लोकसभेचे निकाल 23 मे लागले आणि मोदी लाटेमध्ये सगळे विरोधी पक्ष वाहून गेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA ला 353 जागा मिळाल्या आणि मोदीच पुढील 5 वर्षे पंतप्रधान राहणार हे नक्की झाले. मोदींऐवजी कोण ह्या अनेक महिने चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि आता मंत्रिमंडळात कोण याची चर्चा सुरू झाली. पण ह्या सगळ्या प्रकारात महाराष्ट्रात युतीला 41 जागा आणि आघाडीला 5 जागा का मिळाल्या हे पाहायला कोणाला वेळ झालेला दिसत नाही.
मुळात एकतर 7 फेऱ्यात लांबलेली निवडणूक, त्यात महाराष्ट्रात 4 फेऱ्या आणि मतदान झाल्यानंतर 3 आठवड्याने लागलेले निकाल यामुळे सगळ्या गोष्टी अतिशय संथपणे चालू होत्या. 2 पक्षांनी आघाडी आणि दोन पक्षांनी युती करायचे आधीच ठरलेले असल्याने बाकी पक्षांना फारसे कोणी विचारात घेतले नाही. त्यात मनसे, वंचित आघाडी आणि इतर अनेक छोटे छोटे पक्ष आले. या सर्वांचा बारकाईने विचार केला तर काही गोष्टी लक्षात येतात.
1. राष्ट्रवादीची इच्छा असूनही काँग्रेसला नको असल्याने मनसे आघाडी मध्ये येऊ शकली नाही. याचा त्यांना बऱ्याच प्रमाणात फटका बसला. जर या 3 पक्षांनी खरंच आघाडी केली असती आणि राज ठाकरे यांनी हक्काने मतं मागितली असती तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते. मनसेने स्वतः लोकसभा निवडणुकीत भाग न घेता फक्त प्रचारसभा घेऊन आघाडी साठी मतं मागितली पण त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही. त्यांनी एकूण 10 प्रचार सभा घेतल्या त्यातील 7 ठिकाणी आघाडीचे उमेदवार सपशेल पडले. ज्या 3 ठिकाणी जिंकले त्या ठिकाणी आघाडीचे उमेदवार हे स्वतःच्या जीवावर जिंकून येण्याच्या ताकदीचे होते. उदा भोसले, सुळे आणि तटकरे. यांना जिंकण्यासाठी मनसेची मदत लागली हे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल.
2. एकूणच राज ठाकरेंच्या सभांनी गर्दी केली पण 'लाव रे तो व्हिडीओ' ने मनोरंजनच जास्त झाले. आणीबाणीच्या काळात पु ल नी अशाच सभा घेऊन इंदिरा गांधी यांना पायउतार केले पण ती गोष्ट राजना जमली नाही. मुळात सभा गाजवणे आणि त्याचे मतपेटीत परिवर्तन होणे ह्या गोष्टी त्यांना आतापर्यंत जमल्या नाहीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 220 उमेदवार उभे करून फक्त 1 जागा मिळाली. यातच आपली काहीतरी गडबड होते आहे हे त्यांनी अजून लक्षात घेतले नाही. शिवाय 'कमरेखालची भाषा' ही शिट्या मारायला चांगली दिसत असली तरी बहुसंख्य मतदार अशा वाक्यांना मतपेटीत परावर्तित करत नाही.
3. वंचित आघाडीला एकूण 41 लाख मते मिळाली आणि त्यांनी आघाडीची बरेच मते खाल्ली. एका अभ्यासानुसार जवळपास 9 जागी युतीला याचा फायदा झाला. मुळात वंचित आघाडीला मिळालेली मते ही बहुसंख्य एका जातीची किंवा पोटजातीची अशीच मिळाली आहेत. त्यांचा फार फटका युतीला झालेला दिसत नाहीये. पण विधानसभेची गणितं या मुळे नक्की बदलणार आहेत.
4. युतीला 41 आणि विशेषतः शिवसेनेला इतक्या जागा मिळायचे एकमेव कारण म्हणजे मोदी लाट. त्यातही लोकसभेच्या प्रत्येक जागी जणूकाही स्वतः मोदीच उभे आहेत असे मनात धरून लोकांनी मतदान केले. कांचन कुल यांना 5.5 लाख मते मिळणे किंवा तटकरे थोडक्यात जिंकणे हे त्याचेच लक्षण आहे. काही ठिकाणी तर आघाडीचा चांगला आणि शिकला सवरलेला उमेदवार असतानाही जनतेने युतीला डोळे झाकून मते दिली. शिवसेनेने यामुळे परत एकदा शेफारून जायची आणि गेली 5 वर्षे ज्या पद्धतीने भाजपा ला पाण्यात पाहिले आणि पाणउतारा केला तसे आतातरी करायची गरज नाही. एकट्याने निवडणूक लढवली की काय अवस्था होते हे त्यांच्या 2014 विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून एव्हाना लक्षात यायला हवे.
5. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकूण निकालाकडे पाहून आतातरी मनःशांती केंद्रात जाऊन ध्यान करून यायला हवे. ज्या अतिरेकी पद्धतीने चुकीचा आणि खोटेपणा करीत त्यांनी 5 वर्ष tv गाजवला आणि ऐन निवडणुकीत 'लाज कशी वाटत नाही' असली तद्दन शिट्या मारी जाहिराती केल्या त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मुळात विरोधी पक्षांकडे मुद्देच नव्हते आणि विरोधी पक्षात असूनही आपल्याला आपल्या मतदारसंघात किंवा राज्यात काही विधायक काम करता येते हेच ही मंडळी विसरून गेली. फक्त कर्ज माफी करा असा धोशा लावून लोकांना तुम्ही खुश करू शकत नाही, त्यासाठी कामही करावं लागतं. काँग्रेसला तर विधानसभा नेताच स्वतःकडे टिकवता आला नाही, या पेक्षा दुर्दैव ते काय... अंतर्गत कुरघडी, राहुलचे शून्य संघटन कौशक्य आणि आपसातील हेवेदावे या मुळे आघाडीची कमालीची वाट लागली. यातून ते कधी सावरतील असे वाटत नाही.
एकूण काय, तर संपत चाललेला विरोधी पक्ष म्हणजे आघाडी, रसातळाला गेलेली मनसे आणि मत खाण्यासाठी वापरली गेलेली वंचित आघाडी यामुळे युतीचे काम अगदीच सोपे झाले. यातून प्रत्येक पक्षाने आपल्याला योग्य तो मेसेज घेतला म्हणजे मिळवली... नाही का.
- मंदार कुलकर्णी
30 मे 2019

