गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे राहण्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातून अनेक नेते भाजपामध्ये येऊ लागले. लोकसभेत भाजपाला 303 जागा मिळाल्यावर तर अनेकांची खात्रीच पटली की भविष्यात काँग्रेस पक्ष निवडून येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांचा पक्ष सोडून भाजपामध्ये गेले. काही जणांनी शिवसेनाही गाठली आहे पण त्याचे प्रमाण नगण्य आहे.
मूळ मुद्दा हा आहे की काँग्रेस मध्ये अख्खी हयात गेलेले लोकही बिनदिक्कत आज भाजपा मध्ये येत आहेत, बाकी कशाला नारायण राणे ही आधी भाजपा च्या जीवावर विधान परिषदेवर गेले आणि आता लवकरच आपला पक्ष अधिकृतपणे भाजपामध्ये विलीन करणार आहेत. ज्यांनी सिंधुदुर्गमध्येही काही केलं नाही, ज्यांचे चिरंजीव आमदार असताना सरकारी अधिकाऱ्यावर हात चालवतात, शिवीगाळ करतात अशा लोकांनाही भाजपाची दारे खुली आहेत. नारायण राणे त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात आणि मुलाखतीत बिनदिक्कत म्हणतात, काँग्रेसने मला 6 महिन्यात मुख्यमंत्री करायचा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला नाही म्हणून ते काँग्रेस बरोबर नाहीत. उद्या भाजपामध्ये आल्यावर कुठल्या समितीवर घेण्याचा आग्रह त्यांनी धरला तर?
प्रश्न आहे की भाजपा मध्ये प्रवेश देताना काही निवड प्रक्रिया नाही का? ज्याला वाटेल त्यांना भाजपा मध्ये प्रवेश देणे योग्य आहे का? आज ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी आणि संघाच्या कार्यकर्त्यांनी गेले 40 वर्षे दिवस रात्र एक करून भाजपा स्थापनेपासून मोठा केला; ज्या पक्षाला 2 खासदारांचा पक्ष म्हणून हिणवले जात होते त्या पक्षाने मित्र पक्षांच्या मदतीने लोकसभेत 353 म्हणजे 2/3 जागा मिळवल्या आहेत. अनेक पक्षांशी युती आणि सामंजस्य दाखवले आहे.
भाजपा कार्यकर्ता हा कितीही निस्वार्थी असला तरी जेव्हा सत्ता मिळत असतांना त्यांनी कायम सतरंज्याच उचलायच्या का? आणि हे आयत्या बिळावर नागोबा झालेले बाहेरचे लोक नंतर महत्वाची पदे आणि खाती मिळवणार. हे अजिबात योग्य नाही.
आज ज्या पध्दतीने भाजपा मध्ये incoming चालू आहे ते पहाता थोड्या दिवसात काँग्रेस युक्त भाजपा असा नवीन पक्ष तयार होईल असे चित्र आता दिसते आहे. आता incoming करणारे गोड बोलतील, पक्षात आम्हाला काही नको म्हणतील आणि निवडणुका आल्या की यांनाच उमेदवारी हवी. नाही मिळाली तर परत बंडखोरी करायला मोकळे. त्यांना ना भाजपा कधी कळला, ना त्याची संस्कृती.
अशाने खरा भाजपा संपायला वेळ लागणार नाही आणि खरे भाजपाप्रेमी कायमचा पक्षापासून दूर जाईल आणि हे भविष्यात पक्षासाठी अवघड जाईल.

No comments:
Post a Comment