Followers

Tuesday, July 30, 2019

पार्टी विथ डिफरन्स...



राजकारणात कोणी साधूसंत नसतात आणि आध्यात्मिक कामे करायला आलेले नसतात. तो सत्तेचा खेळ असतो आणि आपल्या पापकर्मालाही पुण्य़कर्माचा रंग चढवून मतलब साधले जात असतात. इतरांचे आमदार फ़ोडून वा विकत घेऊन सत्तेची समिकरणे साधण्यातच कॉग्रेसची हयात गेलेली आहे. भाजपा आता त्याचेच अनुकरण करतो आहे. आपल्याला राजकारणात टिकायचे असेल, तर वेगळेपणाने जगता येणार नाही, हे ओळखूनच मोदी-शहा भारतीय राजकारणात अवतरले आहेत.

सध्याच्या भाजपा ची पावले ही याच गोष्टी दर्शवतात. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर जिवंत असताना बाकीच्या छोट्या पक्षांची मदत घेत सरकार नीट चालले होते. ते गेल्यावर एकूणच गोवा भाजपा मध्ये झालेला विचार बदल हा पाहण्यासारखा होता. आधी असलेले काठावरील बहुमत आणि तसे असूनही नंतर ज्या पद्धतीने त्यांनी मित्र पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत वागवले, त्यांच्या बरोबर जागेचे वाटप केले यात संशयाला सुरुवातीपासूनच जागा निर्माण झाली होती. एवढे असूनही ज्या पद्धतीने पुढची पावली टाकली गेली यात दिल्लीच्या ईश्वराचा वरदहस्त असलाच पाहिजे. काँग्रेसमधील 15 पैकी दहा आमदार अचानक भाजपामध्ये प्रवेश करतात. पक्ष बदल कायद्याच्या कचाट्यात कुठंही न अडकता काँग्रेसचे एवढे आमदार भाजपामध्ये येणे ही नक्कीच साधी सरळ घटना नाही. त्यांना मिळालेली आश्वासने - प्रलोभने यांचे आकडे कधीही आपल्या समोर येणार नसले तरी ते किती मोठे असतील याची आपण कल्पना करू शकतो.

स्मृती ईराणी आणि अमित शहा यांच्या मोकळ्या झालेल्या राज्यसभेच्या जागेचेही असेच. या रिक्त झालेल्या जागा परत भाजपालाच मिळतील या साठी कराव्या लागणाऱ्या सर्व बुद्धिबळाच्या खेळ्या केल्या गेल्या.

कर्नाटकात 15 आमदारांनी राजीनामे देणे आणि अनेक दिवस त्यावर त्यांनी ठाम राहणे हे नक्की नैसर्गिक नाही. नक्कीच त्याची मोठी किंमत मोजली गेली असणार. वास्तविक या 15 आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा येऊ शकतो याची पूर्ण कल्पना त्यांना होती. तसेच त्यांचे राजीनामे जर अध्यक्षांनी स्वीकारले नाही तर त्यांना पक्ष सोडता येणार नाही आणि भाजपामध्ये जाऊन मंत्रिपद उपभोगता येणार नाही याचीही त्यांना कल्पना असणार, तरीही पक्ष नेतृत्वाचा आदेश झुगारून अशा प्रकारची कृती करणे या मागे नक्कीच मोठे पाठबळ असणार. वास्तविक पाहता विधानसभा भंग करून परत निवडणुका घेण्याचा निर्णय भाजपाने घ्यायला हवा होता. लोकसभेत कर्नाटकात मिळालेले नेत्रदीपक यश पाहता परत निवडणुका घेऊन बहुमत मिळवणे फारसे अवघड नसतानाही अमित शहा यांनी येदूरप्पा यांना आहे त्या संख्या बळावर सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले आणि काल येदूरप्पा यांनी शपथ घेतली सुद्धा. याचा अर्थच असा की बहुमत सिद्ध करायची संपूर्ण तयारी अगोदरच झाली आहे. पण अशा पद्धतीने बनवलेले सरकार किती काळ टिकणार? आणि किती लोकोपयोगी निर्णय घेणार? 

एकंदरीत दिल्लीश्वरांना राज्यसभेत बहुमत मिळण्याची फारच घाई झालेली दिसते आहे. नैसर्गिक रीतीने मे 2020 मध्ये बहुमत दिसत असताना आतापासूनच देशात आणि राज्यात जो घोडेबाजार चालू आहे त्यावरून त्यांचे लक्ष्य स्पष्ट आहे. लोकसभेत बहुमत आहे पण राज्यसभेत बहुमत नसल्याने बरीच विधेयके आणि कायदे अमलात आणता येत नाहीत हे जरी मान्य असले तरी लोकसभा आणि राज्यसभा ही संकल्पना आणि त्याचे नियम व कायदे आपण संविधानातच मान्य केले आहेत ना? मग राज्यसभेत बहुमत मिळवण्याची इतकी घाई कशासाठी? विरोधी पक्ष म्हटल्यावर ते विरोध करणारच पण याचा अर्थ येन केन प्रकारेण आमदारांची खरेदी करून राज्यसभेत बहुमत घाईने मिळवणे योग्य आहे का? आजच्या हिशोबाने अजून मात्र 5 जागा राज्यसभेत भाजपाला मिळवायच्या बाकी आहेत. वास्तविक पाहता मित्र पक्ष विचारात घेतले तर आजही एन डी ए ला राज्यसभेत बहुमत मिळाले आहे पण शत प्रतिशत भाजपाच्या नावाखाली अशा पद्धतीने वाटचाल करणे योग्य नाही.

आपण ही गोष्ट नक्कीच मान्य करायला हवी की काँगेसने गेल्या 70 वर्षात अनेक असंवैधानिक गोष्टी केल्या, प्रचंड बहुमताचा वापर करून अनेक कायदे बदलले, अनेक बिगर काँग्रेस सरकारे राष्ट्रपती शासन आणून पाडली, अगदी आणीबाणी सुद्धा लादली. पण याचा अर्थ आता भाजपाकडे सत्ता आल्यावर त्यांनीही तसेच वागणे योग्य आहे का? मोदी कितीही "सबका साथ सबका विकास" असा जयघोष करीत असले तरी त्यांची वाटचाल आणि अमित शाह यांची पावले ही "अनैतिक हेच नैतिक" या कडे वळत आहेत. 1985 साली राजीव गांधी यांनी विरोधी पक्ष नेते पद कोणाला दिले नव्हते म्हणून 2014 आणि 19 मध्ये मोदी यांनी दिले नाही. संविधानातील नियमाप्रमाणे ते योग्य असले तरी नैतिकता या दृष्टिकोनातून विचार करता चांगल्या लोकशाही साठी ते आवश्यक होते. दुर्दैवाने 2019 मध्ये विरोधी पक्षाचे कंबरडे पूर्ण मोडले आहे आणि चांगले व विचारी लोकच काँग्रेसमध्ये न उरल्यामुळे परिस्थिती अजूनच वाईट झाली आहे. राहुल गांधी यांनी अडगळीत टाकल्यामुळे संसदेमध्ये आजकाल चांगली, विचारी चर्चाच होत नाहीये. त्यात सरकार जर फारशी चर्चा न करता दणादण विधेयके पुढे रेटून नेट असेल ते कितपत योग्य आहे?



याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे माहिती अधिकार कायद्यात केलेले बदल. 2005 साली 40 लोकांच्या बलिदानाने आणलेला माहिती अधिकार कायदा. गेल्या 14 वर्षात त्याचा झालेला सढळ वापर पाहता तो अजून उपयोगी करायची आवश्यकता होती. पण ज्या पद्धतीने मोदी सरकारने तो लोकसभेत आणि राज्यसभेत फारशी चर्चा न करता रेटून नेला तेव्हा त्यात निश्चितच पारदर्शकता दिसत नाही. भाजपा सरकार म्हणजे काही एखादे खासगी कंपनीचे कार्यालय नाही की जिथे काही मंडळी जमून पटापट निर्णय घेतात आणि अमलात देखील आणतात. लोकशाही प्रणाली मध्ये कुठलेही दुरुस्ती विधेयक आणताना त्यावर लोकसभेत आणि राज्यसभेत विस्तृत चर्चा होणे आणि विचारमंथन होऊन सुयोग्य निर्णय घेणे हीच आपली परंपरा आहे. गेली काही वर्षे विरोधी पक्ष हा जो आरोप करतात तो योग्यच आहे. 

ज्या हत्याराने विरोधक लढतील, त्याच मार्गाने जावे लागेल अशी खुणगाठ बांधून मोदी शहा डावपेच खेळत आहेत. म्हणूनच हा भाजपा म्हणजे खरोखरच वाजपेयींपेक्षा ‘पार्टी विथ डिफ़रन्स’ आहे. त्याने निर्दयपणे व बिनदिक्कत सत्ता मिळवण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी कॉग्रेसचीच कार्यशैली पुरोगामी राजकारणावर मात करायला अवलंबलेली आहे. ही फक्त सुरुवात आहे. जर मोदी शहा यांना त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करून हवे असेल तर अशा प्रकारच्या चालीतून निंदाही सोसावी लागणार आहे.

मंदार कुलकर्णी
27 जुलै 2019

Thursday, July 18, 2019

दि बिग थ्री


इंग्रजी विकिपीडिया वर 'दि बिग फोर' नावाचा एक लेख आहे. २१ व्या शतकातील ४ महान टेनिस खेळाडूंना समर्पित असलेला हा लेख आहे. फेडरर, नदाल, जोकोविच आणि मरे हे ते चार खेळाडू. कालांतराने मरे ची कारकीर्द आता संपत आली आहे आणि या वर्षी तो फक्त दुहेरी सामने खेळत आहे. पण बाकी ३ मंडळींना तोडच नाही.

फेडरर, नदाल, जोकोविच यांनी अशी कोणतीही स्पर्धा सोडली नसेल ज्यात त्यांना विजय मिळाला नसेल. बाकी कशाला, ग्रँड स्लॅम स्पर्धेचेच घ्या ना. २०, १८ आणि १५ अशी यांची नुसती विजेतेपदे आहेत. आणि या वर्षी ही विम्बल्डन या तिघांपैकीच एक जण घेणार हे निश्चित आहे. मरे आणि वोवरिंका हे प्रत्येकी ३ विजेतेपदे मिळवणारे त्यांच्या खूप खूप मागे आहेत.

२००४ साली फेडररने विजयाचा सपाटा सुरू केला तर नदाल ने २००६ मध्ये. जोकोविच ने २०११ मध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि ते तिघेही अजूनही थांबायचे नाव घेत नाहीयेत. त्यांच्या आधीचे, त्यांच्या बरोबरीचे आणि त्यांचा खेळ पाहून लहानाचे मोठे झालेले आणि आता त्यांच्याशी सामना करणारे आले आणि गेले पण याचा विजयाचा ओघ काही थांबत नाहीये.

फेडरर चे आता प्रत्येक सामन्यांमागे नवीन काहीतरी रेकॉर्ड होत आहे. १९७०-८० च्या दशकातील अनेक महान खेळाडूंना मागे टाकत नवीन उच्चांक तो मोडत चालला आहे. याच आठवड्यात त्याने सर्व ग्रँड स्लॅम मध्ये ३५० आणि विम्बल्डन मध्ये १०० विजय मिळवले. नदालचे तसेच. गवतावरच्या टेनिसचा राजा हे बिरुद लागून अनेक वर्षे झाली पण याचा उत्साह काही कमी होत नाहीये. जोकोविचने तर सर्बिया सारख्या अत्यंत युद्धप्रवण देशातून टेनिसला सुरुवात केली आणि आज सर्व प्रकारच्या टेनिस वर तो आज अधिराज्य करत आहे.

मग प्रश्न पडतो की गेल्या १८-२० वर्षात ही मंडळी अजिंक्य कशी राहिली? इतर बाबतीत आपण म्हणतो, पुढची पिढी नवीन विजय किंवा रेकॉर्ड करते मग टेनिस मध्येच हे का होत नाहीये?

फेडरर, नदाल, जोकोविच हे तिघेही कधीही सहजासहजी हार मानणारे खेळाडू नाहीत. सेटच्या शेवटच्या गुणापर्यंत काहीतरी वेगळे अचूक करायची त्यांची तयारी आहे. हे तिघेही आजही रोज ३ ते ४ तास सराव करतात. नवीन खेळाडूंपैकी किती जण इतका आणि इतके वर्ष सराव करत असतील किंवा अजून या पुढे करतील?

फेडररचा विचार केला तर आजही तो तेवढ्याच ताकदीने खेळ करतो जो तो १८ ते २० वर्षांपूर्वी करत होता. त्या बरोबर त्याला जोड आहे ती अचुकतेची. ही अचूकता फार कमी खेळाडूंना गवसली आहे. त्याने मारलेला फटका हा बेस लाईन पासून दोनच इंच आत पडतो मग तो फोर हँड असो किंवा एक हाताने मारलेला बॅक हँड असो. तो आपोआप किंवा सहज पडत नसतो. त्यासाठी त्याने केलेले परिश्रम दिसतात. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी चेंडू अतिशय वेगात परतवणे आणि प्लेसमेंट करणे अतिशय अवघड गोष्ट पण ती त्याला साध्य झाली आहे. फेडररचा कोर्टवरील वावर पहाण्यासारखा असतो. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवत अगदी कमी पावलात तो संपूर्ण कोर्ट पादाक्रांत करतो आणि अगदी शिताफीने आणि अचूक फटका मारून पॉईंट घेतो. एस हे त्याचे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. जिंकल्यावर डोके शांत ठेवून अजिबात उत्तेजित न होता अतिशय संयमी प्रतिक्रिया तो देतो आणि तिथेच तो सर्वांचे मन जिंकतो.
नदालची तऱ्हाच वेगळी. त्याचासारखा कोर्ट वर धावणारा खेळाडू मी अजून पाहिला नाहीये. सर्व्ह घेताना तो बेस लाईन पासून १० फूट मागे उभा राहतो जेणेकरून सर्व्ह कुठेही पडली तरी पायाची हालचाल करून ती परतवण्यासाठी त्याला काही निमिष जास्त मिळतात. प्रचंड घामाने निथळत असताना तो कोर्टच्या सर्व बाजूस वेगात पळत जातो. त्याचा फोरहँड हा जास्त जोरकस त्याच्या बॅक हँड पेक्षा असल्याने तो बॅक हँड फोर हँड मध्ये बदलून बऱ्याच वेळेला खेळतो. सहसा नेटपाशी न येणारा नदाल सर्व्ह आणि व्हॉली जरा कमीच करतो. ताकद आणि क्षमता मात्र अफाट. मातीवरचा राजा उगाच नाही म्हणत त्याला.

जोकोविच २०११ पासून भरात आला. त्याच वर्षी मी त्याला विम्बल्डन मध्ये प्रत्यक्ष सामना खेळताना पाहिले आणि तो त्या वर्षी विजेता बनला !! आणि पुढे जिंकतच राहिला. अत्यंत संयमी तर कधी कधी कोर्ट वर मजा करणारा असा हा खेळाडू. बेस लाईन आणि नेट याचा अजोड मिलाप करणारा हा अलौकिक खेळाडू आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूचे कच्चे दुवे शोधून त्या प्रमाणे हा खेळ करतो. नेट जवळच्या त्याच्या उड्या म्हणजे डायविंग व्हॉली थेट बोरिस बेकरची आठवण करून देतो.

तर असे हे तीन महान खेळाडू. उत्तम सर्व्ह, प्रचंड स्टॅमिना आणि सकस खेळ या जीवावर हे ३ खेळाडू आज टेनिसवर अधिराज्य गाजवत आहेत. अर्थात त्यांचे कष्ट, सराव या गोष्टी आपण विसरून चालणार नाहीत. फेडरर तर नेहमी म्हणतो, टेनिस साठी त्याने काय गमावले तर त्याचे अख्खे बालपण. या खेळाडूंना जर हरवायचं असेल तर नवीन खेळाडूंना त्यांच्यापेक्षा चांगला खेळ करावा लागेल. त्यासाठी जास्त सराव, जास्त सकस खेळ आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक खेळाडू आले आणि गेले. पण हे तीन हिरे अजूनही टेनिस च्या क्षितिजावर एखाद्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे तळपत आहेत.


मंदार कुलकर्णी
१२ जुलै २०१९

Thursday, July 4, 2019

अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन

उद्या म्हणजे 4 तारखेला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे आणि आताच मिळालेल्या माहितीनुसार मिशिगन येथील एक मराठी ग्रुप त्या दिवशी भारतीय झेंडा घेऊन त्यांच्या परेड आणि समारंभात सामील होणार आहे. मुळात अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असताना मराठी लोकांचे तिथे काय काम? असे गृहीत धरू की त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे तर मग भारताचा झेंडा किंवा मराठी बाणा तिथे मिरवायची काय गरज आहे? सरळ अमेरिकन झेंडा घेऊनच पदयात्रेत सामील व्हायचे ना. तसेही OCI मंडळींचा तसा शपथविधी होतोच की.
या वर कहर म्हणजे हा ग्रुप त्यांच्या या पराक्रमाची जाहिरात पुणे आणि मुंबई आकाशवाणी आणि येथील वृत्तपत्रात करीत आहे. आणि ती करताना त्यांना धड मराठी शब्द ही उच्चरता येत नाहीत.
मराठी सण एक वेळ समजू शकतो पण अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन अशा पद्धतीने साजरा करायचा???
मंदार कुलकर्णी

Monday, July 1, 2019

हुश्शार


ठिकाण नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर म्हणजे अतिशय विचारी, श्रीमंत असलेली मंडळी राहतात अशी सोसायटी. त्या लोकांना काळाच्या पुढचा विचार करुन तिथे पूर्वी जागा घेतल्याचा अभिमान तर आहेच पण त्या शिवाय सर्व प्रकारच्या वागण्यात आणि बोलण्यात असणारा पुणेरी शिष्ठपणा सुद्धा. तो आजचा विषय नाहीये.

आज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक अत्यंत मजेशीर दृश्य पाहायला मिळाले. रात्रभर पडलेला पाऊस सकाळी रिमझिम चालूच होता. त्यात एक महाशय अंगावर चक्क रेनकोट घालून कॉर्पोरेशनच्या नळाला पाण्याचा पाईप जोडून त्यांच्या लाडक्या कार ला आंघोळ घालत होते. त्यांचा हा प्रकार बराच वेळ चालू होता...

मला त्यांचा फोटो काढायची तीव्र इच्छा झाली होती पण पाऊस इतका होता की त्यात माझा मोबाईल ओला झाला असता... म्हणून हा एक त्याच्या जवळ जाणारा फोटो लावला आहे.

जगात हुशार लोकांची कमी नाहीये, अति हुषारांची तर नाहीच नाही !!!

- ©मंदार कुलकर्णी
29 जून 2019

सायनोसाईडल वेव्ह


काल भारत आणि वेस्ट इंडिज चा सामना पाहिला आणि वेस्ट इंडिज संघाची कीव करावीशी वाटली. भारताने कशाबशा 258 धावा बनवल्या त्या कोहली, धोनी यांच्या प्रयत्नाने आणि वेस्ट इंडिज कशा पद्धतीने हे आव्हान पेलेल हे पाहायचे होते. पण विराट च्या सेनेने आणि विशेषतः गोलंदाजांच्या मदतीने वेस्ट इंडिजचा एक एक बुरुज ढासळला, केवळ 143 धावात सर्व संघ गारद झाला आणि भारताने हा हा म्हणता विजय साकार केला.
या भारताच्या विजयाने मला एकदम 1970 आणि 80 च्या दशकात नेले. त्या वेळेस वेस्ट इंडिजचा संघ कालिव्ह लॉइडच्या नेतृत्वाखाली असंख्य विजय मिळवत होता. गॉर्डन ग्रीनिज आणि हेन्स या सलामीची जोडी कशी फोडायची हे कोडे भल्याभल्यांना सुटले नव्हते. त्यानंतर येणारे रिचर्ड्स, लॉइड असे जबरदस्त फलंदाज आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारे माल्कम मार्शल, होल्डिंग असे कर्दनकाळ. त्यांची गोलंदाजी खेळणे म्हणण्यापेक्षा आपला जीव वाचवणे हेच जास्त योग्य वाक्य होते. भारतीय फलंदाज शिरीष कणेकर म्हणतात त्या प्रमाणे "शास्त्र" म्हणून केवळ पिचवर फलंदाजी करायला जायचे आणि काही वेळातच पेव्हेलीयन मध्ये परत येत असत.
आधीच्या पिढीतील गारनर, ग्रीफिथ आणि नंतरच्या पिढीतील वोल्श, अँम्ब्रॉस त्यांचेच भाऊ. लॉइडच्या कर्णधारपदाच्या काळात रिचर्ड्स रिचर्डसन आणि त्यानंतर लारा असे अनेक विक्रमादित्य फलंदाज जन्माला आले.
खरंच, त्या काळात वेस्ट इंडिजने क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवलं. टेस्ट क्रिकेट असो किंवा एक दिवसीय सामने असोत, बहुतेक सामन्यात त्यांचाच विजय असे. विश्वकरंडक स्पर्धेत 1975 आणि 1979 साली त्यांनी विजय मिळवलाच पण 1983 च्या अंत्य फेरीपर्यंत त्यांचे राज्य होते आणि तेच जिंकणार हे जवळजवळ ठरले होते.


भारतीय संघाची स्थिती त्या काळी याच्या अगदी विरुद्ध होती. मगाशी म्हटले त्याप्रमाणे विंडीजच्या तोफखान्यापुढे कोणाचीच डाळ शिजत नव्हती. पहिल्या डावात समजा दुसरी फलंदाजी भारताची असेल तर भारताला फॉलोऑन वाचवायला इतक्या धावा हव्यात इथपासून सुरुवात होत असे. कसोटी सामना खेळताना भारताचा उद्देश हा कायम सामना वाचवणे, ड्रॉ करणे हाच असायचा. भारताला जिंकायचे व्यसन लावले ते गांगुली आणि धोनी यांनी.
काळ बदलला आणि वेस्ट इंडिज संघाची अवस्था आता फारच दयनीय झाली आहे. ना त्यांच्या संघात चांगले फलंदाज आहेत ना त्यांच्या गोलंदाजीत आता पूर्वीसारखी धार राहिली आहे.


सध्या सायनो साईडल वेव्ह च्या वरच्या लाटेवर भारत आहे आणि खालच्या लाटेवर वेस्ट इंडिज. 40 वर्षांपूर्वी हेच चित्र याच्या उलटे होते. वेस्ट इंडिज ला यातून बाहेर पडण्यासाठी खूप मेहेनत घ्यावी लागणार हे नक्की...

- मंदार कुलकर्णी
30 जून 2019