Followers

Thursday, January 16, 2020

धोनी युगाचा अंत?

धोनी युगाचा अंत?

यष्टीरक्षक या विषयात भारतीय संघाची कायमच अडचण झालेली आहे. पूर्वीच्या काळी चांगले यष्टीरक्षक झाले नाहीत असे नाही जसे किरमाणी, सदानंद विश्वनाथ, किरण मोरे पण कायमस्वरूपी उत्तम प्रदर्शन आणि एकहाती सामना जिंकून द्यायचे कसब त्यांच्यात नव्हते. भारतीय संघानेही या गोष्टीचा फार कधी विचार केला नाही आणि अगदी राहुल द्रविडच्या हातातही यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज घालायला लावले.

२००३ मध्ये धोनीची भारतीय संघात निवड झाली ती यष्टीरक्षक फलंदाज म्हणून. झाशीचा एक होतकरू खेळाडू आणि यष्टीच्या मागे फारशी बडबड न करणारा आणि शांत डोक्याने खेळणारा अशी त्याची ओळख होती. काळाच्या ओघात गांगुली, द्रविड, लक्ष्मण, सेहेवाग आणि सचिन यांच्या करियरला उतरती कळा लागली आणि पुन्हा संघ बांधणीची गरज भारताला वाटू लागली. २००७ मध्ये संपुर्ण नवीन संघाची धुरा धोनीकडे आली आणि कोणीही फारशी अपेक्षा नसताना पहिला टी २० कप भारताने जिंकला आणि धोनी एकदम प्रकाश झोतात आला आणि सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला. अगदी पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ हेही त्याला अपवाद नाहीत.

एक यष्टीरक्षक संघामध्ये चढत चढत थेट कप्तान पदापर्यंत जाऊ शकतो ही घटना भारतीय क्रिकेट नव्हे तर जगातील कोणत्याही क्रिकेट संघाला तशी नवीनच होती. कोणत्याही संघाचा कप्तान लॉंग ऑन, लॉंग ऑफ किंवा स्क्वेअर लेग ला उभा राहून गोलंदाजाला प्रत्येक चेंडूला सूचना द्यायचा किंवा हुरूप द्यायचा आणि धोनी मात्र यष्टीच्या मागे उभा राहून शांतपणे यष्टीरक्षण करायचा. अगदी क्वचित गोलंदाजाला सुचना द्यायचा. ही गोष्टच फार नवलाईची होती पण गोलंदाजावर आणि आपल्या खेळाडूंवर प्रचंड विश्वास ठेऊनच धोनी एक एक सामने आणि मालिका जिंकत गेला आणि २०११ चा वल्ड कप भारताने जिंकला. त्यानंतरही तो खेळत राहिला आणि अनेक मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला पण २०१५ आणि २०१९ मध्ये भारताला वल्ड कप जिंकता आला नाही.

धोनीचे क्रिकेट मधील एक वैशिष्ट्य म्हणजे मैदान आणि मैदानाबाहेर कायम दिलेले सरप्राईज. वेळोवेळी फलंदाजीत अचानक केलेले बदल, अगदी २०११ च्या अंतिम सामन्यात संघाची गरज समजून स्वतः वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येणे किंवा कोणीही धक्का न मारता विराट कोहलीला कप्तान पद देणे या साऱ्या गोष्टी सरप्राईज पेक्षाही सर्वांना आनंद आणि त्याच्याबद्दल कौतुकयुक्त आदर वाढवणाऱ्या होत्या.

मधल्या काळात त्याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आणि आणि आपण एक दिवसीय सामने खेळू असे त्याने जाहीर केले होते. इथेही प्रस्थापित खेळाडूंपेक्षा जरा वेगळेच. बाकी खेळाडू ५ दिवसाचे संथ कसोटी क्रिकेट खेळतात आणि धावपळीच्या एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतात पण धोनीचे उलटेच. कोणत्याही खेळाडूला तो उच्च शिखरावर असताना निरोप देणे हा त्याच्या सहकाऱ्यांचा आणि आपल्या सारख्या पाठीराख्यांचा आनंदाचा विषय असतो. त्या हिशोबाने खरेतर धोनी ने २०१५ च्या आसपासच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला हवी होती पण तो खेळतच राहिला. मधल्या काळात त्याने आराम केला पण अजून त्याचे क्रिकेट खेळणे बाकी आहे हे त्याने वेळोवेळी त्याने दाखवले. जुलै २०१९ च्या वल्ड कप मध्ये मात्र त्याच्या सर्व मर्यादा आणि अति अभिमान दिसून आला आणि भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंड कडून अपमानास्पद पराभव पत्करला. सामन्याच्या गरजेप्रमाणे आधी वेगात धावा न करता अगदी शेवटी अशक्य धावा करायचा प्रयत्न त्याचा फसला आणि तो अपेक्षेप्रमाणे टीकेचा धनी झाला. त्यानंतर आज पर्यंत धोनी एकही सामना खेळलेला नाही आणि त्याचे चाहते त्याच्या निवृत्तीची वाट पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी धोनी च्या जीवनपटावर एक चित्रपट ही येऊन गेला. पण धोनी निवृत्तीचे नाव काढत नाहीये. त्याचे वय, त्याचा अनुभव आणि त्याचे भारतीय क्रिकेट मधील स्थान याचा विचार करून BCCI सुद्धा त्याला वाईट वागणूक देत नव्हती पण आज अखेर BCCI ने धोनीला वार्षिक कंत्राटामध्ये घेतले नाही. ज्या सौरव गांगुली  च्या कप्तान पदाखाली धोनी एकेकाळी तयार झाला त्याच गांगुलाला BCCI अध्यक्ष म्हणून आज त्याच्या विरुद्ध अशा पध्दतीने पाऊले उचलावी लागली आहेत.

कायम काळाची पावले ओळखून आपले निर्णय घेणारा धोनी आपला निवृत्तीचा निर्णय इतके वर्ष का लांबवत आहे हे न सुटलेले कोडेच आहे. पण माझ्या सारख्या त्याच्या चाहत्याला त्याने आधी सांगून शेवटचा सामना खेळून निवृत्ती घेतली असती तर जास्त आनंद झाला असता. क्रिकेटपटूची मैदानावरील निवृत्ती आणि मैदानाबाहेर होणारी निवृत्ती यात किती फरक असतो हे आपण जाणतो. निदान धोनीच्या नशिबी रुबाबात निवृत्ती अजून आहे का हे येणारा काळच सांगेल...

© मंदार कुलकर्णी
१६ जाने २०२०

No comments:

Post a Comment