Followers

Monday, October 1, 2018

गणेश विसर्जन

काल मी एक वेगळी पोस्ट सोशल मीडिया वर टाकली होती. विशेष म्हणजे त्या पोस्टला एकाही व्यक्तीने कमेंट केले नाही किंवा लाईक केले नाही. मी स्वतः अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी पुणे शहरातून प्रवास फेरफटका मारला होता आणि प्रत्यक्ष दर्शन करून ही पोस्ट टाकली होती. गणेश विसर्जन म्हणजे सुट्टी आणि चुकूनही घरातून बाहेर पडायचे नाही हे बहुतेक मध्यम वर्गीय किंवा उच्च वर्गीयांनीं ठरवले आहे असे दिसते आहे. एकतर घरात किंवा पुण्याबाहेर असे दोनच पर्याय दिसून येतात. कारण ही त्याला असेच आहे. मुरवणुकीत चालणारा गोंधळ, ढकला ढकली, विशेषतः महिलांशी होणारे असभ्य वर्तन यामुळे बरीच मंडळी त्या दिशेला जातच नाहीत. पण त्यामुळे या लोकांचे फावते हे कोणाच्या लक्षात येते आहे का? रस्त्यावरून बेधुंद होऊन गाड्या चालवणे, मद्यपान करून रस्त्यात धांगडधिंगा घालणे, नशा करून वेड्यासारखे 2 - 2 दिवस मिरवणुकीत भटकत राहणे आणि आपल्या पिताश्रींचा रस्ता असल्यासारखी गुंडगिरी करणे.

या अशा प्रकारच्या दहशतीमुळे दिवसेंदिवस गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, शिवजयंती अशा उत्सवांना बाहेर पडणे अशक्य झाले आहे. यालाच अघोषित संचारबंदी असे म्हणतात. येथे एक नोंद नक्की घ्या, मी स्वतः अण्णाभाऊ साठे व्याख्यान मालेत त्यांच्यावरच एक भाषण फर्ग्युसन महाविद्यालयात केले आहे.

अशा प्रकारच्या दहशतीचे वातावरण असेच चालू राहिले तर वर्षातील निम्मे दिवस आपल्याला घराबाहेर पडणे अशक्य होईल याची आपल्याला कल्पना आहे का? लोकशाहीमध्ये संपूर्ण भारतात कधीही कुठेही फिरण्याचा आणि राहण्याचा जन्मसिद्ध अधिकार आपल्याला दिलेला आहे. पण अशा पद्धतीने दहशतीमुळे कुठे जाण्यास आपल्याला मज्जाव केला जात असेल तर कसे चालेल?

मताच्या लालसेपोटी जर अशा जमवावरती काहीच कारवाई होताना दिसत नाही. समाजातील सुज्ञ व्यक्ती, अधिकारी आणि राजकारणी यांचे या विषयावर काय म्हणणे आहे? ही परिस्थिती बदलण्यासाठी ते काय प्रयत्न करतील?

- मंदार कुलकर्णी
24 सप्टेंबर 2018


No comments:

Post a Comment