Followers

Monday, September 9, 2019

शाळा, मॉल आणि आयटी पार्क


रेडिओ वर सध्या जाहिराती इतक्या असतात की २ गाण्याच्या मध्ये जाहिराती असतात का अनेक जाहिरातीच्या मध्ये एखादे गाणे हेच समजत नाही. त्यात पुन्हा हिंजेवडी, तलवडे, लोहेगाव वगैरे अशुद्ध शब्दांचा भरणा असतोच. घरांच्या जाहिराती मात्र खूप आकर्षक असतात. हायवे टच, विमानतळापासून ५ मिनिटांवर, ह्या मॉल च्या अगदी जवळ किंवा अगदी भर वस्तीत अशा अनेक पकड घेणाऱ्या ओळी त्यात असतात.

आजकाल बऱ्याच जाहिरातीत एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे शाळा, मॉल आणि आयटी पार्क. पुण्यात घर कुठंही असलं तरी जवळच शाळा, मॉल आणि आयटी पार्क आहेत हे मात्र आवर्जून सांगितले जाते. जणू काही मानवाच्या मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या आता पुर्णपणे बदलल्या असून त्या आता अनुक्रमे शाळा, मॉल आणि आयटी पार्क अशा बनल्या आहेत.

खरंच या गरजा एखाद्याला घर घेण्यासाठी किंवा राहण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा आहेत का? आजच्या जगात या ३ गोष्टी सोडून बाकी काहीच लागत नाही का? गेल्या शतकात गावाकडून/ खेड्याकडून शहराकडे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झाले. गावाची शहरे झाली, शहराची महानगरे झाली. लोकांच्या गरजा आणि जगायची साधने बदलली. पूर्वी गावात एखादा वैद्य असायचा. आज कितीही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असली तरी लगेच बेड मिळत नाही. पूर्वी प्रत्यक्ष घरात अंगण, तुळशी वृंदावन असे, आज त्याची जागा छोट्या छोट्या घरांच्या खुराड्यानी घेतली.

मुद्दा हा आहे की काळाच्या ओघात गरजा बदलल्या पण म्हणून काय शाळा, मॉल आणि आयटी पार्क इतकंच पाहायचं? हॉस्पिटल, भाजी बाजार, बस/ रेल्वे स्थानक, नाट्यगृह, खेळाचे मैदान, संस्कार वर्ग, व्यायामशाळा (म्हणजे मराठीत जिम), पोहण्याचा तलाव, देवालय, चालण्यासाठी चांगले रस्ते किंवा बागा ह्या गोष्टी यांच्या यादीत कधी येणार? २१ च्या शतकात या सुद्धा गरजेच्या गोष्टी आहेत हे या जाहीरात करणाऱ्यांना कळत नाहीत का? कोणाला विचारून हे लोक अशी जाहिरात करतात? का आपलीच टेस्ट आता बदलली आहे?
विचार करूया...


मंदार कुलकर्णी
७ सप्टेंबर २०१९

No comments:

Post a Comment