Followers

Wednesday, February 3, 2021

देवा पाहिले या जन्मी

 


मित्राशी चर्चा करीत असताना पूर्वीची एक घटना आठवली. ती त्याला थोडक्यात सांगितली पण त्याचा विश्वासच बसेना, म्हणाला ही घटना कशी घडली आणि काय झाले हे लिहायचा प्रयत्न कर. खूप जणांना छान वाटेल. म्हणून हा थोडासा प्रयत्न.

काही वर्षांपैकी आमच्या फॅमिली मित्रांनी अहमदनगरहून मोरगाव आणि वाटेत काही प्रेक्षणीय आणि धार्मिक ठिकाणी असे पहायचे ठरवले होते. प्लॅन मध्ये असे होते, रांजणगाव गणपती करून शिरूर सातारा रस्ता पकडून मोरगाव गणपती - मयुरेश्वर गाठायचा आणि तिथे मुक्काम करायचा. पुढची अजून मंदिरे दुसऱ्या दिवशी पाहून परत नगर कडे येणे. स्पेशल बस बुक केली आणि ठरल्याप्रमाणे ऑफिस, शाळा झाल्यावर संध्याकाळी नगरहून निघालो. रात्री शिरूडच्या पुढे रस्ता जाम झाला. चालकाने खाली जाऊन चौकशी केली तर माहिती मिळाली की पुढे भीमा नदी आहे आणि प्रचंड पावसाने दुथडी भरून आणि जास्त वेगाने तर जात आहे. तिच्यावर असलेल्या पारगाव पूल या वरूनच नदीचे पाणी जाते आहे. मोरगावला जायला हाच पूल आणि हाच रस्ता असल्याने रस्ता जाम. 




आम्ही खाली उतरून आजूबाजूच्या लोकांनाकाही चौकशी करायचा प्रयत्न केला. त्यांना म्हटले, आम्हाला पलीकडे जायचे, काही वेगळा मार्ग आहे का? त्यांनी आम्हाला हसायला सुरुवात केली. आज सकाळ पासून भीमा नदी रौद्ररूप आम्ही पाहिले आहे. सकाळी पुलावर १० फूट पाणी वाहत होते आणि काही वाहनेही पाण्याच्या जोराने वाहून गेली पण आता जरा जोर थोडा कमी झाला आहे. पण वाहने जाऊ शकतील का हे सांगू शकत नाही. हलकी वाहने या पाण्यात काही क्षणात वाहून जातील.

एकतर भूक लागलेली, त्यात रस्ता बंद आणि पुढचा मार्ग कधी आणि कुठून निघेल हेच कळत नव्हते. आम्ही मित्रांनी थोडी चर्चा केली पण मार्ग काही निघत नव्हता. एकजण म्हणाला, आपण आहे तिचेच थांबू बसमध्ये आणि पाणी कमी व्हायची वाट पाहू. दुसऱ्याने सल्ला दिला, बसमध्ये नुसते बसून राहण्यापेक्षा जरा देवाचे नाव घेऊ, गणपतीचे स्तोत्र , राम रक्षा, मारुती स्तोत्र अशी स्तोत्र आपल्या सर्वांना येते, आपण सगळे मोठ्या आवाजात म्हणू. देवाला आपली हाक ऐकू आली तर पाहू या. सर्वजण बसमध्ये अंधार असूनही छान मांडी घालून, ताठ बसून स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. ४-५ स्तोत्र म्हणेपर्यंत अर्धा तास गेला. इतक्यात काही बाहेत काही हालचाल होतीय असे वाटू लागले. बाहेर २-३ बसवले आपण पाण्यात घालूया का अशी चर्चा करित होते. पण चालक मंडळींचा याला पूर्ण विरोध होता. बस वाहून गेली आणि आणि आमचा जीव गेला तर कोण जबाबदारी घेणार? असा त्यांचा स्पष्ट त्यांनी विचारला. बसमधील प्रवासी विरुद्ध चालक अशीच चर्चा अनेक बसमध्ये, नवीन प्रश्न आणि या संदर्भातील प्रश्न आणि त्यांची वाद मय चर्चा चालू होती. रस्ता कसा आहे, पाणी किती उंच आहे, पुलावर रस्त्याची काय परिस्थिती आहे, काही अंदाज नसल्याने कोणतेच चालक अजिबात तयार होत नव्हते. त्यामुळे इथे एकमत काही होईना.

इतक्यात एक अनोळखी माणूस आमच्या इथे आला. म्हणाला मी तुमच्या मोकळे करतो. बसच्या पुढे पाण्यातून चालतो. माझी उंची ६ फूट आहे, त्यामुळे माझा पाण्यातील आणि पाण्याबाहेर भाग पाहून तुम्हाला पाणी नक्की आहे हे कळेल. बसच्या लाईट मध्ये मी तुम्हाला कायम दिसेल. माझ्या मागे बरोबर पूल पार करा. मी इथलास आहे, त्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. काळजी करू नका. 

बसचे चालक आपल्या प्रवाशांची चर्चा करायला गेले पण त्यांचे एकमत होईना. या बाबतीत एकमत करायला आम्ही पहिला क्रमांक लावला. आणि आम्ही त्या माणसाला विनंती केली. पुढच्या सेकंदाला बस चालू आणि तो माणूस आमच्या पुढे जवळ जवळ ३ फुटात आणि जोरात वाहत्या पाण्यात बसच्या लाईट मध्ये पुढे जाऊ लागला. बसमधले सगळे जण देवाचे नाव घेऊन आणि चालक एक एक फूट बस त्याच्या वर विश्वास ठेवून पुढे जात आहेत. मी हे सर्व पाहायला बसच्या आत यायच्या ज्या पायऱ्या असतात तिथे उभा राहून चालकाला डावी बाजूही सांगत होतो. 

काही वेळाने त्या पायरीवर असताना नदीचे पाणी माझ्या पायाला थोडेसे ढकलत होते. पुलाच्या सुरुवातीला रस्ता थोडा खाली असल्याने असे पाणी मला लागणे अपेक्षितच होते. मी काही ही माहिती चालगाला सांगितली नाही आणि चाल पुढे असे सांगत राहिला. आमच्या बसचा पुढचा माणूस ही हाताने मार्ग दर्शन आम्हाला करत होता. 

साधारण २०-२५ मिनिटात आम्ही हे मिशन पूर्ण करत आणले आणि पुलाच्या पलीकडेही बस आणि आमच्या सकट सुखरूप पोहोचलो!! आमच्या बसमधले सगळे लोक प्रचंड खुश... शिट्या आणि आवाज करायला सुरुवात केली. सगळे प्रचंड आनंदमय. आमच्या बसच्या मागे आता बाकीच्या बस यायला लागल्या. 

या आनंदात आमच्या बसच्या पुढे पाण्यात असलेला माणूस आता अचानक दिसेना. आम्ही एवढे पण ठरवले की त्याला या कामासाठी छोटी का होईना मदत किंवा बक्षीस देऊ. पण हा माणूस आता दिसेना. आम्ही ५-६ लोकांनी बस मधून उतरून चारी बाजूस पाहिले. त्याला शोधायचा खूप प्रयत्न सोडला पण नाहींच दिसला. शेवटी बस निघाली मोरगाव कडे आणि काही वेळातच मंदिरापाशी पोहोचलो. 

त्या रात्री मी विचार केला की असा कोण माणूस स्वतः ३-४ फूट पाण्यात इतक्या रिस्क मध्ये, रिस्क म्हणजे अशा जोरदार नदीच्या पाण्यात वाहून जायची शक्यता, साप आणि त्याच्या सारखे प्राणी येऊन डसू शकतात. पण रात्री अपरात्री अनोळखी बस मधल्या लोकांसाठी असे करणे आणि कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता काम झाल्यावर आणि अदृश्य होणारी व्यक्ती म्हणजे देवच असणार. मला सांगा, देवाव्यतिरिक्त अशी मदत कोण करणार? 

या घटनेमुळे आमची सहल वेळेप्रमाणे पुढे झाली आणि आयुष्यभर लक्षात राहिली. आम्ही खरंच नशीबवान, ज्या देवाच्या दर्शनासाठी आम्ही ही सहल केली, त्याच देवाने मला आणि आम्हा सर्वांना नदीत दर्शन दिले आणि आम्हाला कुठलेही अपघात न करता सुरक्षित आणि वेळेत पुढच्या रस्त्याला लावले.

गणपती बाप्पा मोरया... !!! 🙏🙏


- ©मंदार कुलकर्णी
संकष्ट चतुर्थी, शके १९४२

Sunday, November 15, 2020

दिवाळीचे दिवस

सर्व प्रथम, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. रोमन कॅलेंडर आणि हिंदू कॅलेंडर याचा तसा काही संबंध नसल्याने, हिंदू सण पाहण्यासाठी आपण कायम कालनिर्णय किंवा तशा स्वरूपाचे कॅलेंडर बघितले जाते, अगदीच उत्साही असल्यास दाते पंचांग पाहिले जाते. या वर्षी मात्र जरा मजेशीर प्रकार घडलेला आहे, जो आपल्या सर्वांच्या सोईसाठी ही बनला आहे. आपण सर्वांनी जर कालनिर्णय पाहिले तर या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तारखा आणि हिंदू अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या तारखा फारच जुळून आल्या आहेत. 

उदा. 
11 नोव्हेंबर - रमा एकादशी (11) 
12 नोव्हेंबर - वसू बारस (12) 
13 नोव्हेंबर - धन त्रयोदशी (13) 
14 नोव्हेंबर - नरक चतुर्दशी (14) 
15 नोव्हेंबर - अश्विन अमावस्या (15) 
16 नोव्हेंबर - बली प्रतिपदा म्हणजे आमावस्या नंतर आलेला पहिला दिवस यात एक दोन ठिकाणी थोडी गम्मत आहे, ती म्हणजे 14 लाच अमावस्या/ लक्ष्मी पूजन आले आहे. जे सर्व चंद्राच्या पोझीशन वर असते. भाऊबीज दिवसाचे ही साधारण असेच झाले आहे. 

पण बहुसंख्य दिवस हे असे दोन्ही कॅलेंडरचे आकड्यांनी जुळून आले आहेत. त्यामुळे आपल्याला दिवस लक्षात ठेवायला फार अवघड नाहीये. रविवारी भाकड दिवस आहे हे ध्यानात ठेवले म्हणजे झाले. 

आपण या वर्षी दिवाळी अधिक सोप्या आणि सरळ पध्दतीने लक्षात ठेवूया आणि साजरी करुया. 
सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. 

 - © मंदार कुलकर्णी

Monday, October 5, 2020

लाल बहादूर शास्त्री - जयंती

हिंदुस्थानचे दुसरे पंतप्रधान, प्रखर नि निष्ठावान देशभक्त लाल बहादूर शास्त्री यांची आज जयंती. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.. भारताचे पंतप्रधान बनुनही त्यांचे नशीब काही बाबतीत मात्र चांगले नव्हते, त्याची आज जरा आठवण करतो. १. शास्त्री यांना पंतप्रधान देण्यासाठी त्याकाळी प्रचंड विरोध होता. त्यांचे पंतप्रधान पद हे उत्तम कार्य असूनही त्यांना त्याचे खरे यश आणि कौतुक मिळाले नाही. २. पाकिस्तान विरुद्ध मिळवलेला पहिला विजय ही सिद्धा महत्वाची घटना. पण त्यापेक्षा नेहरू यांचे हिंदी चिनी भाई भाई जास्त प्रसिध्द आहे. ३. 'जय जवान जय किसान' ही उत्तम घोषणा त्यांनी दिली पण त्याचे योग्य कौतुक त्याकाळी आणि आजही होत नाही. ४. सरकारी खर्च आणि वैयक्तिक खर्च पूर्णपणे वेगळे दाखवणारे पण या विषयावर फारशी चर्चा कोणी करत नाही. ५. ताशकंद करार पाकिस्तान बराबर केल्याकेल्या त्यांचा विषप्रयोग करून जीव संपवला गेला. त्यांच्या पत्नीने हे अनेक वेळा सांगूनही काही उपयोग झाला नाही. भारतात आली तेव्हा त्यांची विषामुळे काळी निळी बॉडी असूनही त्याचे पुढील शोध कार्य झाले नाही. महात्मा गांधी यांच्या जन्मदिनीच यांचा जन्म हेही त्यांचे दुर्दैव. नेहरू यांचा जन्मदिन बालदिन होतो पण शास्त्री यांचा काहीच नाही. - © मंदार कुलकर्णी २ ऑक्टोबर २०२०

Wednesday, September 30, 2020

एस पी बालसुब्रमण्यम

आज अचानक बातमी आली एस पी 2 महिने करोनाशी युद्ध करून अखेर देवाघरी गेले आणि मी माझ्या डोळ्यात अचानक पाणी आले. 

मी काही कधी त्यांना प्रत्यक्ष भेटलो नाही की कधी त्यांचा गाण्याचा कार्यक्रम कधी पाहिला. पण माझ्या कॉलेज जीवनात आनंद भरण्यात त्यांची मोठी भर आहे हे मी इथे नोंदणी करतो. त्यांनी गीते गायलेले चित्रपट एकदम डोळ्यासमोर आले. 'मैने प्यार किया' , 'साजन', 'हम आपले हे कौन' हे चित्रपट त्याकाळी प्रसिद्ध होण्यात कलाकार यांच्या बरोबर एस पी यांचा मोठा वाटा होता. सलमान ला खरा हिरो बनवण्यात बनवण्यात सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त एस पी यांचाच होता. 

माझ्या बाबतीत म्हणाल तर मी त्यांची गाणी ऐकत ऐकत आणि म्हणत म्हणत आमचे कॉलेज जीवन पुढे गेले. तसेच दक्षिणेतील अनेक चित्रपट हिंदी मध्ये आल्यावर खरंच या गायकाचा ग्रेट नेस जगाला कळला जसे 'अप्पू राजा' पासून 'रोजा' पर्यंत चित्रपट अनेक वेळा तेव्हा पाहिले शिवाय त्यांच्या गाणाच्या कॅसेट घेऊन नंतर संगीताचा आनंद मी अनुभवला. एस पी चे दक्षिणेकडे असलेले संगीतातील वजन मी त्या काळात सोलापूरला असल्याने मला चांगलेच माहीत होते. त्यांच्या दक्षिणेकडे असलेल्या चित्रपट यांची गीते ही मला ऐकायला मिळाली. तेलगू जन्मभाषा असून त्यांनी अनेक भाषांत गीत गायन केले. हिंदीत 'एक दुजे के लिये' पासून 'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपट पर्यंत त्यांनी उत्तम हिंदी चित्रपटात गायन केले आणि आपल्याला त्यांनी आनंद दिला. हिंदी मध्ये इतक्या उत्तम पध्दतीने गायक करून त्यांचे कौतुक कमी झाले असेच वाटते. आज त्यांच्या बातमीने जवळजवळ 25 - 30 वर्षाचा इतिहास नजरेसमोर आला आणि माझा आवंढा अडकला. इंटरनेट वर त्यांनी गायलेली गीते बराच वेळ ऐकत बसलो पण मन शांतच डोईना. माझ्या जुन्या आठवणी एकामागोमाग एक डोळ्यासमोर येऊ लागल्या.... माझी या छोट्या लिखानाद्वारे त्यांना श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻 

 - © मंदार कुलकर्णी 25 सप्टेंबर 2020

Monday, June 1, 2020

आज १ जून

आजच्या नवीन पिढीला कदाचित ज्ञात नसेल पण २० व्या शतकातील बऱ्याच लोकांची जन्म तारीख १ जून असायची. याचे सर्व यश हे त्यांच्या पालकांच्या प्रयत्नांना नसून शाळेतील शिक्षक, कारकून यांना असायचे. त्याकाळी बहुतेक मुलांची नक्की जन्म तारीख आई वडिलांना माहीत नसायची किंवा इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सांगता यायची नाही. त्यामुळे शाळेत बालवाडी किंवा पहिलीत प्रवेश घेतांना शाळेच्या रेकॉर्डवर नक्की काय तारीख लिहायची हा प्रश्न असायचा. शैक्षणिक वर्ष दर वर्षी जून मध्ये चालू जात असल्याने शिक्षक, कारकून किंवा शाळेचे मुख्याध्यापक अशा मुलांची जन्म तारीख १ जून अशी नोंदणी करायचे. १ जून ला ५ वर्षे पूर्ण असली की पहिली प्रवेश असा हिशोब करून मुलांचे शिक्षण चालू व्हायचे. अशा रीतीने शाळेतील बऱ्याच मुलांची कागदोपत्री जन्म तारीख १ जून असायची आणि त्यामुळे त्याची सेवा निवृत्ती ही बरोब्बर ३१ मे ला व्हायची !!! या व्यतिरिक्त ज्या मुलांची जन्म तारीख जून ते डिसेंम्बर या महिन्यात असायची, त्यांनाही शाळेत प्रवेश घेताना ५ वर्षे पूर्ण नसायची, कारण काही मुले साडे चार तर काही पावणे पाच वर्षांचे असायची. अशा मुलाचे शैक्षणिक वर्ष काही महिन्यासाठी वाया जाऊ नये, असे पालक सुद्धा त्या मुलाची किंवा मुलीची कागदोपत्री जन्म तारीख १ जून ठेवायचे. तात्पर्य: भारतात कागदोपत्री १ जून जन्मतारीख असणारे आणि ३१ मे ला सेवा निवृत्त झालेले भरपूर लोक आजही जिवंत आहेत आणि आपल्याला सापडतील. त्यांची खरी जन्म तारीख नक्कीच वेगळी असेल पण वरील कारणामुळे त्या सर्वांचा कागदोपत्री किंवा सरकारी वाढदिवस हा आज म्हणजे १ जून ला असतो. अशा सर्व मंडळींना आपण सरकारी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ या !!!

Tuesday, May 19, 2020

सुट्टी आहे तर कोकणात, समुद्रकाठी जाऊया का

प्रिय पुणेकर आणि मुंबईकर, सध्या पुण्यातील आणि पुण्याबाहेर जाणारे अनेक रस्ते तसेच मुंबई आणि मुंबई बाहेर जाणारे रस्ते सध्या कोरोना नियंत्रण करण्यासाठी बंद करून केले आहेत. उदा. चांदणी चौकातून मुळशी किंवा बावधन कडे जाणारे रस्ते पत्रे मारून बंद केले आहेत, आणि तिथे पोलीस पहारे आहेत. तिथून जाता येणं अशक्य आहे. असे अनेक रस्ते पुण्याच्या चारी दिशांना बंद केले आहेत. कृपया घरात वेळ जात नाही, कंटाळा आला आहे म्हणून मी जरा चक्कर मारून येतो किंवा लॉंग ड्राईव्ह करून येतो, असा विचार मनातही आणू नका. सध्या अनेक जण 'सुट्टी आहे तर कोकणात, समुद्रकाठी जाऊया का' असा विचार करत आहेत. कृपया लक्षात घ्या, कोरोनाचे पेशंट पुणे आणि मुंबई याच गावात सर्वात जास्त आहेत. सुदैवाने कोकणात जास्त प्रादुर्भाव नाहीये. म्हणूनच मुंबईकर आणि पुणेकरांनी काही झाले तरी कोकणात जाण्याचा विचार करू नये. कोकणची सहल आपण पुढील वर्षी करू शकतो, पण आता कोरोना सगळीकडे नियंत्रणात आणणे आणि ठेवणे हे सर्वात जास्त महत्वाचे काम आहे. आपले माननीय मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल त्यांच्या भाषणात हीच गोष्ट प्रकर्षाने सांगितली. आहे तो रेड झोन हिरवा करणे आणि हिरवा झोन कोरोना मुक्त ठेवणे हीच आपणा सर्वांची सध्या सर्वात मोठी जबाबदारी आहे. कोकणातील आपल्या बांधवांना निरोगी आणि कोरोनामुक्त राहुद्या आणि सध्या त्यांना आंब्याचा व्यवसाय अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वतःची काळजी घेऊन निर्धोकपणे करू द्या. आपण सारे नागरिक या लढाईमध्ये उगाचच प्रवास टाळू या. आपल्या घरात थांबून केंद्र आणि राज्य सरकारला अशा पद्धतीने मदत करू या आणि कोरोनाचा प्रसार टाळू या. हा मेसेज शक्य असेल तर आपल्या ओळखीच्या लोकांना अवश्य पुढे पाठवा. धन्यवाद... - मंदार कुलकर्णी १९ मे २०२० 🙏🏻🙏🏻

Sunday, March 15, 2020

यशाचे नवीन मॉडेल - अरविंद केजरीवाल

यशाचे नवीन मॉडेल - अरविंद केजरीवाल




समजायला अतिशय अवघड, प्रचंड हुशार, चलाख बुद्धी, जिभेवर सरस्वती आणि अचाट संघटन कौशल्य असे काही शब्दांनी अरविंद केजरीवाल यांचे अगदी थोडक्यात वर्णन करता येईल.

अरविंद केजरीवाल यांचा जन्म हिस्सार या हरियाणा राज्यात १६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. केजरीवाल बालपणी हिस्सार, सोनेपत, मथुरा यासारख्या उत्तरी भारतातील गावांत राहिले. त्यांचे शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे झाले.  इ.स. १९८९ साली त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले.  

अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम हे मेसराच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता होते. १९९२ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळाल्यावर ते भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (IAS) नोकरीला लागले. फेब्रुवारी २००६ मध्ये त्यांनी आयकर विभागाच्या जॉइंट कमिशनर पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
आणि त्यांनी दिल्ली येथे परिवर्तन नावाच्या नागरिकांची चळवळ चालवणाऱ्या संस्थेची स्थापना केली. या काळात केजरीवाल यांनी अमेरिकेच्या फोर्ड फौंडेशनच्या पासून भारतातील अनेक सहकारी संस्था यांच्याशी चांगली जवळीक साधली.

इ.स. २००६ साली त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच वर्षी डिसेंबर २००६ मध्ये त्यांनी, मनीष सिसोदिया आणि अभिनंदन सेखरी यांच्या बरोबर पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन सुरू केले. केजरीवाल आणि सिसोदिया यांची कबीर नावाची एक एनजीओ होती ज्याला फोर्ड फाउंडेशन ने प्रचंड पैसा पुरवला असे मानले जाते. तिस्ता सेटलवाड, योगेंद्र यादव, मीरा सान्याल, मल्लिका साराभाई, अमर्त्य सेन, मेधा पाटकर, या सगळ्यांना फोर्ड फाउंडेशन ने लाखो करोडो डॉलर्सची मदत केली आहे आणि काहींना मॅगसेसे अवॉर्ड पण मिळाले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. 

२००६ ला भारत परत एकदा द्विपक्षीय राजनीतिकडे चालला होता. भाजप हरली तरी काँग्रेस जिंकली होती आणि सत्तेचा खेळ या दोन राष्ट्रीय पक्षात खेळला जाऊ लागला होता. दोन्ही पक्षांच्या इकॉनॉमिक पोलिसीज जवळपास सारख्याच होत्या आणि त्यामुळे भारत झपाट्याने विकसित होऊ लागला होता. त्या काळात १०℅ जीडीपी ग्रोथ आपल्या आवाक्यात आली होती. भारत पाकिस्तान संबंध चांगले होऊ लागले होते. त्यामुळेच अमेरिकेच्या पोटात दुखणे सहाजिकच होते. त्याचसाठी अमेरिकेकडून अशा मंडळींना पैसा पुरवून भारतात अशांतता निर्माण करायचा प्रयत्न सुरू झाला. 

लोकपाल आंदोलन करताना अरविंद केजरीवाल यांना एक म्होरक्याची गरज होती आणि ती शोधत असताना त्यांना अचानकपणे महाराष्ट्रामध्ये एक माणूस सापडला त्याचे नाव अण्णा हजारे. अण्णा हजारे यांचे एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना महाराष्ट्रामध्ये मानणारा एक मोठा वर्ग होता किंबहुना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा नेहेमी अण्णा हजारेंना भेटून त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत होते. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अण्णा हजारे यांचे उपोषण करायची ताकद. अनेक दिवस उपाशी राहून उपोषण चालू ठेवण्याची क्षमता ही अरविंद केजरीवालांनी बरोबर ओळखले. त्यांना त्यांच्या गावी म्हणजे राळेगण सिद्धी येथे भेटून या मंडळींनी लोकपाल विधेयकाच्या विरोधात तुम्ही कसे नेतृत्व करावे या संदर्भात त्यांना त्यांना साधारण कल्पना दिली आणि त्यांना एकदम राळेगणसिद्धी येथून उसळून दिल्ली येथे जंतर मंतर येथे नेऊन ठेवले. स्टेज वर हे सगळे फोर्ड फाउंडेशन ची इतर मंडळी होतीच, मीडिया ला अमाप पैसा वाटला गेला आणि २८ न्यूज चॅनल त्या अण्णा आंदोलनाचे लाईव्ह प्रक्षेपण १५ दिवस करत होते. यात अरविंद केजरीवाल आणि गँगला देशभर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनकर्त्यांनी परदेशातून आणि इथे आंदोलनाला जमणाऱ्या लोकांच्या कडून जे पैसे जमा केले होते त्या पैशावरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात भांडणे झाली. सर्वात महत्वाचे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया जेव्हा परदेशात फंड गोळा करायला गेलेत तेव्हा ते खलिस्तान चळवळीच्या लोकांच्या घरात राहिले आहेत. या खलिस्तानी आणि मिशनरी च्या पाठिंब्यावर आप पंजाब आणि गोव्यात पसरली. मिशनरी लोकांबरोबर अरविंद केजरीवाल यांनी चांगला संपर्क साधला होता. मदर तेरेसा ना सेंट हा सन्मान दिला गेला तेव्हा भारताच्या परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज उपस्थित होत्या पण तिथे बोलावले गेलेल्यांमध्ये बंगालचे मुख्यमंत्री आणि केजरीवाल होते.

लोकपाल आंदोलन झाल्यानंतर अर्थातच अरविंद केजरीवाल आणि टीम यांना सत्तेची स्वप्ना दिसू लागली. हे करत असताना अर्थातच अण्णा हजारे यांनी त्यांना विरोध केला. कारण अण्णा हजारे यांना राजकारणामध्ये काडीचाही रस नव्हता. परंतु सुरुवातीला अण्णांची गोड बोलून आणि त्यानंतर अगदी पद्धतशीरपणे त्यांचा काटा बाजूला करून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या फौजेने राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आम आदमी पार्टी या पक्षाचा जन्म झाला. या पार्टीमध्ये अर्थातच आशुतोष सारखे पत्रकार आणि विविध क्षेत्रातले लोक घेण्यात आले आणि ही कोणतीही राजकीय संघटना नसताना केवळ जबरदस्तीने राजकारणात आलेले लोक असा एकंदर भाव निर्माण करण्यात आला आणि आमचा उद्देश कसा स्वच्छ आहे हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवाल ह्यांच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.  केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २५,८६४ मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला ३४ जागा मिळाल्या. अर्थात दोन जागा बहुमतासाठी कमी पडल्या. निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बहुमत करणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती परंतु बहुमताला जागा कमी पडल्यामुळे त्यांना भाजप किंवा काँग्रेस या पैकी कोणत्या तरी पक्षाची मदत घेणे आवश्यक होते. पण एकदम काँग्रेसकडे कसे जायचे यासाठी त्यांनी मग एक महिना वेगवेगळ्या लोकांशी बोलण्यामध्ये वेळ काढला आणि फायनली काँग्रेसची मदत घेऊन सरकार स्थापन केले. काही दिवसातच काँग्रेसची मतभेद झाल्यानंतर हे आघाडीचे सरकार पडले.

मधल्या काळामध्ये २०१४ लोकसभा निवडणुका आल्या होत्या. त्यावेळेला एकंदर आम आदमी पक्षाचा विस्तार केवळ दिल्लीतच नव्हे तर दिल्लीच्या बाहेर अनेक राज्यांमध्ये करायचा प्रयत्न झाला. आपल्याला मिळालेली प्रसिद्धी याचा फायदा घेत त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात उभे राहून आव्हान दिले. अर्थातच नरेंद्र मोदी यांच्यापुढे त्यांचा टिकाव काही लागला नाही पण त्याव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये जसेकी पंजाब, गोवा, महाराष्ट्र याठिकाणी आम आदमी पक्षाचे बस्तान बसवायला त्याने सुरुवात केली. तेथे होणाऱ्या अनेक प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांनी चक्क पैसे घेऊन आपले उमेदवार उभे केले पण अर्थातच बाकी राष्ट्रीय पक्ष आणि इतर प्रादेशिक  पक्षांपुढे त्यांचा फारसा टिकाव लागला नाही आणि अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर आपले लक्ष केंद्रित केले.

२०१५ विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. भारतीय जनता पक्षाला फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.
या निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशामुळे अरविंद केजरीवाल यांना धुंदी चढली नसती तर नवलच त्यांनी त्यांच्या मर्जीतले अनेक सहकारी आपल्या मंत्रिमंडळात घेतले. सुरुवातीच्या काही काळ, त्यांचे एलजी बरोबर प्रचंड प्रमाणात मतभेद झाले त्याचप्रमाणे केंद्र सरकार बरोबरही काही ना काही खुसपट काढून तेथे त्यांचा पाणउतारा करायचा प्रयत्न केला. रोजच्या कुठल्यातरी भाषणामधून किंवा ट्विटमधून कायम नरेंद्र मोदींना लक्ष्य करणे किंवा केंद्र सरकारच्या योजनांना विरोध करणे असा रतीब त्यांनी चालू ठेवला . २०१७ मध्ये कुणा हितचिंतकाने त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही मोदींवर टीका करण्यापेक्षा आपल्या दिल्ली राज्यांमध्ये चांगली काम करा त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगला उपयोग होईल आणि तुमची पुढची मतं  नक्की होण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल. 

त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पूर्ण कामाची पद्धत आणि स्ट्रॅटजी बदलली आणि लोकाभिमुख काम करायला सुरुवात केली. दिल्लीतील पोलुशन कमी करण्यासाठी मग odd even योजना किंवा दिल्लीतील गरीब लोकांसाठी मोहल्ला क्लिनिक त्याचप्रमाणे रस्ते दुरुस्ती अशी अनेक प्रकारची शहरांमधले काम त्यांनी करणाऱ्या सुरुवात केली. 

सरकारी शाळांच्या दर्जात केजरीवाल सरकारने प्रचंड सुधारणा केली. शिक्षकांना गैर शिक्षकी कामांना जुंपणे थांबवले. सामान्य पालकांच्या मुलांना सुद्धा सरकारी शाळात खाजगी शाळांच्या तोडीचे शिक्षण मिळेल याची सोय केली. सरकारी शाळा म्हणजे अत्यल्प फीस त्यामुळे सामान्य लोक सुखावले. इतकेच नाही तर खाजगी शाळांच्या मनमानी फी लादण्यावर पूर्ण नियंत्रण आणले. शाळेचा दर्जा तेथील सुविधा आणि कोणत्या वर्गाच्या साठी किती फीस घेतली जावी याचे निरपेक्ष मापदंड बनवले आणि त्याचे पालन करणे खाजगी शाळांना भाग पाडले. परिणाम पालकांच्या खिशाला बसणारा प्रचंड भुर्दंड वाचला.

केंद्राच्या अनेक योजना त्यांनी दिल्लीमध्ये अंमलात आणू न देता स्वतःच्या सरकारच्या योजना अगदी जाणीवपूर्वक त्यांनी अमलात आणल्या आणि लोकांची मर्जी संपादन केली. प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये इतर राज्यात दरवर्षी कोट्यावधी रुपयाची औषधे कागदावर घेतली जातात आणि वाटली गेल्याचे दाखवले जाते वास्तवात डॉक्टर , मंत्री , अधिकारी सगळे पैसे खाऊन हे अनुदान हडप करतात. केजरीवाल यांनी हे अनुदान खरेच खर्च केले. मोफत आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा अशा अनेक गोष्टी केजरीवाल यांनी यशस्वीरित्या अंमलात आणल्या. अन्न , वस्त्र, निवारा, चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा या पाच गोष्टीच कोणत्याही राज्य पातळीवरील ज्या निवडणुकीचे भवितव्य ठरवतात त्या सर्वच पातळीवर केजरीवाल यांनी इतर पक्षांना मात दिली.

यात त्यांची सर्वात यशस्वी योजना म्हणजे दोनशे युनिटपर्यंत विजेचे बिल त्यांनी माफ केले. या योजनेमुळे गरीब नव्हे तर अगदी मध्यम वर्गापर्यंतच्या लोकांनाही आम आदमी पक्षाबद्दल विश्वास निर्माण झाला कारण दर महिन्याला जे साधारणपणे दोन हजार ते अडीच हजार रुपये वीज बिल यायचे ते आम आदमी पक्षाच्या या निर्णयामुळे शून्य झाले. अशा अनेक योजना त्यांनी अंमलात आणल्या. हे करण्यासाठी २०१५ मध्ये त्यांनी रक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे जो टॅक्स दिल्ली सरकारला मिळत होता तो एकदम वाढवून दुप्पट केला. दिल्ली सरकारला साधारणपणे दरवर्षी तीस हजार कोटी रुपये टॅक्समधून मिळायचे ते आता साठ हजार कोटी झाले. पहिले साडेचार वर्षे कायम एलजी बरोबर असलेले खटके आणि केंद्र सरकारकडून आपल्याला मिळत नसलेली मदत यावर भर देणारे अरविंद केजरीवाल यांनी २०२० च्या निवडणुकांसाठी मात्र अगदी आधीपासून जोरदार तयारी केली. शेवटच्या सहा महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देऊन, मीडियाला, चॅनेल्सना विश्वासात घेऊन गेल्या पाच वर्षांमध्ये कशी चांगली कामे झाली आणि कोणत्याही काँग्रेस किंवा भाजप सरकारपेक्षा आम आदमी पक्षाने कसे पाच वर्षामध्ये भरीव काम केले याचे विस्तृत वर्णन त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. निवडणुकीच्या काळात यथेच्छ चिखलफेक होत असताना भाजपनेही त्यांना 'अतिरेकी' अशा प्रकारचे संबोधले आणि त्याच संधीचा त्यांनी फायदा घेत आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमा अजून उजळ केली आणि याच संधीचा फायदा घेत  ७० पैकी ६२ जागा त्यांनी पदरात पाडल्या. निवडणूक प्रचारामध्ये अनेकदा मीडियाने त्यांना खोटी आश्वासने देण्याबद्दल विचारले पण त्यावरही त्यांनी हसून अतिशय प्रामाणिकपणे सांगितले काही आश्वासने निवडणूक काळामध्येच असतात आणि ती खोटी असतात पण त्या व्यतिरिक्त मी जे काही काम केलं आहे ते तुम्ही पाहा आणि मला मतदान करा अशा प्रकारे त्यांनी लोकांना आवाहन केले. 

अमित शहा, जेपी नड्डा आणि भारतातील भाजपच्या राज्यांमध्ये असलेल्या अकरा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे सुद्धा भाजपला दिल्लीच्या निवडणुकीत फायदा झाला नाही आणि अरविंद केजरीवाल यांनी याही वेळी त्यावर कडी केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले.

दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये मिळविलेल्या घवघवीत यशामुळे अरविंद केजरीवाल यांच्या कल्पनांना आता नवीन पंख फुटू लागले आहेत आणि त्यांचे लक्ष पुन्हा एकदा बाकीच्या राज्यांकडे आता जायला लागले आहे आपल्या पक्षाचा विस्तार हा आता दिल्लीच्या बाहेर बाकी राज्यांमध्येही करायचा आणि आपली राष्ट्रीय प्रतिमा तयार करायचा आता त्यांचा मानस आहे.


@ मंदार कुलकर्णी
१६ फेब्रुवारी २०२०