Followers

Thursday, October 31, 2019

खरी काँग्रेस, खोटी काँग्रेस



महाराष्ट्र टाईम्स मध्ये "५०  वर्षांपूर्वी" नावाचे एक सदर गेले अनेक वर्षे सुरू आहे. ५० वर्षांपूर्वीच्या त्याच तारखेच्या म टा मध्ये आलेल्या २-३ महत्वाच्या बातम्या येथे छापतात. सध्या १९६९ मधील त्या काळच्या काँग्रेस श्रेष्ठी आणि इंदिरा गांधी यांच्यातील सत्ता संघर्ष याच्या बातम्या येत आहेत. त्या वर्षी राष्ट्रपती उमेदवारी पासून अनेक बाबतीत सत्ताकेंद्र काँग्रेसच्या मुख्य आणि जुन्या जाणत्या लोकांकडून इंदिरा गांधी यांच्या कडे 'साम दाम दंड भेद' या पद्धतीने कसे हलले, हे वाचणे कमालीचे इंटरेस्टिंग आहे. १९५२ ते १९६९ च्या काँग्रेसचे चिन्ह बैल जोडी होते. आहे ती काँग्रेस फोडून "इंदिरा काँग्रेस" बनवून आधीची काँग्रेस याच बाईने संपवली. आणि आपली नवीन काँग्रेस (आय) ही पार्टी बनवली, हा इतिहास आहे.



राहूल, सोनिया यांच्या बरोबर आपण सर्वांनी हा इतिहास वाचायला हवा.

सारांश: १८८५ साली ह्युम यांनी स्थापन केलेली काँग्रेस १९६९ मध्येच संपली आणि आताची काँग्रेस ही केवळ ५० वर्षांपूर्वीची 'इंदिरा काँग्रेस' आहे. तेव्हा त्यांनी "देश की सबसे पुरानी पार्टी" म्हणून गमजा मारू नयेत.

**

मंदार कुलकर्णी
१ नोव्हेंबर २०१९

Thursday, October 24, 2019

देवेन्द्र जी, आतातरी सुधारा...


मी गेले 6 वर्षे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यासक आहे. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून आपण ज्या पद्धतीने सरकार सांभाळले आणि काम केले त्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आजही आपण जे यश मिळाले त्याला आपणच जबाबदार आहात. पण काही मुद्दे आपणास निदर्शनास आणून द्यायलाच हवेत म्हणून हा लेख प्रपंच.



पुढील निर्णय हे चुकीचेच होते...

१. शिवसेनेला धाकटा भाऊ म्हणून सिद्ध करताना इतर पक्षातील लोक विनाकारण भाजपावासी करून घेणे
२. तिकीट वाटप करताना स्थानिक भाजपा नेत्यांना विश्वासात न घेणे
३. पक्ष वाढवताना कोणत्याही प्रकारची तडजोड करणे
४. लोकसभेच्या निवडणुकीआधी मातोश्री ची अमित शाह यांना पायधूळ झाडून 50-50 चा अतर्क्य फॉर्म्युला मान्य करणे आणि चुकीच्या जागा मान्य करणे
५. भाजपा ला 240 पर्यंत जागा मिळतील असा खोटा आत्मविश्वास धरणे आणि वेगवेगळ्या सभात सांगणे
६. चंद्रकांत पाटील यांच्यावर अती विश्वास ठेवून नको असलेली माणसे भाजपा मध्ये घेणे
७. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला अत्यंत कमी लेखणे
८. राणे आणि मंडळींना कोणत्याही लॉजिक शिवाय भाजपा मध्ये घेणे
९. बंडखोरी कमी व्हावी म्हणून अगदी शेवटच्या क्षणी जागा जाहीर करणे आणि त्याही दिल्ली वरून यादी आणून
१०. एकनाथ खडसे आणि त्यांच्या सारख्या असंख्य जेष्ठ नेत्यांना अडगळीत टाकून त्यांचे करियर संपवणे.

तुमच्या हेही लक्षात आलं असेल की तुमच्याच काही भाषणामुळे आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे 100 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना आता 50-  50 % आणि मुख्यमंत्री पद याला अडून बसली आहे. मग तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद मान्य करणार का? 2.5 वर्षांनी तुम्ही दिल्लीला निघून जाल मग काय महाराष्ट्र आदित्य आणि उद्धव वर सोडून जाणार आहात काय?

प्लॅन बी म्हणून तुम्ही चंद्रकांत पाटील यांना कोथरूडची सेफ जागा दिली पण खरंच जेव्हा तुमची महाराष्ट्र राज्याच्या गरज आहे आणि तुम्ही चांगलं काम करायची आवश्यकता आहे, तेव्हा परत तुम्ही अस्थिरता निर्माण करणार आहात?
गेली 5 वर्षे तुम्हाला नीट कारभार करता आला नाही हे माहीत आहे, पण आता ती संधी आहे, ती तुम्ही चांगली साधाल अशी मला आशा आहे.

अजून एक मुद्दा. स्थानिक राजकारणाचा अभ्यास न करता केवळ "लाखो कार्यकर्त्यांची इच्छा" अशी वाक्ये फेकून या विषयाची बोळवण करणे हाच शुद्ध वेडेपणा आहे. फार लांबच्या भविष्याचा विचार करताना आज काय वाढून ठेवले आहे हे पाहणे जास्त महत्वाचे आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जीवावर ही मंडळी आज उड्या मारत आहेत त्यांना विश्वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने दिल्लीतून निर्णय लादायची सवय जर मोदी शाह यांनी नाही बदलली तर दिवस फिरायला वेळ लागणार नाही. नंतर मतदारांना दोष देण्यापेक्षा हिमालयात जाऊन दोघांना आत्म चिंतन करायची वेळ येईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

हे जर बदलले नाही तर आजच सांगतो, 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपा येणार नाही.

टीप: माझे सगळे अंदाज मी आधी माझ्या ब्लॉग वर आणि सोशल मीडियावर लिहिलेले असतात आणि आतापर्यंत ते कधीच चुकलेले नाहीत. 

- मंदार कुलकर्णी
24 ऑक्टोबर 2019

Monday, October 21, 2019

सौरभदा


आमचा सौरभदा अर्थात प्रिन्स ऑफ कोलकाता अचानक चर्चेत आला तो BCCI चा होणारा अध्यक्ष म्हणून आणि मला परत एकदा इतिहासात जायला भाग पाडले.

मुळात भारतीय क्रिकेट म्हटले की आमची पिढी सुनील गावस्कर, कपिल देव आणि सचिन तेंडुलकर याच्या पुढे जात नाही. धोनी, कोहली यांना आम्ही आता तरुण पिढीचे धरतो! मरगळलेल्या भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचे काम कोणी केले असेल तर ते सौरभने. 1995 पर्यंत भारतीय क्रिकेटवीर कसोटी क्रिकेट खेळायचे ते सामना अनिर्णित राखण्यासाठी ना की जिंकण्यासाठी. पतोडीच्या पर्यंत भारतीय संघातील खेळाडू गुलामगीरीच्या ओझ्याखाली एवढे दबलेले असायचे की गोरा खेळाडू खेळायला आला की सवयीने सर सर करायचे.वाडेकरने ही सवय बदलली आणि सौरभ ने "अरे ला कारे" म्हणायला शिकवले.


1983 च्या वल्ड कप ही अनेक खेळाडू अमेरिकेला सहलीला निघाले होते त्यात लंडन चा एक स्टॉप होता हे स्वतः श्रीकांतने एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितले होते. त्यानंतर त्यांनी वल्ड जिंकला हा भाग वेगळा पण मुळात भारतीय खेळाडू कायम बॅकफूट वर असायचे. आधी वेस्ट इंडिज आणि नंतर ऑस्ट्रेलिया संघाने क्रिकेट वर अधिराज्य गाजवले ते 20 वे शतक संपेपर्यंत. भारतीय क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने विजयाची सवय लावली ती सौरभच्या संघाने. मुळूमुळू खेळत सामना हरण्यापेक्षा लढून किंबहुना बंडखोरी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही हेच दादाने शिकवले.

याची सुरुवात 1992 साली सौरभ पहिल्यांदा भारतीय कसोटी संघात आला तेव्हा झाली. ड्रेसिंग रूम मधून ग्राऊंडवरच्या खेळाडूंसाठी पाणी नेण्याचे काम त्याला जेव्हा लादण्यात आले तेव्हा सौरभने "मी इथे क्रिकेट खेळायला आलो आहे, पाणक्या म्हणून नाही." त्यानंतर त्याला तातडीने भारतीय संघातून डच्चू देण्यात आला. पण हळू हळू त्याने पुन्हा संघात स्थान मिळवले. सौरभ ने भारतीय संघाला देशात आणि परदेशात जिंकायची सवय लावली.

2000 च्या आसपास भारतीय संघ match fixing मध्ये अडकला असताना संघाची फारच वाताहत झाली होती. सचिनने कप्तान पद सोडले आणि या परिस्थितीत सर्व जबाबदारी सौरभवर येऊन पडली. आहे त्या परिस्थितीला सामोरे जात त्याने चांगली संघ बांधणी केली आणि म्हणता म्हणता 2003 च्या वल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघ पोहोचला. सौरभ आणि भारतीय संघाचे दुर्दैव की भारताला पराभव पत्करावा लागला. 1983 नंतर खऱ्या अर्थाने बनलेला चांगला संघ थोडक्यात हरला आणि आपला जीव हळहळला.

सचिन, राहुल, लक्ष्मण आणि सेहेवाग या सर्व खेळाडूंची कारकीर्द घडली ते सौरभ च्या काळातच. पण मला सौरभचा अभिमान वाटतो तो त्याने लोर्ड्स वर सामना जिंकल्यावर टीशर्ट काढून साजरा केला तो जल्लोष. त्याच्यावर यथेच्च टीकाही तेव्हा झाली पण हेच टीकाकार लोक जेव्हा हे कृत्य फ्लीनटोफ ने मुंबईत वानखेडे मैदानावर केले तेव्हा मूग गिळून बसले होते. मी जेव्हा लोर्ड्स पाहायला गेलो होतो तेव्हा 'त्या' गॅलरीत जाऊन ही घटना आठवणीत ठेवून आमच्या गाईडला विचारली होती. तेव्हा तो जरा नाराज झाला होता पण इंग्रजांच्या भूमीत, इंग्रजांच्या पंढरीत असा बदला घ्यावा तो सौरभनेच. त्यानंतर आजपर्यंत असले कृत्य कोणाही परदेशी खेळाडूने करायचे धारिष्ट्य दाखवले नाही हे लक्षात घ्यावे. ही लिंक पहा... https://youtu.be/H1lcvaf23h8
चॅपल ने दादागिरी करून संघात फूट पाडली नसती तर सौरभला आणखीन यश मिळाले असते.

आज आपण धोनीला सर्वात यशस्वी कप्तान म्हणतो पण त्याच्या यशस्वीतेची बीजे ही सौरभच्या कारकिर्दीत सापडतात. सौरभने ऑफ साईडला मारलेले खणखणीत फटके पहाणे म्हणजे केवळ सुख. त्याच्याच जोरावर 1 डे मध्ये 10000 धावांचा पल्ला त्याने ओलांडला.

आज सौरभ ची निवड BCCI च्या अध्यक्षपदासाठी झाली आणि खूपच भारी वाटले. पण तो जेमतेम 10 महीने म्हणजे साधारण 1 वर्षच आहे . त्यामुळे त्याने घेतलेले निर्णय अमलात येतील का नाही हे माहीत नाही. 47 व्या सुरू केलेली ही नवीन batting तो चांगलीच करेल याची खात्री आहे, त्याला या लेखातून आपण शुभेच्छा देऊया..




- मंदार कुलकर्णी
20 ऑक्टोबर 2019

मतदान

मतदान करायला जाताना असणारे गैरसमज दूर करण्यासाठी वाचा:

१. मतदान केंद्रात मोबाईल चालतो, कोणी पाहत नाही. फक्त बंद ठेवा. आणि आत फोटो किंवा शूटिंग करू नका
२. मतदान स्लिप ची अजिबात गरज नाही. तुमचा नंबर लक्षात ठेवा किंवा हातावर लिहून ठेवा.
३. मतदान झाल्यावर बाहेर आल्यावर सेल्फी काढा आणि सगळ्यांना पाठवा
४. मतदान केंद्रावर चहा, नाष्टा, वडा पाव या सोयी नाहीत. मतदान झाल्यावर बाहेर जाऊन अवश्य आपल्या आपण आनंद घ्या
५. कुठलेही फोटो असलेले ओळखपत्र चालते - ११ पैकी

६. या वर्षी पाऊस आहे, हे नवे कारण पुढे करू नका. गेले ५ महिने पाऊस असताना सर्व कामे करत होताच ना...
तेव्हा अवश्य मतदान करा. आणि ही पोस्ट भरपूर शेअर करा...

मंदार कुलकर्णी
२१ ऑक्टोबर २०१९

कोणाला किती जागा?


आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान सुरू आहे आणि 24 तारखेला कोणता पक्ष बहुमत मिळवणार, युती का आघाडी आणि कोण मुख्यमंत्री ह्याची उत्तरे मिळतील. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता युतीला पूर्ण बहुमत मिळेल हे नक्की असले तरी कोणाला किती जागा हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची त्यांनी युती करताना भाजपा च्या लढवायच्या जागा जास्त पदरात पाडून पक्की केली असली तरी युतीला नक्की किती जागा हे अंदाज बांधणे सोपे नाही. स्वतः फडणवीस निवडणूक प्रचार करताना 220 ते 240 जागा मिळतील असा अंदाज मांडला आहे. बरेचसे पत्रकार अगदी भाऊ तोरसेकर यांनी ही 240 च्या पुढेच युतीला नेऊन ठेवले आहे.

अमित शाह आणि भाजपा ची सारी यंत्रणा अगदी बूथ लेव्हल पर्यंत काम करून त्यांचे अंदाज बांधतात. मुळात बहुतेक जणांनी लोकसभेत मिळालेल्या जागा आणि मतांची टक्केवारी याचा अभ्यास करून वरील अंदाज बांधले आहेत. पण अशा पद्धतीने मांडलेले अंदाज हे स्थानिक परिस्थिती आणि बदलणारी गणिते यांनी पूर्ण चुकीचे ठरू शकतात. उदा द्यायचे तर एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघ असे असले तरी तेथील लोकसभेची जागा जिंकली म्हणजे सर्व 6 विधानसभेच्या जागा जिंकल्या असा अर्थ होत नाही. लोकसभेत साधारण 10 ते 12 लाख मतदान होते तर विधानसभेच्या एका जागेसाठी अंदाजे 2 लाख मतदान होते. त्यातही जितके जास्त पक्ष किंवा उमेदवार जास्त तेवढी मतविभागणी जास्त होणार. याचा फायदा जसा काही पक्षांना मिळतो तसा तोटाही होऊ शकतो. या शिवाय काही मतदारसंघात होणारी बंडखोरी सुद्धा चित्र बदलू शकते. या वेळी पितृ पंधरवडा याचे कारण पुढे करत बहुतेक पक्षांनी बंडखोरी रोखण्यासाठी अगदी शेवटी शेवटी उमेदवार जाहीर केले पण तरीही बंडखोरी व्हायची ती झालीच.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती किंवा आघाडी नव्हती आणि म्हणूनच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या मतांमध्ये बऱ्याच ठिकाणी अगदी कमी अंतर होते. या वेळेला होणारे कमी मतदान हे सुद्धा निवडणुकीचे निकाल काही प्रमाणात फिरवू शकतात.
एकंदर परिस्थिती पाहता युती करून भाजपच्या स्वतःच्या जागा गेल्यावेळपेक्षा कमी होणार असे दिसते आहे. 100 ते 110 जागा मिळाल्या तरी उत्तम. शिवसेनेला मात्र या वेळेस चांगली संधी आहे. अमित शाह यांना मातोश्रीवर आणून लोकसभेच्या जवळजवळ निम्म्या आणि विधानसभेच्या तशाच जागा ठरवून त्यांनी चांगलीच बाजी मारली आहे. शेवटी 114 जागांवर समाधान मानावे लागले असले तरी गेल्या वेळच्या 63 जिंकलेल्या जागांपेक्षा खूप जास्त आहेत. शिवाय प्रथमतः आदित्य ठाकरे हा पहिला ठाकरे कुलोत्पन्न निवडणूक लढवत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. शिवाय कोकणात आणि काही ठिकाणी युती मोडून त्यांनी त्यांचे स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. याचा नक्कीच फायदा शिवसेनेला मिळेल. भाजपा पेक्षा जास्त नाही पण कमीतकमी 80 ते 90 च्या घरात त्यांच्या जागा जाऊ शकतात.
आता राहिला प्रश्न आघाडीचा. संपत चाललेल्या पक्षांकडून फार अपेक्षा नाही पण आघाडी केल्यामुळे 40 ते 50 जागा मिळू शकतात. अर्थात त्याला कमी झालेले मतदान, स्थानिक प्रश्न आणि मोदी यांनी घेतलेल्या अत्यंत कमी सभा अशी बरीच कारणे आहेत.
मनसे हा एक फारच अंदाज चुकवणारा आणि धोकादायक पक्ष आहे. "विधानसभेत आम्हाला चांगला विरोधी पक्ष करा" असे भावनिक आवाहन करत त्यांनी बरीच बाजी मारली आहे. कोथरुड मध्ये "स्थानिक नेता" हा जिव्हाळ्याचा मुद्दा करून आघाडीची मदत घेऊन चमत्कार होऊ शकतो. सध्या मनसेला फार भाव नसला तरी 10 ते 40 इतक्या जागा त्यांना मिळू शकतात. मनसे ला रेंज जरा जास्तच दिली आहे.
बाकी वंचित आणि इतर बारीक बारीक पक्ष फार दिवे लावतील असे वाटत नाही पण 288 मध्ये 10 ते 20 जागा धरायला काही हरकत नाही.
मला पूर्ण कल्पना आहे की माझाही हा अंदाजच आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा ठरू शकतो. त्यातूनच मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल.
एकूण काय, फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पक्की आहे, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री पद नक्की घेणार. आता विरोधी पक्ष नेते पद आघाडी मध्ये राहणार का मनसे खेचून घेणार एवढाच काय तो प्रश्न आहे.

- मंदार कुलकर्णी
21 ऑक्टोबर 2019
विधानसभा मतदान संपायच्या आणि exit पोल यायच्या आधी !!!

निवडणूक आयोगाचा कारभार



साधारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून अनेक नवे मतदार आणि मध्यमवयीन भारतीय नागरिकांनी निवडणूक आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी उदा. निवडणूक आयोग, सोशल मीडिया, पक्ष या विषयांकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. निवडणूक आयोगाने केलेली कामे, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न हे निश्चितच कौतुकास्पद होते. कारण खरोखरच त्यावेळी 64% पर्यंत मतदान भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच पोहोचले.

आजकाल मात्र निवडणूक आयोगाचे नक्की काय चालू आहे ते कळत नाही. एका बाजूला लोकांना मतदान करण्यासाठी माधुरी दीक्षित पासून अनेक मंडळींना जाहिरातीत घेतले आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक मात्र सोमवारी म्हणजे शनिवार आणि रविवार यांना जोडून ठेवली आहे. कसा मतदानाचा टक्का वाढेल? इतका कॉमन सेन्स यांना नाही का? जर मंगळवार किंवा बुधवारी मतदान ठेवले असते तर काय बिघडले असते?

बहुतेक शाळांच्या परीक्षा या 17 किंवा 18 ऑक्टोबरला संपणार आहेत. आणि बरीच मंडळी दिवाळीच्या निमित्ताने आपापल्या गावी किंवा सहलीला जातात. याचे नियोजन आधीच करावे लागते आयत्या वेळेला बस किंवा रेल्वेची तिकिटे मिळत नाहीत. मग अगदी दिवाळीच्या तोंडावर मतदानाची तारीख का ठरवली? मतदानासाठी लोकं थोडीच थांबणार आहेत? अगदी मान्य आहे की नोव्हेंबरमध्ये सुरुवातीलाच नवीन विधानसभा अस्तित्वात येणे महत्वाचे आहे पण त्यासाठी आधी मतदान घेणे शक्य झाले असते. का फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेसाठी निवडणूकीची प्रक्रिया उशिरा चालू केली? महाजनादेश यात्रा संपल्या संपल्या निवडणूक आचार संहिता कशी लागू झाली? हा केवळ योगायोगच होता ना?

आता पुढचा मुद्दा मतदान केंद्र आणि मतदानाचा क्रमांक. आज 70 वर्षे निवडणुका होत असूनही मतदार मंडळींना कुठे जाऊन मतदान करायचे हे माहीत नसते. पूर्वी राजकीय पक्ष स्लिप वाटायचे पण आता त्या पण निश्चित येतातच असे नाही आणि म्हणून लोक मतदानाला जायचा कंटाळा करतात. मी आणि माझ्या पत्नीने मे मध्ये निवडणूकीच्या दिवशी निवडणूक केंद्रावर दिवसभर थांबून काही शे लोकांना त्यासाठी मदत केली होती पण मग निवडणूक आयोगाची काय जबाबदारी आहे?

निवडणूक आयोग नेहमी जाहिरात करते की मतदान केंद्र हे जमीन स्तरावर असेल आणि वरच्या मजल्यावर जिने चढून जावे लागणार नाही. आमचा गेल्या वेळचा अनुभव अगदी वेगळा होता. आमच्या मतदान केंद्राचा ग्राऊंड फ्लोअर 25 पायऱ्या चढून होता मग जेष्ठ नागरिक मंडळींनी तिथे कसे जायचे? लिफ्टची सोय नसते, लिफ्ट असल्यास ती एकतर चालू नसते किंवा त्या संस्थेचे लोक वीज बिल वाढेल या भयाने ती वापरू देत नाहीत किंवा बंद आहे असे सांगतात. घरोघरी एक जिना सुद्धा न चढणारी मंडळी अशा ठिकाणी जाऊन मतदान करतील ही अपेक्षाच चुकीची आहे.

दिव्यांग लोकांची हीच तऱ्हा. मतदान केंद्रावर रॅम्प किंवा तशी सुविधा असल्याचा आयोग उगाचच दावा करते पण प्रत्यक्षात असे काही नसते. अशा लोकांना नेण्यासाठी आयोग सोय करते असे म्हणतात पण माझ्या काही पाहण्यात नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची सोय सांगितली जाते. इथे मतदार केंद्रातील कर्मचारी वर्गाला प्यायला पाणी नसते तिथे बाकीच्या सोयी कुठून येणार?

निवडणूक आयोग बोलते त्यापेक्षा सत्यस्थिती खूप वेगळी आहे. नुसते मतदानाचा टक्का वाढण्यासाठी रेडिओ आणि टीव्ही वर लाखो रूपयांच्या जाहिरातीवर खर्च करणाऱ्या आयोगाने प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करायला हव्यात.

मंदार कुलकर्णी
18 ऑक्टोबर 2019

Sunday, October 6, 2019

फुलांचा मोबदला



आज कर्वेनगर मधून सकाळी चालत असताना झेंडूच्या फुलांचे प्रचंड ढीग दिसायला लागले. त्यांनी लावलेला भाव पाहून चाट पडलो. भाव रुपये 170 मात्र प्रति किलो. मी कालच मार्केट यार्ड मधून 1 किलो फुले 30 रु ला आणली आणि इथे दर 170 रु किलो !!!

याचा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांकडून ही फुले मार्केट यार्डला 5 किंवा 10 रु किलोने येत असणार. मार्केट यार्ड चे ठोक व्यापारी तिथल्या खालच्या व्यापाऱ्यांना 15 ते 20 रुपयाला विकणार. आणि ते व्यापारी कर्वेनगर - कोथरूड मध्ये तीच फुले 170 रु ला विकणार. आता यात शेतकऱ्यांना किती मिळाले आणि मधल्या व्यापाऱ्यांना किती मिळाले? विचार करा.

तिच गोष्ट कांद्याची. कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यावरून अनेक शेतकऱ्यांनी आणि मधल्या दलालांनी आरडाओरडा केला. आजही कांदा कर्वेनगर मध्ये 60 रु किलो ने विकला जातो आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडून तो 5 - 10 रु ला उचलला असणार.

माझी या सर्वांना विनंती आहे, दसऱ्याच्या निमित्ताने का होईना आज उद्या जरा वेळ काढा. मार्केट यार्ड, मंडई इथे जाऊन चांगल्या आणि स्वस्त मालाची खरेदी करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले वाहन काढून पिरंगुट, सासवड, शिरवळच्या बाजूस जाऊन डायरेक्ट शेतकऱ्यांकडून फुले आणू या. त्यांना आणि आपल्याला जास्त आनंद मिळेल त्यात..

मंदार कुलकर्णी
7 ऑक्टोबर 2019

Friday, October 4, 2019

देवघरातील टाक



देवघरात देवांच्या मूर्ती असतात तसे देवांचे टाकही असतात. बऱ्याच जणांना विचारूनही या बद्दल फारशी माहिती मिळत नव्हती. अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली असावी. दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात.

देवघरातील टाक या गोष्टीचे मला कायम आश्चर्य आणि उत्सुकता होती. पण देवाची मूर्ती असताना या टाकाची गरज काय? याचे उत्तर असे की पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने नव्हती. आपल्या प्रदेशात असणारा देव आणि देवता हे अनुक्रमे कुलदैवत आणि कुलदेवता असायचे. पण दरवेळेस इतक्या लांब चालत जाऊन त्यांचे दर्शन घेणे त्या काळी अशक्य होते. निर्गुण पूजा हा पूजेतील पुढचा टप्पा असल्याने सामान्य लोकांना डोळ्यासमोर कुलदैवत कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता. त्यावर उपाय म्हणजे टाक. म्हणजे आजच्या काळातील फोटो. फोटोग्राफीची शोध जरी विदेशात लागला असला तरी आपले पूर्वज खूप हुशार होते. चांदीच्या पत्र्यावर नुसता 2डी फोटो न काढता 3डी चित्र करून त्यांनी टाक बनवले!! कुलदैवतांचे टाक धातूपासुन बनलेले असतात. चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते. पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे.आज जसे फोटोच्या रक्षणासाठी आपण फोटोला फ्रेम करतो तशीच तांब्याची पाठ किंवा फ्रेम ही त्या काळपासून लावायची पद्दत आपल्याकडे आहे.

त्या टाकाकडे पाहून आपल्या डोळ्यासमोर खऱ्या मूर्तीचे रुप येते. रोजच्या पूजेत टाक असल्याने कुलदेवतेची उपासना करणे सहज शक्य होते. चांदी आणि तांबे हे सुपर कंडक्टर ऑफ हिट आणि वीज त्यामुळे निसर्गातून पडणाऱ्या विजेपासून ही आपले संरक्षण होते. चांदी पांढरी शुभ्र असल्याने त्यावर केलेला उठाव किंवा 3 डी काम हे एकदम उठून दिसते. किती विचार केला आहे पहा पूर्वजांनी !!!

तसेच देवघराचा विचार हा मुख्यतः कुलदेवतांची पूजा इतक्यातच मर्यादित असावा. सर्वांनाच देवाची किंवा देवीची मूर्ती बनवणे (जशीच्या तशी) हे बनवणे शक्य नसेल किंवा तसे परवडत ही नसेल.
हाच विचार डोक्यात ठेवून कुलदेवतेच्या मंदिरापाशी किंवा गावात देवांचे टाक बनवणे हा व्यवसाय सुरू झाला असेल. देवाची मूर्ती धातूंत बनवणे अवघड त्यामानाने टाक बनवणे सोपे हा त्या मागचा विचार असेल. शिवाय वजनाला हलके, कुठे घेऊन जायला ही सोपे.

टाकाची पूजा करताना ही काय काळजी घ्यायची हे सुद्धा सांगून ठेवले आहे त्यामुळे टाक चांगले टिकतील.
# देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात,ओला गंध लावू नये. कारण त्यावर डाग पडू शकतात.
# दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.
# सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.
# देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.
# टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावरखाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.

एवढे करूनही टाक खराब झाला किंवा भंगला तर नवीन बनवायची सोय आहेच की. जेजुरीच्या मंदिराजवळ अशा अनेक पिढ्या टाक बनवायचे काम करतात. टाक बनवून झाल्यावर मुख्य देवतेला दाखवून विधिवत पूजा करून मग ते घरी नेऊन देवघरात बसवतात. एक प्रकारे घरातील देवांचे चार्जिंग जणू किंवा एनर्जी ट्रान्सफर !! हा सगळा अभ्यास केल्यावर थक्क व्हायला होते.

यात बाकीच्या देवांच्या टाकाची भर नंतरच्या काळात झाली असावी. देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी तीन, पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते हा कदाचित संख्या वाढवण्याचा प्रकार असू शकतो.

कालानुरूप त्यात वाढ होत गेली आणि कुलस्वामी, कुलस्वामिनी बरोबर क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश झाला. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात.

खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरामध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या,अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते.

या टाकांचे अजून एक वैशिष्टय म्हणजे कालानुरूप त्यात होत गेलेले बदल. दोन उदाहरणे विस्ताराने सांगून हे समजेल. देवळामध्ये खंडोबा एकटा असला तरी टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. पती-पत्नीचे सौभाग्य, एकमेकांवरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरीही सुखाचा संसार होण्यास पती व पत्नीत सामंजस्य असणे महत्वाचे आहे हा संदेश इथे दिला जातो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्व हेच आहे. पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरात केला जातो. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतिक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याच्या यामागील उद्देश असावा.

जानाई (योगेश्वरी अथवा जोगेश्वरी) देवीचाही टाक आहे. जानाई ही भैरवनाथाची पत्नी. जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते. थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईदेवी आहे.

तर अशा ही देवांची टाकाची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी हा या लेखाचा उद्देश. हुशार लोकांनी 3डी चे पेटंट आपल्या भारतीयांना या निमित्ताने मिळण्यासाठी अवश्य प्रयत्न करावेत !!!
स्रोत: आंतर जाल

मंदार कुलकर्णी
१० नोव्हेंबर २०१८

आयेगा आनेवाला - लता




आयेगा आनेवाला हे गाणं प्रकाशीत झालं त्याला आज 70 वर्षं झाली. आणि लताला 90 वर्ष... म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी तिने हे अजरामर गीत गायले. किंबहुना काही वर्षे आधीच लताने गायला सुरुवात केली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिचे वडील गेले आणि सर्व घराची जबाबदारी तिच्यावर आली. सुरुवारीच्या काळात चित्रपटात कामे सुद्धा केली. 'आनंदघन' या नावाने अनेक चित्रपटांना संगीत ही दिले पण लता म्हटलं की डोळ्यासमोर येते ती फक्त 'पार्श्वगायिका'.

साधारण 30 वर्षापूर्वी म्हणजे लताच्य साठीला महाराष्ट्र टाईम्स ने एक सर्व्हे केला होता. "लताची ऑल टाईम ग्रेट 10 गाणी कोणती?" असा तो होता. तेव्हा टीव्ही वर सारखे शो नसत, प्रतियोगीता पोस्टकार्डे यायची होती आणि ऑनलाइन वोटिंग हा प्रकार जन्माला यायचा होता. त्यामुळे या सर्व्हेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही हजार लोकांनी पत्रे पाठवून आपले मत नोंदवले होते आणि अर्थातच त्यात सर्वोच्च स्थानावर होते... "आयेगा आनेवाला". मग त्या पाठोपाठ "बिती ना बिताई रैना" आणि अशी असंख्य सुंदर गीते. मी ते पेपर चे कात्रण आता आतापर्यंत जपून ठेवले होते.

माझ्या आठवणीतील लता ही अशी आहे... जिने पुढे "ओ लुटेरे..." सारखी गचाळ गाणी ही गायिली. असो...


मंदार कुलकर्णी
29 सप्टेंबर 2019