Followers

Friday, May 25, 2018

पार्किंग


पार्किंग

आज जगात लोकसंख्येपाठोपाठ जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यात पार्किंग चा क्रमांक खूप वर लागतो. म्हटलं तर *त्यात काय एवढं?* असं वाटणारा विषय नुसताच साधा सोपा नाही तर बराच गुंतागुंतीचा आहे. पुणे मुंबई सारख्या शहरात पार्किंगला जागा मिळणं हे अवघड गोष्ट झाली आहे. कार घेऊन बाजीराव रोड, लक्ष्मी रोड वर येणे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. रस्त्यावर पार्किंग सोडा, पार्किंग स्टेशन (अड्डा) मध्ये ही जागा मिळत नाही. पेठेतील कार मालकांनी तर वर्षासाठी पार्किंग भाड्याने घेतली आहेत. हाच त्रास दिल्ली, बंगलोर आणि भारतातील बहुतेक मोठ्या शहरात आहे. आबुधानी आणि दुबई ला तर पार्किंग मिळणे दुरापास्त झाले आहे. तेथील पेड पार्किंग भारतातील घरभाड्यापेक्षा महाग आहे. तेथे तर रस्त्याच्या मध्ये (दुभाजक) पार्किंगची सोय केली गेली होती, ती पण संपली.

हेच चित्र आता परदेशातही दिसते. लंडन, न्यू यॉर्क, शिकागो, इंडियानापोलीस, म्युनिच कुठलेही गाव असो, सगळीकडे आता पेड पार्किंग असते. आपणच रस्त्याच्या कडेला असलेल्या बॉक्स मध्ये वेळ आणि पैसे भरायचे.  

पब्लिक प्लेसेस मध्ये टुरिस्ट बसेस आता पार्क करू दिल्या जात नाहीत. पिसाचा मनोरा, अजिंठा येथेही वेगळी बस पर्यटकांना घेऊन जाते.

प्रश्न एवढाच आहे, एका बाजूला ऑटोमोबाईल इंडस्ट्री 20-30% या गतीने दरवर्षी वाढत आहे. लोकसंख्या प्रचंड वाढते आहे, तर रस्ते आणि मोकळी जागा दिवसे दिवस कमी होत आहे. नुसतं पी1 पी2 करून किंवा पेड पार्किंग/ नो पार्किंग करून काही होणार नाही. मग हा पार्किंगचा प्रश्न कधी सुटणार की नाही?

मंदार कुलकर्णी
15 मे 2018


आईस्क्रीम

आईस्क्रीम

आईस्क्रीम हा युरोप ट्रिप मधला एक अविभाज्य भाग आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्यांना चहा आणि कॉफीची सवय आहे त्यांची थोडी गोची होते पण आईस्क्रीम न आवडणारा माणूस तसा विरळाच. भारतात उगीचच "थंडीत आईस्क्रीम काय खातो, घसा धरेल" वगैरे उपदेश घेऊन आलेली मंडळी इथे यथेच्च आईस्क्रीम खातात आणि त्यांना काही होत नाही. भारतात आग्रहाचं आईस्क्रीम खाल्यावर आठवणीने गरम पाणी पिणारी असंख्य लोकं मी पाहिली आहेत. युरोपच्या हवेची जादूच अशी आहे आहे की कोणालाही काहीही त्रास होत नाही.

तेव्हा रोज आईस्क्रीम खा आणि धमाल करा... 

मंदार कुलकर्णी
14 मे 2018


सौर शेती !!!


सौर शेती !!!

सध्या मी युरोपच्या सहलीला आहे. अनेक देश अनेक प्रांत मजेत पाहत पाहत पुढे जात आहोत. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे होत असलेला सौर ऊर्जेचा मुक्त वापर. बऱ्याच घरांच्या कौलावरती, छतावर सोलर पॅनल लावलेले आहेत. 

वास्तविक या प्रदेशात सलग काही दिवस सूर्य दर्शन होणे हीच अवघड गोष्ट, त्यात हिवाळ्यात पडणारे प्रचंड बर्फ आणि थंडी. त्यामुळे येथे सौरऊर्जा किती प्रभावीपणे वापरली जात असेल या बद्दल मनात अजूनही शंका आहे. कधीही जमा होणारे ढग, काही तासात लखलखीत ऊन पडत असलेला भाग पावसाने चिंब होऊन जातो. बोचरे आणि थंड वारे यांनी बनणारे निरुत्साही वातावरण. हे सगळे निगेटिव्ह मुद्दे असून येथील लोकांचा सोलर पॅनेल लावायचा उत्साह दांडगा आहे. काही ठिकाणी तर अख्या शेतावर सोलर पॅनल लावली आहेत. आणि विचार मनात आला, अशीच किमया आपण भारतात का नाही करू शकत?

भारतात पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर बाकी वर्षभर तोबा ऊन असते. आजकाल उन्हाळ्यात 45 ते 48 डिग्री पर्यंत तापमान पोहोचते. यातून किती वीज निर्माण करता येईल? ज्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत, त्या जमिनीवर सोलर पॅनल लावली आणि तर वर्षभर त्यांना वीज मंडळाला वीज पुरवता येईल आणि त्यांना वर्षभर त्यातून उत्पन्न मिळेल. सोलर पॅनेल पुसण्याशिवाय काही काम नाही. यातून आपली विजेची गरजही भागवता येईल आणि एक कायमचे उत्पन्नाचे साधनही होईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता सौर शेती करून स्वयंपूर्ण व्हायला काय हरकत आहे?

मंदार कुलकर्णी
13 मे 2018





ढग (मुक्त काव्य)


ढग (मुक्त काव्य)


आज खूप दिवसांनी ढगांकडे पहावेसे वाटतंय
त्याच्या नव नवीन छटा, प्रताप ऐकावेसे वाटतंय... १

आज ढगांनी तर जणू कमालच केली
दिवसभर सूर्य दर्शन काही दिलं नाही
आकाश नुसतं भरून आलंय, कोंदट झालंय
"रेन रेन गो अवे" असं म्हणावसं वाटतंय... २

आजचा दिवस फक्त पावसाचा आहे
ढग गडगडण्यावाचून दुसरा आवाजच नाहीये,
विजांचा कडकडाट आणि प्रचंड पाऊस आहे,
ओल्या भिंतीलाही आज बुरशी जमली आहे... ३

आज ढग जणू गायबच जणू उभा राहिलाय काळ,
निम्मा पावसाळा संपला तरी अजून चालू आहे दुष्काळ,
शेतकरी कावला आहे आणि पावसाची चातकासारखी पाहतोय वाट 
मोकळ्या आकाशाकडे पाहत अश्रूंना करून देतो आहे वाट... ४

आज श्रावण सरी पडून गेल्या आणि सुरू झालाय ऊन पावसाचा खेळ,
ढग म्हणत आहेत आज जरा उसंत घेऊ, 
पानाफुलांना थोडा सूर्य प्रकाश देऊ,
कुंद वातावरणातून बाहेर पडायला आहेत हेच ढग... ५

आज ढग आकाशात नुसतेच रेंगाळताहेत,
निळं आकाश मोकळे दिसू नये एवढाच त्यांचा उद्देश आहे,
जणू पांढरा कापूस पिंजून ठेवला आहे चोहीकडे,
आलाय वाऱ्याचा झोत तर रमताहेत इकडे तिकडे... ६

आज ढग अडकले आहेत डोंगरांमध्ये,
पुढे जावे तर जड झाले आहे ओझे त्यांना,
मग बरसतात बिचारे डोंगराच्या दरीमध्ये,
मोकळे होऊन जातात तिथेच पुढच्या प्रवासासाठी... ७

मंदार कुलकर्णी
१५ मे २०१८