Followers

Friday, November 29, 2019

पुन्हा एकदा फासे उलटे



अखेर भाजपाने महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात खेळलेला जुगार संपला आणि ८० तासातच देवेन्द्र फडणवीस यांना परत एकदा राजीनामा सादर करावा लागला. या निमित्ताने ज्या ज्या हुशार मंडळींनी शाळेमध्ये नागरिक शास्त्र हा विषय आणि कॉलेज मध्ये संविधान हा विषय केवळ कंटाळा येतो म्हणून ऑप्शनला टाकला होता त्या सर्वांना या सर्वाचा भरपूर अभ्यास करायला मिळाला आणि बाकीच्यांचे मनोरंजनही झाले.

गेल्या ८० तासात अनेक पत्रकार, तज्ञ मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेत आपल्याला हवा तो अध्यक्ष निवडून आणणे आणि मुख्य मतदानात १४५ चा आकडा पार करणे हे दोन महत्वाचे टप्पे होते. त्यात व्हेटो, गटनेता, विधानसभा अध्यक्ष, पक्षनेता, त्यांचे अधिकार असे अनेक विषय चर्चिले गेले आणि उद्या विधानसभेत काय होणार इथपर्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. परंतु त्यापूर्वीच अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ह्या कुठल्याही गोष्टी पहायची वेळ आली नाही आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.

महाराष्ट्राच्या बाबतीत दिल्लीश्वर मंडळींचे अंदाज कायमच चुकत आले आहेत आणि या वेळी अजित पवार यांच्या सारख्या बेभरवशाच्या माणसावर संपूर्ण विश्वास ठेवून इतका मोठी कार्यवाही करायची आवश्यकता होती का, याचा विचार करायला पाहिजे. संधी आहे म्हणून त्याचा लाभ उचलणे हे प्रत्येक वेळेला योग्य असते असे नाही. धोका पत्करताना त्यातील पुढील संभाव्य धोके, भविष्यातील अडचणी आणि जनतेला सामोरे जाताना करावयाचे मुद्दे याचा विचार करायला हवा होता.

या उलट आता हे ३ पक्ष अजून शहाणपणाने, काळजीपूर्वक आणि एकजुटीने सरकार चालवणार यात शंका नाही. गेले १५ दिवस या ३ पक्षांत मुख्यमंत्री कोण, सभापती कोण, उप मुख्यमंत्री कोण, किती काळ, कोणाला किती मंत्रिपदे या वरून चर्चा कमी आणि चढाओढ जास्त असे चित्र दिसत होते. महा विकास आघाडी करताना या ३ पक्षातील प्रत्येक पक्ष स्वतः चा स्वार्थ सांभाळून उरलेले बाकी २ पक्षांना देत होता. किंबहुना त्यातूनच सुरू होणाऱ्या कुरबुरी हेच पुढील बेबनावाची सुरुवात झाली असती. पण आता ती संधी लगेच येणार नाही. कदाचित ५ वर्षे सुद्धा. अतिशयोक्ती असेल पण आजच महाविकासआघाडी अजून १५ वर्षे टिकेल असेच सध्या हे नेते बोलत आहेत.

एक मात्र नक्की, गेल्या १० महिन्यातील भाजपाच्या चुकीच्या पावलांनी पक्षाची महाराष्ट्रात होणारी पीछेहाट रोखण्यासाठी भाजपा नेतृत्वाला आणि कार्यकाऱ्यांना चांगली मशक्कत करावी लागणार आहे, हे नक्की.

-मंदार कुलकर्णी
२६ नोव्हेंबर २०१९

No comments:

Post a Comment