Followers

Sunday, February 24, 2019

रा-ज ज-रा ....

स्थळ: अभिनव चौक, नळ स्टॉप, पुणे
वेळ: संध्याकाळी 6 वाजता
दिवस: प्रचंड गर्दीचा
अभिनव चौकातील गर्दी आज तर अशक्यच होती. लॉ कॉलेज रॉड बालभारती पर्यंत भरलेला, कर्वे रोड पौड फाट्यापर्यंत भरलेला, सिग्नल चालू असूनही काही बसेस घुसल्याने ट्राफिक पूर्ण जॅम. कुठल्याच वाहनाला इंच भरही पुढे जाता येईना अशी परिस्थिती. चौकातले पोलीस ही हतबल कारण प्रत्येकाला घरी जायची घाई आणि आपले वाहन पुढे नेण्याची इच्छा. जवळच्या शाळाही सुटलेल्या त्यामुळे शाळेच्या व्हॅन आणि बसची क्षणाक्षणाला पडणारी भर.
इतक्यात लॉ कॉलेज रोडवर गर्दीमध्ये काही लोकांच्या लक्षात येते की शेजारच्या 2 गाड्यांमध्ये अनुक्रमे बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे आहेत. काळ्या काचेतून त्यांचा चेहरा दिसतोय का याची लोकांना उत्सुकता. काहींना चेहरा दिसला तर काहीजण "हो हो म्हणजे काय, पाहिलं ना", असं उगाच शेजारच्याला सांगत आहेत! बहुतेक अशा गर्दीची आणि न हलणाऱ्या वाहनांची सवय नसावी त्यांना. त्या गाडीचा चालक विनाकारण हॉर्न वाजवून "माझ्या बापाचा रस्ता आहे, सरका बाजूला" असा आविर्भाव दाखवत होता. जणू काय सर्वांच्या वरून उडुनच याला जायला मिळणार आहे.
इतक्यात दोघा तिघांच्या लक्षात आले की त्या गाडीच्या चालकांनी सीट बेल्ट लावलेला नाही. त्यांनी गर्दीतून चालत थोडे पुढे जाऊन चौकातील पोलिसाला ही गोष्ट सांगितली. जसे बाकीच्या जनतेला नियम लावून दंड वसुली करतात तशी या गाड्यांना करायची विनंती करतात. आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहत ती मंडळी उभी राहिली.
साधारण 15 मिनिटांनी त्या गाड्या अभिनव चौकात पोहोचल्या. चौकातील पोलिसांनी मोठ्या तत्परतेने ट्रॅफिक कंट्रोल करायचे सोडून गाडीपाशी जात त्यांना एकदम कडक सलाम ठोकला. पुढच्या काही सेकंदात दोन्ही गाड्या त्यांच्या वाटेने दिसेनाशा झाल्या...


- मंदार कुलकर्णी

Wednesday, February 20, 2019

शाह मोदींची हुकुमशाही

शाह मोदींची हुकुमशाही

- मंदार कुलकर्णी
19 फेब्रु 2019

कालच्या माझ्या युतीच्या लेखाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींच्या म्हणण्यानुसार मोदीनी फार लांबचा विचार करून हे केले, शिवसेनेचा काहीच फायदा झाला नाही वगैरे वगैरे.

मुळात 2009 आणि 2014 पेक्षा आज काय गोष्टी बदलल्या हे आधी नीट तपासायला हवे. 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपा ने लढवल्या 24 जागांपैकी 23 जिंकल्या. 2009 पेक्षा त्या 9 ने जास्त होत्या. शिवसेनेने 20 पैकी 18 जागा जिंकल्या म्हणजे प्रतिशत मध्ये भाजपापेक्षा जरा कमीच. शिवाय त्या 18 जागा जिंकण्यात ठाकरेपेक्षा मोदी करिश्माच होता हे कोणीही मान्य करेल. याचाच अर्थ भाजपा ने 2009 ते 2014 पक्ष संघटना महाराष्ट्रात वाढवली आणि मोदींनी त्यांच्या ताकदीवर आणि सभांमुळे कळस केला आणि महाराष्ट्र सर केला.

2014 च्या विधानसभा निवड  णुकीत शिवसेना 151 जागांसाठी अडून राहिली आणि भाजपा 144 प्रत्येकी असे वारंवार सांगत असूनही सेनेने त्यांचेच घोडे दामले, तडजोड झाली नाही आणि त्यामुळे युती तुटली. स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय भाजपाने घेतला. हा निर्णय एकनाथ खडसे आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आणि दिल्लीकरांनी त्याला मम म्हटले. हा निर्णय जितका महत्वाचा होता तितकाच धोकादायकही होता. आतापर्यंत भाजपाने महाराष्ट्रात कधीही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या नव्हत्या. कायम शिवसेनेला बरोबर घेऊन, मोठा भाऊ असे गोंजारून आणि त्याहीपेक्षा बाळासाहेबांच्या आणि प्रमोद महाजन यांच्या काळात कायम पडती बाजू घेऊन भाजपा पुढे जात राहिली. याचे महत्वाचे कारण संघटना म्हणून संघ गावागावात पोहोचला असला तरी भाजपा संघटना म्हणून तोवर तेथे पोहोचली नव्हती. भाजपाने कायम उत्तर भारत हा आपला मुख्य इलाखा मानून तेथेच जास्त लक्ष केंद्रित केले होते. 2014 मध्ये काही प्रमाणात भाजपा जुगारच खेळला होता. मोदींच्या करिष्म्यावर लोकसभेत 48 पैकी 42 जागा जिंकता येत असतील तर विधानसभेमध्ये प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? पण हा एवढाच विचार नसावा. आपली पक्ष संघटना कुठवर पोहोचली याची परीक्षा घेण्याची या पेक्षा चांगली संधी आणि वातावरण भाजपाला या पूर्वी कधी मिळाली नव्हते. हा सगळा विचार करून कोणाचेही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव पुढे न करता किंवा घोषित करता भाजपा निवडणुकांना सामोरा गेला आणि 260 पैकी 122 जागा जिंकल्या. शिवसेनेनें 282 पैकी फक्त 63 जागा जिंकल्या. भाजपा ला 14.7 लाख मते (31%) तर सेनेला 10.2 लाख मते (19%) मिळाली. याचा अर्थ सेनेपेक्षा जवळ जवळ 4.5 लाख जास्त मते मिळाली. याचे मुख्य कारण भाजपा चा तोवर महाराष्ट्रात झालेला प्रसार हेच आहे. जेव्हा भाजपा सेनेत निवड करायची वेळ आली तेव्हा मोठ्या संख्येने भाजपा च्या पारड्यात लोकांनी मते दिली आणि सेनेला भाजपा पेक्षा निम्या जागा दिल्या. 2009 च्या विधानसभेतही भाजपा ला सेनेपेक्षा जास्त जागा होत्या. 2009 च्या 46 जागांवरून 122 ही हनुमान उडी भाजपा मारली ती फक्त मोदी करिष्म्यावर नव्हे. 2009 आणि 2014 मध्ये दोन्ही निवडणुकात जास्त जागा भाजपा ने जिंकल्यावर कोण मोठा आणि कोण छोटा हे चर्चा करायची गरज नाही.

गेल्या 4.5 वर्षातील फडणवीस यांचा कारभार आणि त्याच काळात सेनेने केलेले वेडे चाळे आणि आक्रस्ताळेपणा आपण पाहिला. खिशात राजीनामे घेऊन फिरणारे आमदार मंत्रिमंडळ बैठकीत मात्र माना डोलवायचे. गेली 25 वर्षे सेनेनी केलेली हेटाई, अपमान भाजपा विसरणे शक्यच नव्हते. त्यामुळे साहजिकच त्याची भरपाई 2014 नंतर निघणार हे सांगायला भविष्यवेत्याची गरज नाही.

मूळ मुद्दा हा आहे की शिवसेना स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेत असताना त्यांना त्यापासून परावृत्त करायची गरज काय? संघटना म्हणून सेना लोकांच्या मनातून उतरलेली त्याला संजीवन मंत्र घालून म्हणजेच युती करून परत जिवंत का केले?

दिल्लीतील राजकारण आणि राज्यातील राजकारण या गोष्टी वेगळ्या असताना हाय कमांड असे निर्णय कसे घेऊ शकते? आज जर युती केली नसती तरी भाजपा ला गेल्या वेळपेक्षा पुष्कळ जास्त जागा स्वबळावर मिळू शकत होत्या. आता जागावाटपात भाजपा मध्ये बंडखोरी झाली (जी होणारच आहे) ती कोण निस्तरणार? एक साधे उदाहरण घेऊ.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 8 जागा भाजपा ने सेना आणि दोन्ही काँग्रेस ला हरवून जिंकल्या होत्या. नव्या फॉरमूल्याप्रमाणे 8 पैकी 4 जागा सेनेला जाणार. मग 8 विद्यमान आमदार मंडळींपैकी कोण आपल्या जागेची तिलांजली देणार? गिरीश बापट का मेधा कुलकर्णी का माधुरी मिसळ? दिल्लीतून फतवा काढणे वेगळे आणि प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी वेगळी आहे.

अजून एक उदाहरण घेऊ. लोकसभेसाठी 23 विद्यमान खासदार परत उभे राहण्यासाठी निश्चित उत्सुक असणार, म्हणजे नवीन उमेदवारांसाठी राहिल्या मात्र 2 जागा. का बंडखोरी होणार नाही? यात झाले तर फक्त भाजपाचेच नुकसान होणार आहे. आणि दुर्दैवाने भाजपा ला विधानसभा निवडणुकीत सेनेपेक्षा 1 जरी जागा कमी मिळाली तर भाजपाची इतकी वाईट अवस्था सेना करेल याचा विचार न केलेलाच बरा.

अफजलखान आणि चौकीदार चोर है असे हिणवणाऱ्या ठाकरे ना माफ करणे हाच भाजपाचा राजनैतिक पराभव आहे. स्थानिक राजकारणाचा अभ्यास न करता केवळ लाखो कार्यकर्त्यांची इच्छा अशी वाक्ये फेकून या विषयाची बोळवण करणे हाच शुद्ध वेडेपणा आहे. फार लांबच्या भविष्याचा विचार करताना आज काय वाढून ठेवले आहे हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जीवावर ही मंडळी आज उड्या मारत आहेत त्यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने दिल्लीतून निर्णय लादायची सवय जर मोदी शाह यांनी नाही बदलली तर दिवस फिरायला वेळ लागणार नाही. नंतर मतदारांना दोष देण्यापेक्षा हिमालयात जाऊन दोघांना आत्म चिंतन करायची वेळ येईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

*शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे: हा लेख एका मोदीभक्ताने आणि संपूर्ण भाजपा समर्थक असलेल्या सोशल मीडियावरील कार्यकर्त्याने लिहिला आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.

भाजपा शिवसेना जागावाटप

भाजपा शिवसेना जागावाटप

अखेर हो नाही, हो नाही करत शेवटी युती करायचं ठरलं तर. ज्या पक्षाने इतके वर्ष दुसऱ्या पक्षाची उणी दुणी काढली, ज्या पक्षांनी एकमेकांना कायम पाण्यात पाहिले, ज्या पक्षाने एकमेकांना शिव्या देण्याची एकही संधी सोडली नाही, ते परत नांदायला तयार झाले.
उद्धव ठाकरे यांची काही वाक्ये पहा -
1. 25 वर्षे आमची युती मध्ये सडली
2. आम्ही एकटे विधानसभेवर भगवा फडकवणार
3. चौकीदार चोर है
4. हमको पटकने वाला पैदा नही हुवा
5. आता कधीच युती नाही
6. नाणार प्रकल्प रद्द व्हायलाच पाहिजे.
आणि अनेक....

युती करण्यापूर्वी भाजपा ने सामना मधील गेल्या 5 वर्षांचे अग्रलेख वाचायला हवे होते. गेल्या 5 वर्षात केलेले अपमान, हेटाई थोड्या आठवायला हव्या होत्या.

गेल्या लोकसभेत भाजपा ने 23 जागा म्हणजे शिवसेनेपेक्षा 5 जागा जास्त जिंकल्या. मोदी करिष्मा या एकमेव कारणाने शिवसेनेला इतक्या जागा जिंकता आल्या होती. हे न पाहता आता 48 पैकी फक्त 25 जागा लढवणे हा भाजपाचा नैतिक पराभवच आहे. विधानसभा निवडणुकीत 122 जागा म्हणजे शिवसेनेच्या पेक्षा दुप्पट जागा जिंकून आता 50% जागा घेणे हे शिवसेनेपुढे साक्षात लोटांगण घातले आहे.

शिवसेना पक्ष हा काळाबरोबर रसातळाला जात असताना त्याला नव संजीवनी देण्याचे काम या युतीने केले आहे. केवळ 3 विधानसभा निवडणुकीमुळे घाबरून जाऊन भाजपने स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. मोदींच्या करिष्म्याने जर शिवसेनेच्या विधानसभेत जास्त जागा आल्या तर उपमुख्यमंत्रीपद ही फडनवीसांना मिळणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. मोदीनी लोकसभेचा विचार करून हा निर्णय महाराष्ट्र भाजपावर लादला आहे हे स्पष्ट दिसत आहे, त्याची फळे त्यांना भोगावी लागतीलच.

पुन्हा एकदा मोठया भावाचा झालेला राजनैतिक पराभव असेच या निर्णयाचे वर्णन होऊ शकेल...

- मंदार कुलकर्णी

Tuesday, February 12, 2019

व्हॅलेंटाईनचं वारं...

व्हॅलेंटाईनचं वारं

VIDEO : व्हॅलेंटाईनचं वारं, मेट्रो स्टेशनच्या लिफ्टमध्ये अश्लील चाळे-https://lokmat.news18.com/video/kissing-boy-and-girl-captured-in-cctv-footage-of-hydrabad-metro-station-lift-340018.html?fbclid=IwAR3i8kAxYnkSUTxZOoEbR50GwmFSpuDoEK2ZJD9_dNLPjGkCqzah4cgzS0c

हा व्हिडीओ पाहिला आणि अक्षरशः अंगावर काटा आला. सोळावे वरीस धोक्याचं पासून अनेक गाणी चित्रपटात आली आहेत पण कुठे काय करायचे आणि कुठे काय टाळायचं किंवा कुठे संयम ठेवायचा हे आजच्या तरुण पिढीला कोणी शिकवलेले दिसत नाही.

तरुण वय आहे, विरुद्ध सेक्स असलेल्या व्यक्तीबद्दल आकर्षण आहे, अगदी एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती खूपच आवडत असली तरी सार्वजनिक ठिकाणी हे चाळे? मेट्रोच्या लिफ्टमध्ये cctv कॅमेरा असतात याचेही भान या जोडप्याला असू नये? प्रेमाची भूक किंवा तहान या थराला गेली आहे की जमेल तिथे आणि जमेल तेव्हा फक्त सेक्स याचाच विचार करणारी ही पिढी तयार होत आहे काय?

अनेक वर्षांपूर्वी मी पु लं चे पूर्वरंग आणि अपूर्वाई ही पुस्तके वाचली होती. त्या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की परदेशात त्या काळी (60 चे दशक) ही प्रेमाची भूक किंवा प्रेमाचा वखवखलेपणा इतका दिसतो आहे की बास. प्रत्येक tv वरील जाहिरातीचा शेवट हा "आणि ते दोघे एकत्र नांदू लागले, तद्वत" एकमेकांच्या गळ्यात पडले, त्यांनी एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या किंवा त्यांनी एकमेकांना xxx असाच असतो. रस्त्यावरही यापेक्षा फारसे वेगळे दृश्य दिसत नसते. एक मुलगा आणि एक मुलगी हे आपले आजूबाजूचे सारे सत्य आणि विश्व विसरून रस्त्यावर किंवा बागेत ज्या प्रकारच्या प्रणय क्रीडा करतात हे पाहून खरंतर डोळे मिटूनच घ्यायला हवेत...

काही दशकात ही सारी परिस्थिती भारतात इतक्या वेगाने येईल असे वाटले नव्हते. पूर्वीचे संस्कार, संयम, सातच्या आत घरात या गोष्टी जशा कालबाह्य झाल्या आहेत तसेच आता लिव्ह इन रिलेशनशिप मुळे तर बाहेरख्यालीपणा करायचं सुप्रीम कोर्टाकडून उघड उघड परमिट मिळाल्या सारखी परिस्थिती आहे.

आजची कॉलेज मधली पिढी अभ्यास सोडून हेच धंदे करते का? आपले करियर आपले priority त्यांना कळत नाहीत का? व्हॅलेंटाईनचं वारे वाहत असताना साधं, सरळ प्रेम व्यक्त करताच येऊ शकत नाही का? मुळात व्हॅलेंटाईन डे मुळे वाढलेला धंदा याचा विचार करताना किती मुले यामुळे आयुष्यातून उठू शकतात याचा कोणीच का विचार करत नाही? असला धाक तर फ़क्त पोलिसांचा पण मग पोलीस कुठे कुठे पोहोचणार? पालक म्हणून आपली काही जबाबदारी नाही का? का आता या गोष्टी आपण गृहीत धरल्या आहेत?
- मंदार कुलकर्णी

Sunday, February 3, 2019

गांधीहत्या का झाली?

गांधीहत्या का झाली?
- © मंदार कुलकर्णी
3 फेब्रुवारी 2019

टीप: हा लेख मी माझ्या अनेक वर्षांच्या वाचनातून आणि अनेक संदर्भ घेऊन लिहिला आहे. ज्यांना वाचून झाल्यावर मते पटली नाहीत तर त्याचा राग माझ्यावर काढू नये. लोकशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्याबरोबर विचार स्वातंत्र्यही आहे. पटले नाही तर सोडून द्या, आवडले तर अवश्य चर्चा करा आणि आणि बाकीच्यांच्या ज्ञानात भर घाला....

दरवर्षी 30 जानेवारी जवळ की गांधी हत्या, नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मनसोक्त शिव्या घालणे हे ठरलेले विषय पेपर मध्ये, सोशल मीडिया वर यथेच्छ चघळले जातात आणि दुसऱ्या दिवशी सारी मंडळी हा विषय विसरून आपापल्या कामात व्यग्र होतात. मुळात लोकांना आणि विशेषतः काँग्रेस च्या नेत्यांना त्या दिवशी आपला मुद्दा रेटून नेणे एवढेच करायचे असते. काय योग्य, काय अयोग्य त्याहीपेक्षा मी कसा गांधीवादी आहे हे सिद्ध करायचे असते.

मुळात गांधी हत्या करणारा कोणी अतिरेकी किंवा माथेफिरू नव्हता, त्याचे पूर्वज अतिरेकी नव्हते, त्याचे पूर्वज काश्मिरी विस्थापित नव्हते, सरकारने त्याच्यावर कर्ज माफी न देऊन अन्याय केला नव्हता मग का बरे त्यांना असे पाऊल उचलावे लागले असेल?

1920 साली लोकमान्य टिळक यांचे निधन झाले आणि खऱ्या अर्थाने एक मोठ्या देशव्यापी नेत्याची पोकळी निर्माण झाली होती. हीच संधी महात्मा गांधी यांनी साधली आणि नेहरू आणि अनेक त्याच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून टिळकांच्या बरोबर उलटी चळवळ त्यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांना आपण 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणतो मग त्यांची चळवळ शांतीच्या मार्गाने पुढे नेणारे गांधीजी कसे हे गणित काही केल्या पटत नाही. त्यात गांधींनी दोन्ही महायुद्धात इंग्रजांना भारतीय लोक सैनिक पाठवून भरघोस मदत केली. भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी अगदी सहज थांबवता येणे शक्य असताना ही गांधींनी त्यांना फाशी जाऊ दिले. इंग्रजांची अस्सल कागदपत्रे हे सांगतात.

चापेकर बंधू, मदललाल धिंग्रा, वासुदेव बळवंत फडके, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव अशा असंख्य क्रांतिकारकांच्या कार्याची दखल गांधींनी घेतलेले दिसत नाही. मधल्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सारखे अनेक मोठे नेते त्यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे वेगळी वाट धरून पुढे गेले. सावरकर आणि अनेक अंदमानात खितपत पडत असलेल्या भारतीय क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यावरही इंग्रजांना प्रेमाने चुचकरण्यात हेच पुढे होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची 55000 ची फौज घेऊन सिंगापूर हून भारताकडे येत असताना गांधीजी यांनी त्यांना काय मदत केली? एकेकाळी अखंड स्वतंत्र भारताच्या गोष्टी बोलणारे गांधीजी जिनांबरोबर पाकिस्तान वेगळा करायला तयार झाले तेव्हा त्यांनी किती भारतीयांशी चर्चा केली?

फाळणीच्या सुमारास ज्या विक्षिप्त पध्दतीने गांधी वागत होते, अत्याचाराच्या खुणा घेऊन परागंदा लोकांना ज्या हीन पद्धतीने वागणूक मिळत होती त्यावर कडी म्हणून ५५ कोटींचा आहेर देण्यासाठी उपोषणाला बसणारे गांधी सर्व देशाच्या मनातून पार उतरत होते. त्याचवेळी जर गोडसे थांबले असते ते हे महात्मा जोखड जनतेनेच फेकून दिले असते.

स्वातंत्र्य मिळाल्यावर झालेल्या जातीय दंगली थांबवण्यात गांधीजीना सपशेल अपयश आले. हजारो शीख लोकांचे झालेले शिरकाण, त्यांचे जबरदस्तीने केले धर्मांतर या गोष्टी गांधीजीनी का थांबवल्या नाहीत? त्या काळात त्याची सारी वक्तव्ये ही वरवर हिंदू मुस्लिम शांतता करायला लावणारी असली तरी ती केवळ पाकिस्तान आणि त्यातही दोन्हीकडील मुस्लिम जनतेच्या बाजूची होती.

जानेवारी 1948 मध्ये उपोषणाला बसताना त्यांनी घातलेल्या सात अटी हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे. 7 व्या अटी वरून तर असे वाटते की महात्मा म्हणवुन घेण्यासाठी गांधी हे हिंदूंचे वाटेल तेवढं नुकसान करून घ्यायला तयार होते अश्या माणसाला महात्मा का म्हणावं हे कळत नाही.

लाहोर, गुजरानवाला, इस्लामाबाद पासून रावळपिंडी पर्यंतचा भाग शीख बहुल असताना पाकिस्तानला कोणत्या अधिकारात देण्यात आला? जर ही सीमारेषा इंग्रजांनी आखली असेल तर गांधीजीनी काहीच विरोध का नाही केला? लाहोर ते अमृतसर अंतर केवळ 58 किमी आहे. ही दोन गावे दोन देशात वर्ग होत असताना आपल्या शीख बांधवांना काय दुःख झाले याची कल्पना आपण करू शकतो. फाळणीनंतर जातीने पाकिस्तान सीमेवर थांबायचे सोडून गांधीजी कलकत्ता येथे जाऊन मौन घेऊन बसले. फाळणीनंतर पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या हिंदू आणि शीख बांधवांची योग्य सोय पहायची सोडून भारतातील मुस्लिमांचे लाड करण्यात त्यांनी धन्यता मानली.

गांधीजी हे कायम 'हम करे सो कायदा' या पद्धतीने शेवट पर्यंत वागत राहिले. आपल्या मनासारखे झाले नाही की कर उपोषण. अगदी स्पष्ट सांगायचं तर स्वातंत्र्यानंतर गांधीजी सरकार बाहेरील एक स्वतंत्र सत्ता केंद्र निर्माण झाले होते. स्वतंत्र भारताला नवीन पंतप्रधान, गृह मंत्री, परराष्ट्र मंत्री असताना गांधीजी उठसूट कधीही उपोषणाला बसत आणि आपल्याला हवे तेच साध्य करीत. 

अशा गांधीजींनी पुढील काळात आपली प्रजासत्ताक पद्धती खुंटीला टांगून स्वतःची अशी वेगळ्या प्रकारची हुकूमशाही चालवली असती तर? लोकशाही मध्ये सर्वांचे म्हणणे ऐकून बहुमताने निर्णय घ्यायचे असताना स्वतःच्या मर्जीतले नेहरू त्यांनी पंतप्रधानपदी सरदार पटेल यांना डावलून बसवलेच ना? अशा पद्धतीने गांधीजींनी उपोषणाच्या जोरावर पुढील काळात अनेक देशविरोधी निर्णय देशावर लादले असते तर देशाची काय अवस्था झाली असती? सावरकरांपासून आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक त्यांचे समर्थक नव्हते. त्यांना खड्यासारखे बाजूला करून आपल्या मर्जीतली माणसे पुढे नेण्याचे काम त्यांनी केले. अशीच जर त्यांची हुकूमशाही या पुढे चालू राहिली असती तर या भारत देशाची पुन्हा हजार शकले व्ह्यायला वेळ लागला नसता.

आज सरदार पटेल यांनी एकहाती सर्व संस्थानिकांशी बोलून ही सारी संस्थाने भारतात विलीन केली ती काय गांधी नेहरू यांच्या हातचे काम होते? हैदराबाद संस्थानाचा पाडाव हा काय गांधीजींच्या उपोषणाने झाला असता? पुढे झालेली पाकिस्तान विरुद्धची युद्धे काय दुसरा गाल पुढे करून जिंकता आली असती?

गांधीजींनी केलेलीे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी केलेली उपोषणे हा वादाचा विषय असताना ते स्वातंत्र्यानंतर तशाच पद्धतीने चालू ठेवणे हे देशविरोधी होते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता गांधीहत्या आज ना उद्या होणारच होती. नथुराम गोडसे यांनी पहिला नंबर लावला इतकेच. या संदर्भात गोपाळ गोडसे यांचे 'गांधीहत्या आणि मी' हे पुस्तक त्रयस्थ भावनेतून अवश्य वाचावे.