्थापनेपासून कष्ट उपसले, तो पक्ष आज अख्या देशात एकहाती आणि 20 राज्यात सत्ताधारी आहे हे त्यांच्या मेंदूपर्यत पोहचूच शकले नाही. त्यांच्या पायाशी ही बसायची लायकी नेसलेल्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर वेळोवेळी भरपूर तोंडसुख घेतले, त्यांच्यावर बेदरकार आरोप केले. पत्रकारितेनेही त्यांनी इंदिरा गांधींना कधीही 'दुर्गा' म्हटलेले नसताना अकारण त्यांच्या तोंडी ते शब्द घालून इंदिरा गांधींना उगीचंच आभाळापेक्षा मोठे बनवले.
अटलजींपेक्षा वय आणि मानाने लहान असलेली दुसऱ्या पक्षातली अनेक मंडळी राजकारणात खूप पुढे निघून गेली आणि अटलजी मात्र आपले संस्कार, आपली तत्वे उराशी कवटाळून शेवट पर्यंत वाटचाल करीत राहिले.
असा हा इतिहासपुरुष आज आपल्याला कायमचा सोडून गेला. एका युगाचा अंत झाला, युगांत झाला.
- मंदार कुलकर्णी
17 ऑगस्ट 2018
No comments:
Post a Comment