देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि मोदी यांनी धक्कातंत्र वापरून आज भाजपाचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणलेच. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांना त्यांच्या पद्धतीने खेळवत ठेवून, त्यांना संपुर्ण अंधारात ठेवून ज्या पद्धतीने काल रात्रीपासून वेगवान हालचाली झाल्या त्याला तोड नाही. अगदी आज दुपारी १२ वाजेपर्यंत शरद पवार यांचाच हा डाव असून 'मी नाही त्यातली' असेच ते वागत आहेत असे पत्रकार आणि सोशल मीडियावरील तज्ञ सांगत होते.
ज्या प्रकारचे राजकारण शरद पवार यांनी गेले ५० वर्षे केले, ज्या पद्धतीने पक्ष फोडणे, पक्ष बदलणे, पक्ष श्रेष्ठींचा घात करणे हे प्रकार त्यांनी १९७८ पासून केले, तेच आज त्यांना अंगलट आले. त्यांच्याच पुतण्याने काकांच्या याच प्रकारांचा अवलंब करीत उप मुख्यमंत्री पद आज मिळवले आहे. अजित पवार यांनी योग्य केले का अयोग्य यात मी आज जाणार नाही, पण ५० वर्षांच्या या विषवल्लीने आज कडू फळेच दिली आणि ध चा मा करणाऱ्या काकांवरच डाव उलटवला. नारायणराव पेशवे यांना त्यांच्या लहान वयामुळे जे जमले नाही तेच आज अजित पवारांनी करून दाखवले.
शरद पवार यांनी आजपर्यंत कोणावरच विश्वास ठेवला नाही, अगदी त्यांच्या घरच्या लोकांवरही. Management मध्ये deligation of authority म्हणून एक महत्वाचा भाग असतो. शरद पवारांनी ते कधीच केले नाही. ना कधी आपल्या कार्यकर्ते मंडळींवर विश्वास ठेवला, ना कधी ते स्वतः विश्वासार्ह बनले. १९९८ साली विदेशी जन्माच्या मुद्यावरून काँग्रेस सोडणाऱ्या पवारांनी काही दिवसांत १० जनपथ येथे जोडे झिजवायला सुरवात केली. प्रत्येक वेळी चुकीचे काम करून पत्रकारांच्या कडून मात्र, "आपण कित्ती हुश्शार" हेच कायम मीडियात आणि वर्तमानपत्रात छापून आले. आजही महाराष्ट्रातील अनेक सुजाण मंडळी याच भ्रमात आहेत आणि पदोपदी त्याचाच उल्लेख करीत असतात. विशेष म्हणजे ठाकरे मंडळीही याला भुलली आणि होत्याचे नव्हते करून बसली.
उद्धव ठाकरे काल म्हणतात, दिल्ली भाजपा कडून इतक्या दिवसात फोन का नाही आला? मुळात उद्धव ठाकरे 'शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे' आणि 'भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे' हेच विसरले. प्रादेशिक पक्षाशी प्रादेशिक नेतेच चर्चा करणार इतका साधा कॉमन सेन्स त्यांना राहिला नाही. देवेंद्र फडणवीस यांचा फोन उद्धव ठाकरे यांनी १० दिवस घेतला नाही आणि अपेक्षा करतात मोदी शाह नी फोन करावा? अमित शाह कोणत्या परिस्थितीत मातोश्री वर फेब्रुवारीत गेले हे उद्धव ठाकरे साफ विसरले आणि आता लाचारी झाली म्हणून शरद पवार यांच्या घरी, हॉटेलमध्ये भेटीघाटी घेत राहिले. 'विनाशकाले विपरितबुद्धी' याचे उत्तम उदाहरण म्हणजे
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत.
आता पुढचे होणारे राजकारण पाहूया. अजित पवार हे वैधानिक मार्गाने राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे गटनेते निवडले गेले होते. गटनेता या नात्याने आमदारांच्या बाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असतो. ते पक्षाचा व्हीप काढू शकतात. तो न मानणारे आमदार अपात्र ठरू शकतात. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर झाले आहे. त्यांना आता व्हीप जरी झाल्यास सरकारला पाठिंबा देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे १०५ + १४ + ५५ = १७४ हे नव्या सरकारचे संख्याबळ कागदावर आहे. यात सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की नवीन सरकार बनण्याच्या आधी अजित पवार यांनी वेगळा गट बनवल्याने त्यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. हरियाणा मध्ये खट्टर यांची हेच केले.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आता कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी नवीन सरकारला बहुमतापासून रोखू शकत नाही. भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवणाऱ्या केंद्र सरकारला आणि राज्यपालांना हे बेसिक नियम माहिती नसतील अशी सुतराम शक्यता नाही.
उद्धव ठाकरे यांचा 'युती' पासून सुरू झालेला प्रवास, 'महाशिवआघाडी' करत 'महाविकासआघाडी' पर्यंत येऊन पोचला आहे. बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या प्राण्याला जसे वाटते की मीच गाडी वाहतो आहे, त्या प्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेला मिळालेली सर्व मते आणि आमदार / खासदार हे माझ्याच कर्तृत्वावर मिळाले ह्या गैरसमजातून उद्धव ठाकरे कधी बाहेर आलेच नाहीत. आता ज्या पद्धतीने त्यांनी गेले ५ वर्षे वागवले आणि आता खोटे बोलून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यावरून हा पक्ष किती वेगाने महाराष्ट्रात अस्ताला जाणार आहे हे काळच सांगेल. दिवस रात्र "आमचाच मुख्यमंत्री होणार" ही जपमाळ ओढणारे संजय राऊत आणि त्यांचे आवडते पत्रकार यांनी २४ तास तेच तेच दाखवले तरी बुद्धिबळात जो बुद्धी वापरून आक्रस्ताळेपणा न करता पावले टाकतो तोच विजयी होतो हेच यातून सिद्ध होते.
माझ्या देवेंद्र फडणवीस सरकारला ३० नोव्हेंबर साठी ही भरपूर शुभेच्छा !!!
- मंदार कुलकर्णी
२३ नोव्हे. २०१९

No comments:
Post a Comment