Followers

Sunday, December 6, 2015

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट


ज्या दिवशी मला समजले कि सुबोध भावे कट्यार… हा चित्रपट करणार आहे तेव्हा पासूनच मला कमालीची उत्सुकता लागली. आणि दिवाळी च्या मुहूर्तावर ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपट प्रदर्शित झाला.हे काही वर्तमान पत्रातील सिने परीक्षण नाही त्यामुळे त्याची कथा आणि नाटक , त्याचा इतिहास इथे लिहिण्याची गरज नाही.
एखाद्या गरुडाला त्याच्या पंखात बळ आल्यावर जसे अख्खे आकाश विहारायला मिळते तशी अवस्था सुबोधची झाली आहे. नाटकाचे ६० फुटाचे स्टेज पासून क्षितिजा पर्यंत पोहोचणारा कॅमेरा यातील फरक त्याने दिग्दर्शक म्हणून त्याच्या पहिल्याच सिनेमात उत्तम रीतीने ओळखला. आणि तिथूनच कथेचा मूळ गाभा न बिघडवता संपूर्ण चित्रपटासाठी नवीन कथा लेखन करून घेतले. पंडित भानू शंकर शास्त्री यांचे नाटकात केवळ फोटो मध्ये असेलेले स्थान बदलून त्याने पूर्णपणे एक चांगले कॅरक्टर तयार केले . विश्रामपूर चा दरबार, ताज महाल, हवेली, देऊळ आणि अशी अनेक आवश्यक ठिकाणे चित्रपटासाठी घेऊन एक भव्य चित्रपट निर्माण केला. त्या काळातील वेशभूषा, सजावट याचा खूप बारकाईने अभ्यास केलेला जाणवतो. चित्रपटाची लांबी ४ तास होवू नये म्हणून गीते पूर्ण न घेता १ किंवा २ कडवी घेणे हा ही विचार स्तुत्यच. कट्यारीला रीमा यांचा आवाज देवून कथा पुढे नेण्याची कल्पना ही छान.
आता थोडेसे कलाकार निवडी विषयी. सर्वच कलाकारांची निवड कथा योग्य आणि यथा योग्य आहे. मृण्मयी आणि अमृताची निवड कथेसाठी उत्तम त्याचबरोबर सदाशिव स्वतः सुबोधने स्वतः करणे हे त्याच्यातील कलाकाराला आणि दिग्दर्शकाला नक्कीच अवघड गेले असेल. त्याने केलेला सदाशिव चा गायन करतानाचा अभिनय थेट महेश काळे ची आठवण करुन देतो. सर्वात कुठे बाजी मारली आहे ती सचिनने केलेल्या खांसाहेब साठी. इतके वर्ष हा रोल त्याचीच वाट पाहत होता असे वाटते. त्याचे उर्दू उच्चार, त्याची अभिनयवरील पकड आणि कुठेही खांसाहेब उथळ न होवू देण्याचे कसब अप्रतिम. सचिन खांसाहेब यांचा रोल कसा करणार या बद्दल खूप लोकांच्या मनात शंका होत्या. किंबहुना "महागुरु" नावाखाली त्याची what’s app वर भरपूर चेष्टाही झाली. पण त्याच्या शिवाय हा रोल आजच्या काळात कोणी करूच शकणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. त्या रोलमध्ये त्यांनी भरलेले गहिरे रंग, त्याच्या वेगवेगळ्या छटा, सर्वच लाजवाब.
पंडित भानू शंकर शास्त्री यांच्या बाबतीत मात्र जरा गडबड झाली आहे. शंकर महादेवन याने गाण्याची आणि संगीताची बाजू उत्तम सांभाळली असली तरी पंडित भानू शंकर शास्त्री यांचे शब्दोच्चार…. मज़ा नहीं आया। एका अ मराठी गायकाला पंडित भानू शंकर शास्त्री यांचा रोल सुबोधने देणे हे फार आश्चर्य कारक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात निदान डबिंग तरी चांगल्या मराठी माणसाकडून करून घ्यायला हवे होते. हे म्हणजे “अख्खा शर्ट कडक इस्त्री केलेला आणि खिशावर मात्र चुण्या ….”
संगीत म्हणजे या चित्रपटाचा प्राण. राहूल, महेश आणि शंकर यांनी त्यांच्या कसलेल्या आवाजाने गीते उच्च स्थानावर नेवून ठेवली आहेत.
एकंदरीतच "संपूर्ण जमून आलेली बिर्याणी" असे याचे वर्णन करता येईल. माझे परीक्षण वाचून कोणी हा चित्रपट पहावा अशी माझी मुळीच अपेक्षा नाही पण जर जाणारच असाल तर संपूर्ण मोकळ्या डोक्याने जा. वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे आणि चारुदत्त आफळे यांचे खांसाहेब अजरामर आहेतच; पं जितेंद्र अभिषेकी यांचा सुरेल स्वर आणि संगीत विसरणे शक्य नाहीच पण चित्रपटाचा मोठा कॅनवास मिळाल्यावर त्याचे कसे झगझगीत सोने होते हे पाहण्यासाठी हा चित्रपट एकदा पहायलाच हवा....

- मंदार कुलकर्णी
२२ नोव्हेंबर २०१५

 

Friday, October 23, 2015

विरेंद्र सेहेवाग

विरेंद्र सेहेवाग

 एकदा मनात विचार आला … सचिन retire झाला तेव्हा काही लिहिले नाही आणि आता का एवढी खुमखूमी आली? पण काही प्रश्नांना उत्तरं नसतात त्यातला हा प्रकार …

विरेंद्र सेहेवाग याने त्याच्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. तो आला क्रिकेट मध्ये ते सचिन ची zerox कॉपी म्हणून. कारकीर्दीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने कधीही त्याच्या शैली मध्ये बदल केला नाही. अजिबात विचार न करता कुठल्याही प्रकारच्या खेळ पट्टीवर दांडपट्टा फिरवत फलंदाजी करायची आणि तितक्याच सहजपणे आउट होऊन मैदान सोडायचे हा याचा खाक्या. "गाजराची पुंगी वाजली तर वाजली … नाहीतर खाऊन टाकली" अशी त्याची तऱ्हा होती. कित्येक वेळा हा लगेच आउट होणार आणि मग द्रविड, सचिन यांनी पुढचे tension सांभाळत खेळी करत धावफलक पुढे न्यायचा. जी गोष्ट टेस्ट क्रिकेट ची तीच एक दिवसीय सामन्याची. सचिन आणि सेहेवाग मैदानात उतरणार आणि काही वेळातच सेहेवाग आउट होऊन मैदान सोडून पेवेलियनमध्ये. सचिनची भारतीय संघातील dependability वाढवण्यामध्ये सेहेवागचा मोठ्ठा वाटा होता असे मला वाटते. सचिन कडून प्रत्येक मेच मध्ये शतक करण्याची आपल्याला सवय का लागली? कारण सेहेवागने समजूतदारपणे आणि शांतपणे खेळून एक बाजू लावून धरण्याची कधी सवयच झाली नाही !

हा कायम पहिल्या चेंडू पासून मारामारीच्या पवित्य्रात. थोड्याफार धावा काढून पुढचे ३ तास पेवेलियन मध्ये आराम करायला हा मोकळा. २०११ च्या वल्डकपचे उदाहरण घ्या ना. ४ वर्षातून एकदा येणारा हा क्रिकेट चा सर्वात मोठा उत्सव. पण या महाराजांनी गल्ली क्रिकेट खेळतोय अशा थाटात प्रत्येक सामन्यात पहिल्या बॉल ला चौकार मारलेला आहे. समोर गोलंदाज कोणीही असो. पिच कसेही असो. बॉल कसाही येवो, याचा चौकार नक्की.

मी सेहेवागला शतक केलेल्या सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना पाहिलं आहे. "सुरुवातीला मी जरा पिचचा अंदाज घेत खेळत होतो पण नंतर एकदा जम बसल्यावर मला मनमोकळी फलंदाजी करता आली आणि त्यामुळे मी हे शतक करू शकलो". माझ्या मते हा डायलॉग त्याच्या लहानपणी गांगुली किंवा सचिन ने त्याला पाठ करायला सांगितला होता आणि तोच तो प्रत्येक सामन्यानंतर घडाघडा म्हणतो. ज्याची पहिल्या बॉल पासून फक्त बॉल फोडून काढणे हीच मनीषा तो असा विचार करू शकेल का? कसोटी क्रिकेट मध्ये बॉल ला रन ह्याची सुरुवात केली ती सेहेवागनेच. शांत डोक्याने शैलीदार पद्धतीने रन काढणे त्याला कधी मानवलेच नाही. आला बॉल की मार & झोड हेच ब्रीदवाक्य. त्याच्या या स्वभावामुळे क्रिकेटमध्ये ही त्याला कोणी फार गृहीत नाही धरलं. ५ - ५० रन काढून गाडी धावायला लागली म्हणजे झालं हीच त्याच्या कडून आपली अपेक्षा. याच कारणामुळे तो अनेक वेळा संघाबाहेर पडला. गांगुली, सचिन आणि नंतर धोनी यांचे संरक्षण त्याला वाचवू शकले नाही. वाईट वाटते ते या मुळेच….

एक चांगला शैलीदार फलंदाज, भात्यात सर्व प्रकारचे फटके, उत्कृष्ट timing, बेडर वृत्ती या जीवावर त्याने जी फलंदाजी केली त्याला मात्र तोड नाही. त्याचे ऑफ side चे बंदुकीच्या गोळीच्या वेगाने जाणारे चौकार हा म्हणजे केवळ अवर्णनीय आनंद. कणभर ही पदलालित्य न करता केवळ timing आणि फलंदाजी मधील ताकद या जीवावर त्याने १५००० पेक्षा जास्त धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये काढल्या त्याला खरंच तोड नाही. कित्येक वेळा सचिनही त्याची मैदानावरील फलंदाजी पाहून (अम्पायर पाशी उभे राहून) दिन्मुढ झालेला मी स्वत: पाहिले आहे.  कधी त्याची फलंदाजी पाहून श्रीकांतची आठवण व्हायची तर कधी रिचर्डसची. कधी सचिनची तर कधी आरशातल्या गांगुलीची (गांगुली लेफ्टी होता म्हणून).

सेहेवाग ला भारतीय क्रिकेट ने भरपूर काही दिले आणि भारतीय क्रिकेटला सेहेवागने. सेहेवाग, सचिन, गांगुली आणि धोनी यांनी भारत जिंकूही शकतो आणि पुढे वर्ल्ड कप जिंकू शकतो हा आत्मविश्वास दिला. पहिल्या १० ओवर मध्ये २० रन आणि ५० ओवर मध्ये मरत मरत २०० ते २२५ रन हे वर्षानुवर्षाचे गणित बदलण्यात यांचा सिंहाचा वाटा होता. १९७५  साली सुनील गावस्करने वन डे मध्ये १७४ बॉल मध्ये ३६ रन काढल्या होत्या आणि त्याच क्रमांकावर येउन ६० बॉल मध्ये १०० रन काढणारा सेहेवाग. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. स्फोटक खेळी आणि धावांचा पाऊस असे वर्णन करता येतील अशा अनेक खेळी सेहेवाग ने केल्या. अशक्य वाटणारे सामने भारताला जिंकून देण्यात त्याचे योगदान होतेच. फक्त मनात एकच इच्छा राहते. जरा सुज्ञपणे आणि शांतपणे हा खेळला असता तर अजून एक भारतरत्न सचिन आपल्याला पाहायला मिळाला असता. अनिश्चित खेळी असूनही टेस्ट क्रिकेट मध्ये ५० ची सरासरी देणाऱ्या सेहेवागने निश्चित खेळी करून कदाचित Bradman ना गाठले असते. २०-२० सामन्याची मुळे सेहेवागच्या खेळात सापडतात पण त्याला त्यातही करियर करता आले नाही. पण नियतीची तशी इच्छा नव्हती. आणि मैदानावर निवृत्ती न घेता त्याला अशी निवृत्ती घ्यावी लागली.

भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन ३१९ काढणारा सेहेवाग आपल्या मनात घर करून राहतो ते त्यामुळेच…. नाही का?

- मंदार कुलकर्णी
23 Oct. 15

Thursday, September 24, 2015

युती आघाडी

युती आघाडी होणार की नाही, आहे अजून अज्ञात
लोकशाही गुंडाळून ठेवली आहे सर्वांनी बासनात..... || धृ. ||

प्रत्येकाचे वेगळे गणित, प्रत्येकाची वेगळी तर्हात
सत्तेसाठी ओढाव्या लागतात अनेकांना नाकदुर्याू
काहीतरी किम्मत ठेवती आहे का त्यांनी आता जनात ... || 1 ||

कोणाचा कोणाला लागत नाहीये आता मेळ
युती आणि आघाडीत चालला आहे पोरखेळ
नक्की काय ते कळत नाही यांच्या मनात .... || 2 ||

शिवसेना म्हणते आम्ही मोठे भाऊ, भाजपा म्हणते तुम्ही प्रादेशिक
स्वबळाची भाषा करून आहेत दोघे अगतिक
जागांच्या रस्सीखेचीत कार्यकर्ता आहे संभ्रमात.... || 3 ||

इकडे दादा आणि बाबांचं अजिबात जमत नाही
निवडून यायची फारशी आशा मनातच उरली नाही
पंधरा वर्षाची सत्ता अशी कशी घालवायची क्षणात.... || 4 ||

सार्याच पक्षांनी करून टाकली आहे लोकशाही स्वस्त
निवडणुकीच्या गोंधळात पक्षनेते आहेत मस्त
सामान्य मतदारांना मोजावी लागतीय त्याची किम्मत.... || 5 ||

-       मंदार कुलकर्णी
21 सप्टेंबर 2015

Tuesday, August 4, 2015

गरज, चैन आणि पात्रता


 

आज बरेच दिवसांनी लिहावेसे वाटत आहे. गरज, चैन आणि पात्रता याची जरा गुंतागुंत झाली आहे. माझ्या लहानपणी मला पुलं म्हणतात तसे कधी वारावर जेवावे लागले नाही की कधी फुटपाथ च्या दिव्याखाली अभ्यास करावा लागला नाही. पण आई वडिलांनी कोणतीही गोष्ट 'गरज' असल्याशिवाय घेऊन दिली नाही. मग ते नवीन शाळेचे दप्तर असो, कंपासपेटी नाहीतर रेनकोट किंवा छत्री असो. पुस्तके - वह्या दरवर्षी मला नवीन मिळाली पण जेवढी पाहिजे तेवढीच. कॉलेज मधे गेल्यावर तेही १८ वर्षे पूर्ण झाल्यावर एकदाच स्वयंचलित वाहनाची मागणी केली होती पण 'आधी पेट्रोलचे पैसे मिळवायला लाग, मग पाहू' असे स्पष्ट उत्तर मिळाले होते. तेव्हा गरज, चैन आणि पात्रता यातला फरक चांगला कळत होता आणि आमच्या मागण्याही त्या प्रमाणेच होत्या. एकही अनावश्यक वस्तू किंवा गोष्ट घरात आल्याचे मला आठवत नाही. अगदी TV सुद्धा आला ते आमच्यापेक्षा चाळीतल्या लोकांनी जास्त तगादा लावला म्हणून. तीच गोष्ट फ्रिज ची.

आज जेव्हा मी याची तुलना आजच्या काळाशी करतो तेव्हा मती गुंग होते. आज मुलांना स्वतंत्र खोल्या तर आहेतच पण त्याच बरोबर स्वतंत्र कपाटे, असंख्य पुस्तके, खेळणी तर विचारुच नका. बर, एकदा एका खेळण्याला हात लावला की परत तेच कोणी खेळत नाही. दरवेळी नविनच हवे. खेळण्याच्या दुकानातील सर्वात मोठ्ठा ट्रक हवा, सर्वात मोठ्ठी डॉल किंवा बार्बी हवी, सर्वात मोठ्ठी पिगी बँक हवी आणि बरेच काही. आजचे पालकही 'लाड' नावाखाली हे सर्व घेऊन देतात. हे झाले केजी पर्यन्त.

शाळेत जाणारी आजची पिढी अजून पुढे आहे. तिसरी मधे पालक मुलांना टॅब हातात देत आहेत आणि चौथी मधे मोबाईल. माझा मुलगा या क्लासला जातो संध्याकाळी, काळजी वाटते, म्हणून आपला दिला आहे मोबाईल त्याच्याकडे." "त्याच्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे मोबाईल, मग तोच खूप मागे लागला. काय करणार? घ्यावाच लागला." "ट्रेस करायला बरे पडते गं तिला… आज आहे शक्य आम्हाला म्हणून घेतला मोबाईल. आमच्या लहानपणी फोन सुद्धा नव्हते…” असे असंख्य डायलॉग ऐकायला मिळतात आणि मती गुंग होते. ही गोष्ट वाटते तितकी साधी आणि सरळ नाही. मुलांना या वयात मोबाईल घेऊन देणे गरज ही नाही; चैन त्याहून नाही; पात्रता तर नाहीच नाही. ज्या वयात त्यांनी केवळ पेन्सिलने लिहिणे अपेक्षित आहे, ज्या वयात त्यांनी फक्त अभ्यास, मैदानी खेळ खेळायला पाहिजेत त्या वयात मुलांना २४ तास हाताशी मोबाईल आणि गेम्स देवून आपण काय योग्य करतो? मोबाईल आणि कॉम्पुटर वर गेम्स खेळून मुलांची ताकद आणि स्टॅमीना वाढणार आहे का? आज अनेक चौथी-पाचवीच्या मुलांचे whatsapp ग्रुप आहेत. ते या ग्रुप वर काय वाचतात, काय लिहितात, काय चर्चा करतात हे पाहायला पालकांना वेळ नाही. पालक या मुलांना स्पष्टपणे का सांगू शकत नाहीत की "तुझे हे वय नाही त्यामुळे तुला या वस्तू मिळणार नाहीत…."

२ व्हीलर ची हीच तऱ्हा. ११ - १२ वर्षाची मुले बिनधास्त २ व्हीलर घेऊन फिरतात, क्लासला जातात. सरकारने १६ वर्षाच्या आत २ व्हीलर नाही चालवायची हे सांगितले असतानासुद्धा? केवळ आपल्याला तोशिश नको यासाठी पालक मुलांना २ व्हीलर का देतात? ह्या गोष्टी मुलांची पात्रता आणि वय नसताना देणे अयोग्य नाही का?
 
विचार करू या….

- मंदार कुलकर्णी
४ ऑगस्ट २०१५

 

Saturday, February 28, 2015

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
खरंच राहिली आहे का महाराष्ट्रात मराठी.... धृ.

अमृताचेही पैजा जिंके अशी आपली भाषा
नामदेवापासुन सर्व संतांनी दिला वेगळी परिभाषा
सातवाहनापासून शिवाजी पर्यन्त बोलली गेली ती मराठी .... 1

ज्ञांनोबाची ज्ञानेश्वरी आणि तुकारामाच्या गाथा
संस्कृतची धाकटी बहीण म्हणून आम्ही टेकतो माथा
दोन हजार वर्ष जुनी आहे आपली भाषा मराठी .... 2

टिळक, गोखले, रानडे, कर्वे, सावरकर यांची ही मराठी
अत्रे, तांबे, गोनी, फडके, पुलं, कुसुमाग्रज यांची ही मराठी
का मग झगडावे लागते अभिजात दर्जा मिळण्यासाठी .... 3

इंग्रजांची सत्ता बरी इतके इंग्रजीचे आक्रमण झाले आहे
हिंजवडी चं हिंजेवाडी आणि तळवडे चं तलवडे ही तर नुसती सुरुवात आहे
दोन मराठी लोक बोलतात फक्त हिन्दी, ना मराठी  .... 4

शुद्ध मराठी वाक्य बोलणारी माणसं आज सापडत नाहीत
मराठी माध्यमाच्या शाळांत आज विद्यार्थीच उरले नाहीत
अखिल भारतीय सम्मेलने भरवून टिकणार आहे का मराठी.... 5

मराठी भाषा मरत नसते असे नुसते भाषणात म्हणायचे
मनातून मात्र जगाची भाषा इंग्रजीचे गोडवे गात सुटायचे
अशाने फक्त इतिहासात राहील आपली मराठी.... 6  

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
खरंच राहिली आहे का महाराष्ट्रात मराठी....

-        मंदार कुलकर्णी
२७ फेब्रु २०१५ (मराठी भाषा दिन)


Saturday, February 14, 2015

व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल….



व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल….
काल सर्व जगाने व्हॅलेंटाइन्स डे साजरा केला. दिवसभरात गम्मत म्हणून मी काही क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. 

1.   फर्ग्युसन रोड वर दर वर्षी प्रमाणे तरुणांची ही गर्दी. फुलं, फुगे यांची रेलचेल. महागड्या गाडीवरून आपल्या व्हॅलेंटाइन्स ला घट्ट पकडून गाड्या उडवायची चढाओढ. सामान्य लोकांना रोड वरून चालायला जागा नाही आणि तरुणांच्या त्यांच्या वरील नजरा अशा की ...

2.   Camp मध्ये ही थोडेफार असेच दृश्य. फक्त तिथला तरुण वर्ग अजून Cosmopolitan. तीच गर्दी... तीच चढाओढ.

3.   पुण्यातला कोणताही चौक – आज 5 रुपयाचे गुलाबाचे फूल 20 रूपायला. गेले 15 दिवस Cold Storage मध्ये ठेवलेली फुले आज चौका चौकात ताजी फुले म्हणून विकायला. काही फुलांच्या पाकळ्या कोमेजून पडायच्या बेतात पण बाजूने प्लॅस्टिकचा आधार लावल्याने त्याही आतील कळ्यांशी जोडल्या गेलेल्या. बरीचशी फुले पाणी मारून मारून जीवंत ठेवलेली. हीच तर्‍हा पुष्पगुच्छाची. एरवी 50 रूपायला मिळणारे आज मात्र 200 ला .

4.   दुपारची वेळ. चौकात गुलाबाची फुले हातात घेऊन So Called फूल विकणार्‍या लहान मुली उभ्या. एक तरुण सांगतो एक चांगले फूल द्या. ती त्यातल्या त्यात एक बरे फूल पटकन काढून देते आणि म्हणते 30 रुपये. तरुण पाकिटात गेलेला हात तसाच बाहेर कडून म्हणतो “काही कमी नाही का होणार?”…. “असू दे”. थोडासा Confused, थोडासा नाराज होऊन तो तरुण पुढे निघून जातो.

       आज खरेदी झालेल्या वस्तूंची यादी – गुलाबाची फुले, बदामाच्या आकाराच्या उश्या, टेडी, थोडीफार ग्रीटिंग कार्ड आणि फक्त होटेलिंग. वैयक्तिक मला व्हॅलेंटाइन्स डे हा प्रकार मुळीच पटलेला आणि रुचलेला नाही. कॅथोलिक माहितीकोशानुसार म्हणे तीन व्हॅलेंटाइन्स होते. एका व्हॅलेंटाइन्स ला सन २६९ मध्ये देहदंडाची शिक्षा झाली होती. कैदेत असताना तो जेलरच्या मुलीच्या प्रेमात पडला. तिला मरण्याआधी चिट्ठी लिहिली. त्यात लिहील होते - From your व्हॅलेंटाइन्स ! तो व्हॅलेंटाइन्स मेला तो दिवस व्हॅलेंटाइन्स डे !!! थोडक्यात दंतकथेतील एका व्यक्तीच्या पुण्यतिथीचा दिवस.... त्या महाशयांच्या भारताच्या इतिहासाचा काही संबंध नाही. कुणाला त्याच नावही माहित नव्हत. भारतीय इतिहासात एकापेक्षा एक दिग्गज असताना याची काही गरज नव्हती. फक्त स्त्री आणि पुरुष याचं प्रेम ही संकुचित, संधिसाधू वृत्ती भारतात कधीच नव्हती. भारतात पहिल प्रेम मातापित्यावर, गुरुवर, मित्रावावर, गावकर्यांवर आणि जनावरांवरही करतात. नदीला माता मानणाऱ्या या देशाने "दिसला आणि प्रेमात पडला " अश्या वरवरच्या प्रेमाला मानले नाही. शत्रूवरसुध्दा प्रेम करणारा हा देश आता व्हॅलेंटाइन्स ला फक्त स्त्री आणि पुरुष यांच्या प्रेमात अडकवण्यात येत आहे. विदेशी कंपन्या एड्स ची भीती दाखवून कंडोम विकतात. पण अनैतिक संबंध ठेवू नका अस सांगत नाहीत. जी गोष्ट व्हॅलेंटाइन्स डे तीच आजकाल गरबा आणि दसर्‍याला. काहीही करून आजच्या तरुण तरुण आणि तरुणींना घरा  बाहेर काढणं हेच यांचं उद्दीष्ट झालं आहे. त्यांना यात वाहवत नेणे आणि आपला धंदा करणे हेच यांचं काम...
       आता हा इतिहास जरा नीट समजून घेऊया. तसे पाहायला गेल्यास ज्या व्हॅलेंटाइनच्या नावावर हा दिवस आहे, त्याच्या एकूण अस्तित्वाबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात॰ गुढतेचे वलय असणा-या अशा एक नव्हे तीन व्हॅलेंटाइन नावाच्या संतांना कॅथलिक चर्चची मान्यता आहे. त्यापैकी रोमन सम्राट क्लॉडियसच्या काळातील संत व्हॅलेंटाइन याचा या प्रेमदिनाशी संबंध लावता येईल. कारण सम्राट क्लॉडियसनेसैन्यातील शिपायांनी लग्न करू नये’, असा फतवा काढला होता. अर्थात त्यामागे काही कारणेही होती. सम्राटाच्या मते, ज्यांचे लग्न झालेले असते, ते जीवावर उदार होऊन लढत नाहीत.’, परंतु या व्हॅलेंटाइनने राजाच्या या धोरणाविरोधात जाऊन या सैनिकांची गुप्तपणे लग्ने लावून देण्याचा धडाका लावला होता. राजाला व्हॅलेंटाइनच्या त्या कृतीचा खूप राग आला. त्यामुळे चिडून जाऊन त्याने व्हॅलेंटाइनला देहदंड दिला. ज्या दिवशी व्हॅलेंटाइन यांना मरण आले, तो दिवस व्हॅलेंटाइन्स डेम्हणून साजरा करण्याची पद्धत युरोपीय देशात सुरू झाली. पण ती प्रेमीकजनांनी एकमेकांना फुले, चॉकलेट आदी भेटी देण्यापुरतीच मर्यादित होती. गेल्या ५० वर्षात अमेरिकेतील काही हुशार व्यावसायिकांनी व्हॅलेंटाइन्स डेहा एक मोठा इव्हेंटआहे, त्यामध्ये बौद्धिक आणि आर्थिकदृष्टय़ा सबळ व स्वतंत्र असणारी तरुणाई गुंतू शकते, असा अंदाज बांधला आणि हळूहळू या दिवसाला प्रेम उत्सव दिनबनवण्यासाठी वातावरणनिर्मिती केली. अमेरिकेपाठोपाठ गेल्या दोन दशकांत व्हॅलेंटाइन्स डे सर्व खंडात पोहोचलाय. भलेही स्थानिक संस्कृतीशी त्याचे काहीही नाते नसले तरी जागतिकीकरण आणि बाजारीकरणाचा प्रभाव इतका जबरदस्त की व्हॅलेंटाइन्स डे आता जगभरातील प्रेमीजनांना आपला वाटू लागलाय.
       गमतीचा भाग असा की भारतात प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी वसंतपंचमी हा भारतीय तरुणाईसाठी प्रेमदिवस होता. वसंत ऋतु ची सुरुवात आणि नवीन ऋतूचे आगमन. प्राचीन वाङ्मयात, ऐतिहासिक कथा-कवितांमध्ये वसंतपंचमीच्या दिवशी तरुण, मुले-मुली कशाप्रकारे एकत्र येत, नाचणा-यांमध्ये रंगून जात असत त्याचे अनेक उल्लेख येतात. वसंतपंचमीला प्रेमाचा दिवस मानण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे भारतीय वाङ्मयात ज्याचा उल्लेख प्रीतीदेवता असा केला जातो, त्या कामदेवाचा जन्म वसंतपंचमीचा, म्हणून आजही अनेक ठिकाणी रती-मदनाची पूजा केली जाते. खास करून आपले वैवाहिक आयुष्य सुखी राहावे यासाठी ही पूजा करण्याचा भारतात प्रघात होता. एकूण काय तर पाश्चिमात्य बाजारपेठेतून आयात केलेला व्हॅलेंटाइन्स डेमाध्यमांच्या प्रभावामुळे सर्वदूर पोहोचला. त्यातही कडव्या हिंदू संघटनांनी त्याला अकारण विरोध केल्यामुळे तर तो अधिक प्रकाशात आला आणि वसंतपंचमीच्या जागी व्हॅलेंटाइन्स डे प्रेमदिनम्हणून कधी स्थानापन्न झाला, हे लोकांना कळलेही नाही.
 
       आता आपण ठरवायचे की आपण काय करायचे .... विचार करूया.... 

-           -  मंदार कुलकर्णी
15 फेब्रुवारी 2015